11/08/2025
रांगोळ्यांचे माहेरघर -जुचंद्र
कलाकारांचे गाव .....म्हणून प्रसिद्ध असणारे तसेच आकर्षक रांगोळ्यांचे माहेरघर मानले जाणारे जूचंद्र हे नायगाव येथील एक सुंदर गाव. चारही बाजूला असलेले मिठाचे आगर आणि त्यावर आधारित व्यवसाय यावर विसंबून असणारी ही लोकं कलेच्या बाबतीत समृद्ध झालेली दिसून येतात. या गावाला कलाकार घडवण्याचा जणू आशीर्वाद च लाभलेला आहे. शंभर वर्षांची नाट्य परंपरा असणाऱ्या जूचंद्र गावामध्ये रांगोळी कलेला आज विशेष महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते. गावातील बराचसा तरुण वर्ग रांगोळी कलेकडे वळलेला पहायला मिळतो.
धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेली ही रांगोळी काढण्याची कला सर्वदूर प्रसिद्ध होण्यासाठी तसेच जुचंद्र गावातील कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी शिवछत्रपती समाजसेवा मंडळाचे मोठे योगदान आहे.1980 साली घरोघरी रांगोळी स्पर्धांचे आयोजन करून शिवछत्रपती समाजसेवा मंडळाने जूचंद्र गावातील रांगोळी कलाकार शोधून काढले .प्रत्येकाच्या अंगणामध्ये रांगोळी काढण्यास सांगून रांगोळी स्पर्धा भरवण्यात आल्या. यामध्ये सर्वात मोलाचे मार्गदर्शन लाभले ते वसई तालुक्यातील ज्येष्ठ रांगोळी कलाकार शंकर मोदगेकर सर यांचं. शिवछत्रपती समाजसेवा मंडळाने आपल्या गावातील कलाकारांची कला अधिक विस्तृत व्हावी यासाठी श्री शंकर मोदगेकर सर यांचे शिबिर आयोजित केले .यामुळे येथील कलाकारांना खऱ्या अर्थाने रांगोळी काढण्याचे तांत्रिकदृष्ट्या ज्ञान मिळाले.
जूचंद्र गावातील कलाकारांना तालुकास्तरावर खरी ओळख मिळाली ते वसई तालुका कला क्रीडा महोत्सव यांनी भरविलेल्या रांगोळी प्रदर्शनामुळे. या प्रदर्शनामध्ये जूचंद्र गावातील अनेक स्पर्धक भाग घेऊ लागले. यातूनच या कलाकारांची व्यावसायिक दृष्ट्या सुरुवात झाली. 1990 साली जेव्हा वसई तालुका कला क्रीडा महोत्सवामार्फत ज्या रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येत असत तेव्हा रांगोळी स्पर्धांचे विषय मोजकेच असायचे. या पारंपारिक रांगोळ्यांमध्ये ठिपक्यांची रांगोळी ,निसर्ग चित्र ,संस्कार भारती यांसारख्या रांगोळ्या काढण्यात येत असत.परंतु आताची तरुण पिढी विविध विषय हाताळून सुरेख रांगोळ्या काढताना आपल्याला दिसत आहेत .प्रत्येकाची शैली वेगळी आहे .कोणी व्यक्ती चित्र काढण्यावर लक्ष केंद्रित करतात, तर कोणी सामाजिक प्रश्न घेऊन जनजागृती करताना दिसतात , कोणी भौमितिक रांगोळ्यांसारख्या वेगळा विषय हाताळतात ,तर कोणी थ्रीडी रांगोळी काढून लोकांना अचंबित करतात. रांगोळी हा विषय सहज हाताळणारी ही कलाकार मंडळी रांगोळी काढताना मात्र मोठी कसरत करताना दिसते. रांगोळी काढताना लागणारी तुमची सहनशक्ती, तुमचे ज्ञान, रंगसंगती आणि तुमचे रांगोळी विषयी असणारे प्रेम, प्रत्येक कलाकाराला इतर कलाकारापेक्षा वेगळे बनवते.
गाव ते तालुका... जिल्हा ....,राज्य असा प्रवास करत आता हे कलाकार आपली कला राष्ट्रीय पातळीवर सादर करीत आहे. नुकत्याच स्पेन आर्ट फेस्टिवल मध्ये ज्या भारतीय तरुणाने देश-विदेशातील रांगोळी रसिकांची मने जिंकली तो कलाकार म्हणजे जुचंद्र गावातील संजय पाटील. या रांगोळी कलाकाराने आपल्या विशिष्ट शैली मधून भारताच्या इस्त्रोचा विजय दाखवणारी रांगोळी रेखाटली आणि विदेशामध्ये आपल्या गावाचे व आपल्या देशाचे नावलौकिक केले . जुचंद्र गावातील असे कितीतरी रांगोळी कलाकार आहेत ज्यांनी रांगोळी ही कला सातासमुद्रापलीकडे प्रसिद्ध करण्याचे काम केले आहे .
