11/04/2026
*✦ जयंती म्हणजे केवळ उत्सव नव्हे, तर आत्मपरीक्षणाची संधी ✦*
आज आपण एका महान व्यक्तीची जयंती साजरी करत आहोत. परंतु, मला वाटते की ही केवळ जयंती नसून, त्यांच्या विचारांचा, कार्याचा आणि त्यांच्या अधुर्या स्वप्नांचा मागोवा घेण्याची ही संधी आहे.
कोणताही महापुरुष केवळ आपल्यासाठी जगत नाही. तो संपूर्ण समाजाच्या उद्धारासाठी आपले जीवन समर्पित करतो. त्यांच्या विचारांत एक दूरदृष्टी असते – समाज परिवर्तनाची, शिक्षणाची, समता-सामाजिक न्यायाची आणि आत्मगौरवाची म्हणूनच, जयंती साजरी करताना आपल्याला हे बघावं लागतं की:
त्यांनी दिलेले विचार आपण कितपत अमलात आणले?
त्यांनी सुरू केलेलं कार्य कुठे पोहोचलंय?
त्यांचं अधुरं स्वप्न आपण पूर्ण करत आहोत का?
बहुजन समाज आजही आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक रुपया आणि प्रत्येक क्षण समाजाच्या विकासासाठी वापरणं गरजेचं आहे. महापुरुषांच्या जयंतीच्या निमित्ताने जर आम्ही: शिक्षणविषयक मार्गदर्शन शिबिरे घेतली,बेरोजगार तरुणांसाठी कौशल्यविकास प्रशिक्षण दिलं,आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे भरवली,
त्यांच्या विचारांवर परिसंवाद, चर्चासत्र घेतली,..तर मग त्यांचा खरा सन्मान आणि उपयोग समाजासाठी होईल.
महापुरुषांची जयंती म्हणजे भूतकाळात डोकावणं नाही, तर भविष्यासाठी दिशा ठरवणं आहे.
त्यामुळे, पुढे जाऊन आपण प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीला "सामाजिक जागृती पर्व" म्हणून साजरी करूया.
शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं:
“जयंती फक्त साजरी नको, ती समाजाला जागं करणारी ठरली पाहिजे.”
लेखक : जगदीश वांदीले सर
8788538544,9860690063