19/08/2025
"स्वच्छता अभियान"
दिनांक 19/08/2025
राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर यांच्यातर्फे कपर्दीकेश्वर मंदिर स्वच्छता अभियान प्राचार्य महेंद्रजी अवघडे व राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा.अबवणेसर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या वाघिरे कॉलेजच्या 60 ते 70 विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. याप्रसंगी प्रा.गावडे सर, प्रा. बोऱ्हाडे सर, प्रा. काशीद सर, प्रा. घोडके सर, प्रा. हेमंत डुंबरे सर प्रा. पुंडलिक सरपंच सौ. छायाताई तांबे, उपसरपंच प्रशांत भाऊ डुंबरे, उपस्थित होते
यानिमित्त कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेच्या वतीने अध्यक्ष मा. अनिलशेठ तांबे यांनी सर्व सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक प्राचार्य डॉ. अवघडे यांचे आभार मानले व सत्कार केला.
12/08/2025
" स्वच्छता अभियान"
अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर. व ग्रामपंचायत ओतूर चे साफसफाई कामगार यांच्या संयुक्त विद्यमाने राम कृष्ण हरी चौक ते कपर्दीकेश्वर मंदिर स्वच्छता अभियान प्राचार्य महेंद्रजी अवघडे व राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा.अबवणेसर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेच्या वाघिरे कॉलेजच्या 60 ते 70 विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. याप्रसंगी सरपंच सौ. छायाताई तांबे, उपसरपंच प्रशांत भाऊ डुंबरे, प्रा. गावडे सर, प्रा. बोऱ्हाडे सर, प्रा. काशीद सर, प्रा. घोडके सर, प्रा. हेमंत डुंबरे सर प्रा. पुंडलिक उपस्थित होते
सफाई अभियानाचा समारोप कपर्दिकेश्वर देवधर्म संस्थेच्या वतीने सर्व सहभागी विद्यार्थी व सफाई कामगारांना चहा पाणी देऊन करण्यात आले.
14/07/2025
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ओतूर एसटी स्टँड ते महाविद्यालय दरम्यान बस सेवा विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेली आहे.
30/10/2024
. पहाट दिवाळीची : साथ सुरेल स्वरांची
'दुसरा ऐतिहासिक दिवाळी पहाट संगीत महोत्सव'
~ सस्नेह निमंत्रण ~
🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥
‘दिवाळी पहाट’ ही संकल्पना लोकांना आवडली आणि त्यांनी ती स्वीकारली. या संकल्पनेला दिवाळीतील नवीन कपडे, फटाके, फराळाएवढे महत्त्व आले. दिवाळी पहाटमुळे सार्वजनिक गणेशोत्सव किंवा शिवजयंतीप्रमाणे दिवाळी हा सर्वात मोठा सणही काही प्रमाणात सामुदायिकपणे साजरा होऊ लागला. जोपर्यंत या जगात दिवाळी आहे तोपर्यंत ‘दिवाळी पहाट' ही गाण्यांची मैफल किंवा 'स्वर गंगेच्या काठावरती' ही कल्पना कायम राहील, नक्की या!
'स्वर गंगेच्या काठावरती - पर्व दुसरे'
🌹🌹 ओतूरनगरीत 🌹🌹
राष्ट्रीय पारितोषिक विजेती पार्श्वगायिका
👉 सावनी रविंद्र 👈
यांचा सुमधुर गीतांचा कार्यक्रम
'स्वर सावनी'
शनिवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी पहाटे ५•३० वाजता.
स्व. श्रीकृष्ण रामजी तांबे कुस्ती स्टेडियम, कपर्दिकेश्वर मंदिर, ओतूर
02/10/2024
अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाचे संस्थापक
माजी आमदार कै.श्रीकृष्ण रामजी तांबे उर्फ झांबरशेठ यांचा आज ५१वा स्मृतिदिन..
