11/08/2025
रांगोळ्यांचे माहेरघर -जुचंद्र
कलाकारांचे गाव .....म्हणून प्रसिद्ध असणारे तसेच आकर्षक रांगोळ्यांचे माहेरघर मानले जाणारे जूचंद्र हे नायगाव येथील एक सुंदर गाव. चारही बाजूला असलेले मिठाचे आगर आणि त्यावर आधारित व्यवसाय यावर विसंबून असणारी ही लोकं कलेच्या बाबतीत समृद्ध झालेली दिसून येतात. या गावाला कलाकार घडवण्याचा जणू आशीर्वाद च लाभलेला आहे. शंभर वर्षांची नाट्य परंपरा असणाऱ्या जूचंद्र गावामध्ये रांगोळी कलेला आज विशेष महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते. गावातील बराचसा तरुण वर्ग रांगोळी कलेकडे वळलेला पहायला मिळतो.
धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेली ही रांगोळी काढण्याची कला सर्वदूर प्रसिद्ध होण्यासाठी तसेच जुचंद्र गावातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शिवछत्रपती समाजसेवा मंडळाचे मोठे योगदान आहे.1980 साली घरोघरी रांगोळी स्पर्धांचे आयोजन करून शिवछत्रपती समाजसेवा मंडळाने जूचंद्र गावातील रांगोळी कलाकार शोधून काढले .प्रत्येकाच्या अंगणामध्ये रांगोळी काढण्यास सांगून रांगोळी स्पर्धा भरवण्यात आल्या. यामध्ये सर्वात मोलाचे मार्गदर्शन लाभले ते वसई तालुक्यातील ज्येष्ठ रांगोळी कलाकार शंकर मोदगेकर सर यांचं. शिवछत्रपती समाजसेवा मंडळाने आपल्या गावातील कलाकारांची कला अधिक विस्तृत व्हावी यासाठी श्री शंकर मोदगेकर सर यांचे शिबिर आयोजित केले .यामुळे येथील कलाकारांना खऱ्या अर्थाने रांगोळी काढण्याचे तांत्रिकदृष्ट्या ज्ञान मिळाले.
जूचंद्र गावातील कलाकारांना तालुकास्तरावर खरी ओळख मिळाली ते वसई तालुका कला क्रीडा महोत्सव यांनी भरविलेल्या रांगोळी प्रदर्शनामुळे. या प्रदर्शनामध्ये जूचंद्र गावातील अनेक स्पर्धक भाग घेऊ लागले. यातूनच या कलाकारांची व्यावसायिक दृष्ट्या सुरुवात झाली. 1990 साली जेव्हा वसई तालुका कला क्रीडा महोत्सवामार्फत ज्या रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येत असत तेव्हा रांगोळी स्पर्धांचे विषय मोजकेच असायचे. या पारंपारिक रांगोळ्यांमध्ये ठिपक्यांची रांगोळी ,निसर्ग चित्र ,संस्कार भारती यांसारख्या रांगोळ्या काढण्यात येत असत.परंतु आताची तरुण पिढी विविध विषय हाताळून सुरेख रांगोळ्या काढताना आपल्याला दिसत आहेत .प्रत्येकाची शैली वेगळी आहे .कोणी व्यक्ती चित्र काढण्यावर लक्ष केंद्रित करतात, तर कोणी सामाजिक प्रश्न घेऊन जनजागृती करताना दिसतात , कोणी भौमितिक रांगोळ्यांसारख्या वेगळा विषय हाताळतात ,तर कोणी थ्रीडी रांगोळी काढून लोकांना अचंबित करतात. रांगोळी हा विषय सहज हाताळणारी ही कलाकार मंडळी रांगोळी काढताना मात्र मोठी कसरत करताना दिसते. रांगोळी काढताना लागणारी तुमची सहनशक्ती, तुमचे ज्ञान, रंगसंगती आणि तुमचे रांगोळी विषयी असणारे प्रेम, प्रत्येक कलाकाराला इतर कलाकारापेक्षा वेगळे बनवते.