रांगोळी हे माध्यम फक्त सौंदर्य, आकर्षण, रंगसंगती एवढ्यावरच मर्यादित न राहता ते जनजागृती तसेच सामाजिक समस्या सोडवण्याचे ही उपयुक्त असे माध्यम आहे. जूचंद्र गावातील चंडिका मातेच्या यात्रोत्सवामध्ये गावातील अनेक रांगोळी कलाकार आपली कला सादर करताना दिसतात. हे कलावंत रांगोळी प्रदर्शनात विविध सामाजिक प्रश्न ,समाजप्रबोधन अशा प्रकारचे विषय हाताळताना दिसतात. ही रांगोळी प्रदर्शने पाहण्यासाठी दूर दूर वरून लाखो लोक येत असतात. रांगोळीतील बारकावे पाहताना लोकं भारावून जातात. अगदी हुबेहूब चित्र रेखाटण्याच्या या कलेला नक्की कशी दाद द्यावी असा प्रश्न रसिकांना पडतो.
पूर्वीपासून चालत आलेली ही रांगोळी कलाकारांची परंपरा पिढीने पिढी पुढे सरकली आहे .आता प्रत्येक घरामध्ये किमान एक तरी रांगोळी कलाकार सापडतो. पूर्वी रांगोळी ही स्त्रियांची मक्तेदारी असायची परंतु जूचंद्र येथील पुरुष कलाकारांनी ती मक्तेदारी मोडीस काढली. रांगोळी ही कला फक्त आवड आणि सवड इथपर्यंत मर्यादित न राहता ती आता तरुणांना अर्थार्जन करण्याचा एक मार्ग बनली आहे .रांगोळी काढण्याच्या स्पर्धेमुळे तरुणांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतो .या स्पर्धांमुळे तरुणांमधील ही कला अधिक बहरत आहे. परंपरा आणि नाविन्याची सांगड घालत जूचंद्र गावातील अनेक कलाकार रांगोळी कलेचे अस्तित्व टिकवण्यासाठी झटत आहेत. परंतु रांगोळी कला ही व्यवसाय म्हणून पाहताना कलाकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. रांगोळी कला ही केवळ मनोरंजन किंवा छंद म्हणून पाहिली जाते .परंतु मोठमोठ्या रांगोळ्या काढताना कितीतरी वेळ द्यावा लागतो, तांत्रिकदृष्ट्या बारकाईने काम पहावे लागते ,10-12 तास सलग बसून एकाग्रतेने काम करावे लागते. एवढी मेहनत आणि कष्ट घेऊनही मोबदलाही तसाच मिळाला तर ठीक नाहीतर या कलाकारांचा हिरमोड होतो. व्यावसायिक दृष्ट्या रांगोळी कलेला वाव देण्यासाठी अनेक मर्यादा येताना दिसतात.
भारतीय संस्कृतीचा वारसा असणाऱ्या रांगोळी या कलेस जुचंद्र गावाने एक नवीन रूप दिले आहे .रांगोळी कलेचा व कलाकारांचा सन्मान होण्यासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत. जुचंद्र गावातील अशा सर्व रांगोळी कलाकारांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.जूचंद्र गावाचे नाव अधिक लौकिक व्हावे अशी आई चंडिका चरणी प्रार्थना.
- जान्हवी भोसले
12/12/2024
गणिताची किमया न्यारी .....हसत खेळत करू तयारी
गणित हा विषय मुलांना शिकवताना आकलन उपयोजन कौशल्य आधी उद्दिष्टांवर भर द्यावा लागतो .गणित ही एक अशी शाखा आहे जी मोजणी ,गणना आणि संख्या ,आकार तसेच संरचना यांचा अभ्यास करते .अनाकर्षक आणि भारवलेल्या गणिताच्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशा निर्माण होते .गणित विषय हा पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित राहिलेला आहे . परिणामी विद्यार्थ्यांना गणितामध्ये रस वाटत नाही .
विद्यार्थ्याला पाठ्यपुस्तकांमधून गणित शिकवण्यात आनंद आणि मजेला फार कमी वाव मिळतो .यामुळे विद्यार्थ्यांना गणित विषय आवडेनासा होतो. विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाचे असणारी भीती व नावड दूर करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट असल्यास त्यांना गणित विषयातील कोणत्याही क्रिया करणे सोपे जाईल.यासाठी गणित प्रयोगशाळा निर्माण करून त्यांना आपण प्रत्यक्ष अनुभवामधून ज्ञान देण्याचा प्रयत्न करू शकतो.