22/12/2023
अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाचे अत्याधुनिक पुस्तक वितरण व्यवस्थेसह सुसज्ज असे कै. श्रीकृष्ण रामजी तांबे ग्रंथालय
15/10/2023
अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालयाचे संस्थापक
कै.श्रीकृष्ण रामजी तांबे ऊर्फ झांबरशेठ यांच्या पुतळ्याचे पूजन करताना मा. आमदार पोपटराव गावडे, प्राचार्य आणि तांबे कुटुंबीय
14-10-23
14/10/2023
'जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते'
अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाचे संस्थापक
श्रीकृष्ण तथा झांबरशेठ तांबे यांचा आज ५० वा सृतिदिन
त्यानिमित्त संजय नलावडे यांनी कै. श्रीकृष्ण रामजी तांबे तथा झांबरशेठ तांबे यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला प्रकाश झोत
श्रीकृष्ण हे नाव म्हणायला जुन्या पिढीतील आजी आजोबांना काहीसे कठीण जायचे म्हणून घनदाट काळेभोर कुरूळे केस असलेल्या आपल्या नातवाला ते लाडाने 'झांबर' म्हणू लागले. तांबे परिवाराचा लाडका असलेला हा मुलगा पुढे संपूर्ण ओतूरमध्ये 'झांबर' या नावानेच प्रसिद्ध झाला. कोणतीही आर्थिक सुबत्ता नसलेल्या सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शांत, संयमी, मृदू व्यक्तिमत्व आणि समाजहित जोपासण्याची वृत्ती यामुळे जनसामान्यांच्या ह्रदय सिंहासनावर आरूढ झालेल्या झांबर नावापुढे लोकांनी आदराने 'शेठ' ही बिरुदावली लावली. धनाची नाही पण मनाची श्रीमंती लाभलेला लोकनेता म्हणून श्रीकृष्ण रामजी तांबे ऊर्फ झांबरशेठ तांबे पुणे जिल्ह्यातील उदयोन्मुख नेतृत्व म्हणून नावारूपाला आले. सामाजिक हितासाठी सर्वस्व पणाला लावणारे झांबरशेठ तांबे जनतेच्या मनातील लोकप्रिय आमदार झाले आणि जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते ठरले. परंतु नियतीने आकस्मिक घाला घातल्याने अल्पायुषी ठरलेल्या कै. झांबरशेठ तांबे यांचे जनतेच्या ह्रदयातील आदराचे स्थान पन्नास वर्षांनंतर सुद्धा तसूभरही कमी झाले नाही. ओतूर आणि पंचक्रोशीतील वाड्यावस्त्यांवरील अतिसामान्य गोरगरीबांच्या घरातील कुडाच्या भिंतीवर आजही कै. झांबरशेठ तांबे यांचा श्रद्धेने लावलेला फोटो दिसतो तेव्हा या लोकनेत्याला जनसामान्यांनी देवपण बहाल केले होते असे वाटते आणि नकळत आपले हात जोडले जाऊन तोंडातून शब्द बाहेर पडतात,'असा नेता पुन्हा होणे नाही.'
वारकरी संप्रदायाची मनोभावे सेवा करणाऱ्या रामजी सखाराम तांबे आणि रेऊबाई रामजी तांबे या दाम्पत्याला दिनांक २१ सप्टेंबर १९२८ रोजी पुत्ररत्नाचा लाभ झाला आणि त्यांनी आपल्या मुलाचे नाव श्रीकृष्ण ठेवले. तांबे परिवारातील वयस्कर मंडळींना मात्र 'श्रीकृष्ण' म्हणताना अडखळल्यासारखे व्हायचे म्हणून झांबर हे नाव त्या सर्वांना सोयीचे वाटले. लहानपणी ठेवलेली अशी नावे मुले मोठी झाली की आपोआप मागे गळून पडतात पण श्रीकृष्ण शाळेत जाऊ लागला तरी मित्रांच्याही तोंडात झांबर हेच नाव रूळले आणि पुढे ते आयुष्यभर सर्वतोमुखी कायम राहीले. प्राथमिक शिक्षण ओतूर येथे झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी झांबर तांबे हा विद्यार्थी जुन्नर येथे दाखल झाला आणि शिवाजी बोर्डिंगमध्ये राहू लागला. तालुक्याचे ठिकाण असलेल्या जुन्नर शहरातील वास्तव्यात झांबर तांबे या विद्यार्थ्याला अनेक राजकीय सभांचे, मोठ्या नेत्यांचे जवळून दर्शन घडले आणि इथेच त्यांच्या मनावर राजकारणाचा प्राथमिक संस्कार झाला. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या झांबर तांबे यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुणे येथे प्रवेश घेतला खरा पण वडिलांच्या निधनानंतर क्षणाक्षणाला त्यांना आई रेऊबाईंची आठवण व्याकूळ करत असे. मांजरवाडीचे सुप्रसिद्ध लोककलावंत आणि रेऊबाईंचे सख्खे भाऊ पांडुरंग मुळे यांनी अनेकदा आपल्या भाचाला समजावून सांगितले पण पुण्यातील महाविद्यालयीन शिक्षणात झांबर तांबे फारसे रमले नाहीत आणि पाच सहा महिन्यात शिक्षण अर्धवट सोडून कायमचे ओतूरला आईजवळ रहायला आले.