गाव ते तालुका... जिल्हा ....,राज्य असा प्रवास करत आता हे कलाकार आपली कला राष्ट्रीय पातळीवर सादर करीत आहे. नुकत्याच स्पेन आर्ट फेस्टिवल मध्ये ज्या भारतीय तरुणाने देश-विदेशातील रांगोळी रसिकांची मने जिंकली तो कलाकार म्हणजे जुचंद्र गावातील संजय पाटील. या रांगोळी कलाकाराने आपल्या विशिष्ट शैली मधून भारताच्या इस्त्रोचा विजय दाखवणारी रांगोळी रेखाटली आणि विदेशामध्ये आपल्या गावाचे व आपल्या देशाचे नावलौकिक केले . जुचंद्र गावातील असे कितीतरी रांगोळी कलाकार आहेत ज्यांनी रांगोळी ही कला सातासमुद्रापलीकडे प्रसिद्ध करण्याचे काम केले आहे .
रांगोळी हे माध्यम फक्त सौंदर्य, आकर्षण, रंगसंगती एवढ्यावरच मर्यादित न राहता ते जनजागृती तसेच सामाजिक समस्या सोडवण्याचे ही उपयुक्त असे माध्यम आहे. जूचंद्र गावातील चंडिका मातेच्या यात्रोत्सवामध्ये गावातील अनेक रांगोळी कलाकार आपली कला सादर करताना दिसतात. हे कलावंत रांगोळी प्रदर्शनात विविध सामाजिक प्रश्न ,समाजप्रबोधन अशा प्रकारचे विषय हाताळताना दिसतात. ही रांगोळी प्रदर्शने पाहण्यासाठी दूर दूर वरून लाखो लोक येत असतात. रांगोळीतील बारकावे पाहताना लोकं भारावून जातात. अगदी हुबेहूब चित्र रेखाटण्याच्या या कलेला नक्की कशी दाद द्यावी असा प्रश्न रसिकांना पडतो.
पूर्वीपासून चालत आलेली ही रांगोळी कलाकारांची परंपरा पिढीने पिढी पुढे सरकली आहे .आता प्रत्येक घरामध्ये किमान एक तरी रांगोळी कलाकार सापडतो. पूर्वी रांगोळी ही स्त्रियांची मक्तेदारी असायची परंतु जूचंद्र येथील पुरुष कलाकारांनी ती मक्तेदारी मोडीस काढली. रांगोळी ही कला फक्त आवड आणि सवड इथपर्यंत मर्यादित न राहता ती आता तरुणांना अर्थार्जन करण्याचा एक मार्ग बनली आहे .रांगोळी काढण्याच्या स्पर्धेमुळे तरुणांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो .या स्पर्धांमुळे तरुणांमधील ही कला अधिक बहरत आहे. परंपरा आणि नाविन्याची सांगड घालत जूचंद्र गावातील अनेक कलाकार रांगोळी कलेचे अस्तित्व टिकवण्यासाठी झटत आहेत. परंतु रांगोळी कला ही व्यवसाय म्हणून पाहताना कलाकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. रांगोळी कला ही केवळ मनोरंजन किंवा छंद म्हणून पाहिली जाते .परंतु मोठमोठ्या रांगोळ्या काढताना कितीतरी वेळ द्यावा लागतो, तांत्रिकदृष्ट्या बारकाईने काम पहावे लागते ,10-12 तास सलग बसून एकाग्रतेने काम करावे लागते. एवढी मेहनत आणि कष्ट घेऊनही मोबदलाही तसाच मिळाला तर ठीक नाहीतर या कलाकारांचा हिरमोड होतो. व्यावसायिक दृष्ट्या रांगोळी कलेला वाव देण्यासाठी अनेक मर्यादा येताना दिसतात.
भारतीय संस्कृतीचा वारसा असणाऱ्या रांगोळी या कलेस जुचंद्र गावाने एक नवीन रूप दिले आहे .रांगोळी कलेचा व कलाकारांचा सन्मान होण्यासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत. जुचंद्र गावातील अशा सर्व रांगोळी कलाकारांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.जूचंद्र गावाचे नाव अधिक लौकिक व्हावे अशी आई चंडिका चरणी प्रार्थना.
- जान्हवी भोसले