06/06/2024
मन साफ तर सर्व माफ.......
नेहमी भूतकाळातील गोष्टी विसरून जात चला कारण सतत मागच्या गोष्टीचा विचार करत राहिला तर त्याचा परिणाम वर्तमानातील जगण्यावर आणि भविष्यावर होत असते. लोक आपल्या विषयी काय बोलतात याकडे अजिबात लक्ष देण्याची गरज नाही कारण पाठीमागे लोक तर राजाला सुद्धा शिव्या देत असतात.
प्रत्येक समस्येवर उपाययोजना आहेच काळाच्या ओघात सगळ्या गोष्टीवर उपाय सापडतो त्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागतो. स्वतःच्या आयुष्याची कधीही इतरांशी तुलना करू नका आणि त्यावरून इतरा विषयीचे मत बनवू नका. कारण त्यांचे आयुष्यातील वादळे आणि संकटाची तुम्हाला कल्पना नसते. अति विचार करत बसू नका काही प्रश्नांची उत्तरे न मिळालेलीच बरी असतात कदाचित तुम्ही अपेक्षा ठेवली नसताना देखील ती तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. तुमच्या आनंदाला फक्त तुम्ही जबाबदार आहात. आपण आनंदी राहायचे की दुःखी हे ठरवायचे अधिकार कोणालाही देऊ नका. पोट दुखेपर्यंत हसा. लक्षात ठेवा जगातील सगळ्या प्रश्नांचा भार कुणीही तुमच्या डोक्यावर दिलेला नाही. सुंदर डोळ्यासाठी जगातील फक्त चांगल्या गोष्टीकडे पहा. सुंदर ओठासाठी नम्र आणि मृदू भाषेचा वापर करा. कधीही आपण एकटे नाही याची जाणीव ठेवा. आयुष्याच्या वाटेवर चालत राहून आनंदाने जगा.
कधीकधी केराचा डबा ही आपल्याला आपल्या मनापेक्षा बरा वाटतो कारण तो दिवसातून एकदा का होईना निदान रिकामा तरी होतो. आपण मात्र मनात कितीतरी दुःखद आठवणी साठवतो. काय मिळवतो यातून आपण?
आपणच स्वतःचे दुःख वाढवत राहतो. घडून गेलेल्या वाईट गोष्टी वर्षानुवर्षे मनात ठेवतो. त्या ज्या गोष्टीमुळे घडल्या त्यांचा पुढे आपणच तिरस्कार करतो. आता केरांच्या डब्यासारखंच दररोज आपलं मनही साफ करायचं.जुने दुःख विसरून सारे नवीन स्वीकारायचे. नव्या सुखाना त्यात आनंदाने भरायचं. सुखी जीवनाचे तंत्र आता आपण सर्वांनीच शिकायचं. स्वतः नेहमीच आनंदी राहायचं आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवायचं. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा आपलं मन साफ ठेवा कोणाबद्दल राग, द्वेष, सूडबुद्धी, तिटकारा, आकस ठेवू नका. मग पहा आयुष्यात काहीच चुकीचं घडणार नाही, आणि आयुष्य देखील सुंदर होईल.
धन्यवाद!!!
आपलाच
सोमशेखर माने