वडिलोपार्जित असलेली थोडीफार शेती करून आई रेऊबाई कष्टाने घराचा डोलारा सावरत होती परंतु मुलगा झांबर मात्र शेताकडे फारसा फिरकत नव्हता. ओतूरच्या मित्रमंडळीत रममाण झालेल्या झांबर तांबे यांना मात्र काहीतरी व्यवसाय सुरू करून आईला मदत करावी याचे पूर्णपणे भान होते. यातूनच पुढे त्यांनी मित्राबरोबर भागीदारीत काही काळ खताचे दुकान आणि त्यानंतर सायकल मार्ट व्यवसाय सुरू केला. हा सायकल व्यवसाय झांबर तांबे यांना सर्व ओतूरकरांशी जवळून परिचय करून देणारा आणि ओतूरच्या गावकारभारी मंडळींशी जवळीक साधणारा ठरला. ओतूरच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील कोणत्याही उपक्रमात उत्साहाने सक्रिय सहभागी होणारा तरूण कार्यकर्ता म्हणून झांबर तांबे यांची ओळख निर्माण झाली. त्यावेळी ओतूरमध्ये गावकारभारी असलेले हरि गेनूजी तांबे, भाऊ मास्तर डुंबरे, भिका आप्पा तांबे, गणपत रखमाजी तांबे, अहिनवेवाडीचे राजाराम पाटील डुंबरे, नानाजी डुंबरे इत्यादी जाणकार मंडळींच्या पारखी नजरेने झांबर तांबे या तरूण कार्यकर्त्याचे नेतृत्व गुण अचूक हेरले होते. सन १९५२ मध्ये याच जाणकार मंडळीनी सर्वानुमते श्रीकृष्ण रामजी तांबे तथा झांबर तांबे यांना वयाच्या अवघ्या चोवीसाव्या वर्षी ओतूर ग्रामपंचायत सरपंच पदावर विराजमान करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आणि खऱ्या अर्थाने एका राजकीय पर्वाचा प्रारंभ झाला.
याच दरम्यान उंब्रज येथील दांगट परिवारातील सुसंस्कारित कन्या लताबाईं बरोबर श्रीकृष्ण तथा झांबर तांबे यांचा विवाह झाला. श्रीकृष्ण तथा झांबर तांबे यांना सरपंच पदावर संधी देण्याचा ज्येष्ठांचा निर्णय खऱ्या अर्थाने ओतूरला सर्वांगीण प्रगतीकडे नेणारा ठरला. आपल्या सरपंच पदाच्या आठरा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक विहिरी खोदून त्यांचे बांधकाम केले. पूर्वी जुन्नर वेशीकडे असलेला एसटी बस थांबा गावात आणून कायमस्वरूपी एसटी स्टँड उभे राहिले आणि तासा तासाने एसटी बस धावताना दिसू लागली. लोकवर्गणीतून उभी राहिलेली प्राथमिक मराठी शाळा इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि सुसज्ज अशा प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन एकाच दिवशी नामदार बाळासाहेब देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले. फक्त ओतूरच नाही तर संपूर्ण पंचक्रोशीतील कोणाच्याही अडीअडचणीला धावणारा आणि सर्वांवर जीवापाड प्रेम करणारा म्हणून या लोकनेत्याला लोकांकडून आदराने 'झांबरशेठ' संबोधले जाऊ लागले होते. परंतु कुटुंबाकडे आणि तब्बेतीकडे दुर्लक्ष होते म्हणून घरी वृद्ध आई रेऊबाई मात्र काळजीपोटी चिडचिड करत, 'कशासाठी लष्कराच्या भाकरी भाजतोस' असा त्रागा करायची. ग्राम विकास मंडळ, ओतूर संस्थेच्या अध्यक्ष पदावर प्रदिर्घ काळ काम करण्याची संधी त्यांना लाभली. झांबरशेठ तांबे यांच्या प्रयत्नातून डिंगोरे, उदापूर आणि धोलवड येथील विद्यालये सुरू झाली आणि हजारो विद्यार्थी व खासकरून विद्यार्थीनींसाठी ही विद्यालये वरदान ठरली.