या विचारसरणी मधून गणिताच्या संकल्पना वर आधारित गणिती मॉडेल तयार करण्यात आले व सदरचा प्रकप तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये मांडण्यात आला.
20/03/2024
एक स्वलिखित कविता....
अशाच एका चांदण्या रात्री.......कविता
Information and compilation
15/01/2024
अपयशाकडून ......यशाकडे
नुकताच '12th फेल' हा सिनेमा पाहिला . एक विद्यार्थी आपल्या परिस्थितीवर मात करून कसा आयपीएस अधिकारी बनतो ,त्याच्या संघर्षाची कहाणी सांगणारा हा चित्रपट आहे.आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित असा हा अपयशाकडून यशाकडे नेणारा चित्रपट खूप काही सांगून जातो.
या स्पर्धेच्या युगात कितीतरी असे विद्यार्थी आहेत त्यांना अपयशाला सामोरे जावं लागतं .अशावेळी अपयशाला न घाबरता ,न डगमगता, पुन्हा सुरुवात केली पाहिजे . अशक्य असं काही नसतं .आपल्यासमोर अशी कित्येक उदाहरणं आहेत की जे अपयश येऊनही ते थांबले नाहीत तर जिद्दीने लढत राहिले. अगदी आईन्स्टाईन पासून ते अंबानी पर्यंत ....असे अनेक शास्त्रज्ञ, उद्योगपती,तत्त्वज्ञ ,कवी, लेखक, चित्रकार ,कलावंत यांनाही अपयशाने गाठलेलं आहे. परंतु आज आपण या सर्वांना नावाजलेलं पाहतो कारण त्यांनी परिस्थितीवर मात केली, संघर्ष केला आणि आपली स्वप्न पूर्ण केली. यांचा आदर्श प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे.
कितीतरी विद्यार्थी असे ही आहेत की जे अपेक्षा आणि निराशा यांच्या चक्रव्हूवात अडकलेले पहायला मिळतात. पालकांच्या अपेक्षा, स्वतःच्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षा ,समाजाच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा आणि त्यात अचानक समोर आलेलं अपयश विद्यार्थ्यांना निराशेच्या दरीत नेऊन ढकलतं .अशावेळी पालकांनीही तेवढ्या जागृकतेने आपल्या पाल्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. एकदा हरले म्हणजे जिंकूच शकत नाही असं न मानता त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.पाल्याची नक्की काय स्वप्न आहेत ती जाणून घेऊन त्यांना मार्ग दाखविला पाहिजे .काही पालक असतात जे आपली स्वप्न आपल्या पाल्यावर जबरदस्तीने लादण्याचा प्रयत्न करतात.त्यात जर त्या पाल्याला अपयशाने गाठलं तर मात्र तो स्वतः ला दोषी मानत राहतो.ज्याचे कधी कधी गंभीर परिणाम पहायला मिळतात.
मला तर असं वाटतं की अपयश कधीही पाहिलं नाही अशी माणसं शोधूनही सापडणार नाहीत. ज्याला अपयश आलेलं असतं त्यांच्याकडे दोनच मार्ग असू शकतात एक अपयशासमोर हार मानणं आणि दुसरं अपयशाला सामोरे जाणं यातला दुसरा पर्याय निवडणारे विद्यार्थी यश नक्कीच गाठतात आणि जे पहिला पर्याय निवडतात ते निराशेला आमंत्रण देऊन आयुष्याची होळी करतात. जेव्हा कधी वाटेल की आपण हरत आहोत,आपल्या पदरी अपयश पडत आहे अशा वेळी प्रत्येक विद्यार्थ्याने' 3R ' चे नेहमी पालन केले पाहिजे आणि ते म्हणजे Restart, Research, Responsible. Restart म्हणजे पुन्हा नव्याने सुरुवात करा , Research म्हणजे आपल्याला काय मिळवायच आहे आणि कसं मिळवायच आहे याचा शोध घ्या, Responsible म्हणजे जबाबदारीची जाणीव ठेवा .या '3R' च पालन केल्यास विद्यार्थ्याला त्याच्या ध्येयापासून कोणीच लांब ठेवू शकत नाही .लक्षात ठेवा इतिहास तेच घडवतात जे संकटांना सामोरे जातात. हारून ,घाबरून ,निराश होऊन, परिस्थितीला दोष देत बसणारी लोक ही कमकुवत असतात .संधी येण्याची वाट बघू नका तर, संधी शोधा आणि त्या संधीच सोनं करण्याची जिद्द ठेवा. बघा यश कसं तुमच्या पायाशी लोटांगण घालेल . जिद्द ,चिकाटी आणि संघर्ष करण्याची तयारी असेल तर यश तुमचच आहे .
अशावेळी सुरेश भट यांची ही कविता खूप काही सांगून जाते...
विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही ...
पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही...
छाटले जरी पंख माझे ,पुन्हा उडेन मी...
अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही ...
आपण ठरवलेल्या ध्येयाच्या मार्गात अनेक अडथळे येतील .परंतु स्वतःवर विश्वास ठेवा . हार मानू नका ,प्रयत्न करा एक दिवस तुमचा नक्की असेल .आलेल्या अपयशाने प्रवास संपवू नका तर त्याबरोबर जी अनुभवाची शिदोरी मिळाली आहे तिला सोबत घेऊन प्रवासाची नवीन सुरुवात करा.
- जान्हवी भोसले
31/12/2023
नव्या अध्यायाची ......नवी सुरुवात
Happy new year.....
I am ready 😎...... Welcome 2024
13/07/2023
हार मानू नकोस.....
येतील संकटे हजार,
पण तू घाबरू नकोस.....
एकटा पडलास तरी चालेल,
पण तू कोणासमोर झुकू नकोस.....
टोचतील काटे बेसुमार,
पण तू थांबू नकोस.....
रक्तबंबाळ झालास तरी चालेल,
पण तू लाचार होऊ नकोस.....
घायाळ करतील दुःखाच्या झळा ,
पण तू डगमगून जाऊ नकोस.....
नाही मिळालं सुख तरी चालेल ,
पण तू ,त्याच्या पाठी धाऊ नकोस.....
असह्य करतील या वेदना ,
पण तू धीर सोडू नकोस.....
आलं तर येऊ दे ना रडू,
पण तू खचून जाऊ नकोस.....
बेहाल झाले तरी बेहत्तर,
पण तू मागे वळून बघू नकोस.....
एक दिवस तुझा नक्की येईल ,
पण तो पर्यंत ,तू हार मानू नकोस.....
- काव्यस्पर्श
22/06/2023
अडगळीतल्या कविता....
कितीतरी दिवस झाले,
अशाच पडून राहिल्या होत्या त्या...
एका कोपऱ्यात शांत,
दमल्या असतील बिचाऱ्या...
म्हणून मी ही लक्ष दिलं नाही फारसं.
किती पावसाळे...किती सुख - दुःख
पाहिले होते त्यांनी...
साऱ्या आठवणींच्या साक्षीदार होत्या त्या...
कधी शब्दांनी गुरफटून गेल्या...
कधी भावनांनी होरपळून निघाल्या...
पण कधी विसावल्या नाहीत क्षणभर.
म्हणूनच कदाचीत ,मी ही आराम करू दिला त्यांना...
पण आज वहीची पाने ओलांडताना,
हलक्याशा आठवल्या ...
पेनाची पकड घट्ट करत ,
त्यांना अडगळीतल्या खोलीतून बाहेर काढत,
धूळ झटकून ...निरखुन पाहिलं त्यांच्याकडे...
तर पुन्हा तश्याच्या तश्या सापडल्या...
कशी काय विसरले होते मी त्यांना?
माझंच मला कळेनासं झालं.
धूळ खात पडलेल्या त्या अडगळीच्या खोलीतून
त्यांना विश्वासानं बाहेर काढलं
त्या ही मग खुश झाल्या...
माझ्याकडे आश्वासक नजरेने पाहू लागल्या...
नव्या स्वप्नांच्या वाटा दाखवत,
पुन्हा एकदा माझ्या आयुष्याचा भाग झाल्या...
- काव्यस्पर्श
17/08/2022
लोकं काय म्हणतात...
मनासारखं जगलो तर उनाड म्हणतात,
मनाविरुद्ध जगलो तर भ्याड म्हणतात,
जगण्यावरही आपल्या आक्षेप घेतात,
मग कशाला विचार करायचा
की लोकं काय म्हणतात...
चांगलं वागलो तरी पाठीमागून हसतात,
वाईट वागलो तरी तोंडं मुरडतात,
कसंही वागा,तरी नावच ठेवतात,
मग कशाला विचार करायचा
की लोकं काय म्हणतात...
सुखी दिसलो तर यांचे डोळे खुपतात,
दुखी असलेले बघून लांबून मजा घेतात,
गरजेच्या वेळी बरोबर पळून जातात,
मग कशाला विचार करायचा
की लोकं काय म्हणतात...
यशाच्या शिखरावर असलो की मागे पाय ओढतात,
पराभवाने खचलेलं बघून अजून खड्डा करतात,
काहीही करा ,तुमच्या आयुष्यात नाक खुपसतात,
मग कशाला विचार करायचा
की लोकं काय म्हणतात...
खऱ्या अडचणींमध्येच तर आपले-परके समजतात,
शेवटपर्यंत फक्त आपलीच माणसं साथ देतात
आपली माणसं नसतात ,म्हणूनच तर ती लोकं असतात
मग कशाला विचार करायचा
की लोकं काय म्हणतात...
- काव्यस्पर्श