माणसं जोडण्याची कला अवगत असल्यामुळे दळणवळणाची फारशी साधन सुविधा उपलब्ध नसतानाही झांबरशेठ तांबे यांनी प्रस्थापित केलेला अफाट जनसंपर्क यामुळे अल्पावधीतच ते जुन्नर तालुक्यातील एक लोकप्रिय नेते म्हणून नावारूपाला आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यात सन १९६२ साली स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना झाली आणि झांबरशेठ तांबे यांच्या नेतृत्वाला ओतूर - मढ गटाचे सदस्य म्हणून पुणे जिल्हा परिषदेत निवडूण देण्याची संधी जनतेला मिळाली. समाजासाठी निस्वार्थपणे अहोरात्र झटणारा आणि असामान्य नेतृत्व गुणांमुळे जनतेच्या गळ्यातील ताईत बनलेल्या झांबरशेठ तांबे यांची जुन्नर तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून एकमताने निवड झाली. या काळात आदिवासी समाजाच्या अनेक समस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. झांबरशेठ तांबे यांच्या सभापती पदाच्या कार्यकाळात बोडके नगर, जुन्नर येथील पंचायत समितीच्या इमारत उभारणीसाठी दानशूर गणपतराव बोडके यांनी आपली जागा दिली. आजच्या काळात हास्यास्पद वाटेल परंतु त्यावेळी सभापती आणि बीडीओ (BDO) यांना प्रवासासाठी दोघांमध्ये एकच जीप उपलब्ध होती आणि बीडीओंच्या मनात आले तर कधी कधी शांत, सुस्वभावी, मितभाषी सभापती झांबरशेठ तांबे यांना त्या जीपमधून प्रवास करण्याची दुर्मिळ संधी प्राप्त होत असे. ओतूर ते जुन्नर हा तीन नद्या ओलांडून जाणारा जिकिरीचा प्रवास असूनही सभापतींनी अनेक लोकोपयोगी योजना जुन्नर तालुक्यात कार्यान्वित केल्या. एके दिवशी तांबे परिवारातील एका घराला आग लागली आणि त्या जळीतामध्ये सभापती झांबरशेठ तांबे यांचे घरही जळून खाक झाले. सभापती पदावर असतानाच आई रेऊबाईंच्या निधनाचा फार मोठा आघातही त्यांना सहन करावा लागला.
सन १९६७ मध्ये पुन्हा एकदा झांबरशेठ तांबे आळे - पिंपळवंडी गटातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. देशाचे नेते मा. यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या संकल्पनेतील कुकडी प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणारांमध्ये झांबरशेठ तांबे यांचे नेतृत्व अग्रेसर राहिले. कुकडी प्रकल्पामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला जाऊन पुढील कित्येक पिढ्यांचे कल्याण होणार होते. जुन्नर तालुक्यातील गोरगरीबांच्या मुलांना मुंबई पुणेसारखे दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ओतूर येथे काॅलेज व्हावे असे स्वप्न झांबरशेठ तांबे यांनी अनेक वर्षे उराशी बाळगले होते. प्रत्यक्षात मात्र काॅलेजसाठी १९६७ पासून त्यांनी पुणे विद्यापीठाकडे पाठपुरावा सुरू केला आणि कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद संस्थेमार्फत तीन वेळा विद्यापीठाकडे अर्ज दाखल केले. ओतूरला अजून साधे एसएससी चे परीक्षा केंद्र सुद्धा नाही या सबबीखाली परवानगी नाकारली गेली तर कधी फक्त तालुक्याच्या ठिकाणी काॅलेजला परवानगी दिली जाते, ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात परवानगी देण्यात येत नाही अशा विविध सबबी सांगण्यात येत असत. कोणतीही बाब त्रास व कष्ट घेऊन मिळविण्याची सवय असलेला हा लोकनेता नाउमेद न होता ओतूरला एसएससी चे परीक्षा केंद्र मिळविण्यात यशस्वी झाला. काॅलेजला परवानगी मिळण्याअगोदरच लोकवर्गणीतून रोख दीड लाख रुपये उभे करण्यात आले होते. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या सहकार्याने स्वतःची जमीन तारण ठेवून साडेतीन लाख रुपये किंमतीच्या इमारत बांधकामाची केलेली तयारी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप यांचेमार्फत पुणे विद्यापीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
तथापि विद्यापीठाकडे केलेल्या कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या मागणीमध्ये अडचण आणण्यासाठी पुन्हा एकदा अचानकपणे दुरूस्ती सुचविण्यात येऊन त्यामध्ये वाणिज्य शाखेऐवजी विज्ञान शाखेचा समावेश करण्यात आला. विज्ञान शाखेच्या अवाढव्य खर्चाचे शिवधनुष्य पेलण्याचा निर्धार झांबरशेठ आणि ओतूरकरांनी केला. अखेरीस ओतूर काॅलेजला परवानगी मिळाली खरी परंतु सहा महिन्यांत सुसज्ज प्रयोगशाळेसह इमारत तयार झाली पाहिजे अशी अट विद्यापीठाकडून घालण्यात आली. यासाठी आर्किटेक्ट सुधाकर पन्हाळे यांनी विनामूल्य डिझाईन आणि आराखडा बनवून दिले. पुणे येथील साठे आणि कंपनीला इमारत बांधकामाचे काॅन्ट्रॅक्ट देण्यात आले. साठे आणि कंपनीकडून वेळकाढूपणा होत असल्याचे लक्षात आल्यानंतर झांबरशेठ तांबे यांनी दैनिक सह्याद्रीचे संपादक आणि खासदार अनंतराव पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. खासदार महोदयांनी श्री. साठे यांची कडक शब्दात कान उघाडणी केली आणि काम वेळेत पूर्ण झाले. दिनांक ६ ऑक्टोबर १९७० रोजी भारताचे अर्थमंत्री मा. यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या शुभहस्ते काॅलेजच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. सदरप्रसंगी आपल्या भाषणात चव्हाणसाहेबांनी श्रीकृष्ण तथा झांबरशेठ तांबे यांच्या नेतृत्वगुणांची आणि चिकाटीची तोंडभरून स्तुती केली आणि अर्थ मंत्रालयाकडून दहा हजार रूपये देणगी जाहीर केली. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात उभे राहिलेले पहिले विज्ञान महाविद्यालय ओतूरचे वैभव ठरले.
सन १९६२ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपासून अणे माळशेज घाट निर्मितीचा विषय चांगलाच तापला होता. ओतूर काॅलेजबरोबरच झांबरशेठ तांबे यांनी माळशेज घाट निर्मितीचा पाठपुरावा सुरू केला होता. माळशेज घाट झाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्यांमध्ये श्रीकृष्ण तथा झांबरशेठ तांबे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. माळशेज घाटामुळे मुंबईची बाजारपेठ जवळ येऊन जुन्नर तालुक्याचा सर्वांगीण विकास साधला जाणार होता. महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री नामदार श्री. शंकरराव चव्हाण आणि ओतूर काॅलेजसाठी सर्वोतोपरी सहकार्य करणारे पुणे जिल्ह्याचे नेते मामासाहेब मोहोळ यांच्या शुभहस्ते माळशेज घाट निर्मितीचे भूमिपूजन करण्यात आले होते. झांबरशेठ तांबे एक वाॅटर बॅग घेऊन घराबाहेर पडायचे आणि एसटीने मढपर्यंत येऊन तेथून पुढे एखाद्या कार्यकर्त्याच्या सायकलवर बसून घाटापर्यंत पोहचायचे. माळशेज घाट निर्मितीचे काॅन्ट्रॅक्ट दिलेल्या नाशिकच्या 'अडके कन्स्ट्रक्शन' कंपनीच्या श्री अडके यांना सातत्याने सूचना देत उभं राहून कामावर बारकाईने लक्ष ठेवण्याचे काम झांबरशेठ तांबे यांनी केले. ओतूर काॅलेजचे काम पूर्णत्वास जात असतानाच माळशेज घाट रस्ता वेगाने आकारास येत होता. अशातच सन १९७२ च्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आणि गेली अनेक वर्षांची तपश्चर्या फळाला आली. काॅंग्रेस पक्षश्रेष्ठींनी जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून श्रीकृष्ण तथा झांबरशेठ तांबे यांची उमेदवारी जाहीर केली.
ओतूर आणि पंचक्रोशीतील प्रत्येक माणूस झांबरशेठ तांबे यांच्या प्रचारासाठी घराबाहेर पडलाच पण राजकारणाशी काडीचाही संबंध नसलेल्या वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींनी कीर्तन, प्रवचनातूनही झांबरशेठ तांबे यांचा प्रचार केला. भागवताचार्य ह.भ.प. सुमंतमहाराज नलावडे यांनी तर उघडउघड झांबरशेठ तांबे यांच्या बरोबर फिरून निवडणूक प्रचारात सहभाग घेतला. अखेरीस श्रीकृष्ण रामजी तांबे तथा झांबरशेठ तांबे यांना डॉ जगदीश फुले यांच्यावर ६१०२ मताधिक्याने विजयी घोषित करण्यात आले. आमदार पदाचा आनंद फार काळ टिकला नाही कारण १९७२ च्या दुष्काळातील तीव्र झळांनी संपूर्ण महाराष्ट्र होरपळत होता. मुख्यमंत्री श्री. वसंतराव नाईक यांनी दुष्काळामुळे कोणाचाही मृत्यू झाल्यास तेथील आमदाराला जबाबदार धरले जाईल असा सज्जड दम सर्व आमदारांना दिला होता. संवेदनशील मनाचे आमदार झांबरशेठ तांबे अहोरात्र वाड्यावस्त्यांवर फिरून जनतेच्या समस्या जाणून घेऊन धीर देत होते. याकाळात रोजगार हमी योजना अंतर्गत महाराष्ट्रातील सर्वाधिक कामे जुन्नर तालुक्यात आणण्यात आमदार झांबरशेठ तांबे यशस्वी ठरले. रोजगार हमी योजनेतूनच कोपरे मांडवे - मुथाळणे या नागमोडी घाटाचे काम आणि बदगी - बेलापूर घाटाचे काम आमदार झांबरशेठ तांबे यांच्या प्रयत्नातून पूर्णत्वास गेले. रोजगार हमी योजने अंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना ठेकेदार वेळेवर पैसे देतो की नाही याची सुद्धा शहानिशा आमदार झांबरशेठ तांबे आवर्जून करत होते. कधीतरी निवांत क्षणी आमदार झांबरशेठ तांबे आपल्या शशिकांत, अनिल, दिपक आणि किशोर या चारही मुलांना घेऊन बसायचे आणि शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे रहा. मला तुमच्यासाठी फार काही करून ठेवता येणार नाही असे प्रामाणिकपणे सांगायचे.
आमदार झांबरशेठ तांबे यांची धोलवड येथील ठकुबाई मोतीराम मुंढे या भगिनीचे मुंबई येथे निधन झाल्याने तिच्या दशक्रियेसाठी आमदार झांबरशेठ तांबे निवडणुकीनंतर पत्नी लताबाईंना पहिल्यांदाच बरोबर घेऊन मुंबईला आले होते. या मुंबई भेटीत काही शासकीय कामे मार्गी लावण्यासाठी रात्री आमदार निवासात थांबलेल्या झांबरशेठ तांबे यांना प्रचंड अस्वस्थ वाटू लागल्याने डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार सेंट जॉर्ज हाॅस्पिटलमध्ये हलविण्यात आले. ओतूर काॅलेजचा पाठपुरावा, माळशेज घाट निर्मितीचा ध्यास, तणावपूर्ण वातावरणातील विधानसभा निवडणुक, दुष्काळी कामांची दगदग यामुळे आमदार झांबरशेठ तांबे यांच्या तब्येतीची हेळसांड झाली होती. सहा सात दिवसांची झुंज अखेर अपयशी ठरली आणि दिनांक २६ सप्टेंबर १९७३ रोजी आमदार श्रीकृष्ण रामजी तांबे तथा झांबरशेठ तांबे या जुन्नर तालुक्याच्या भाग्यविधात्याने वयाच्या केवळ ४६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सेंट जॉर्ज हाॅस्पिटलमध्ये जाऊन कै. झांबरशेठ तांबे यांच्या पार्थिवावर चंदनाचा हार अर्पण करून अंत्यदर्शन घेतले. ओतूरला मात्र भाद्रपद अमावस्या म्हणजे बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा करण्याची जोरदार तयारी सुरू होती. अचानक कांतीलाल वोरा यांचा फोन जोरजोरात खणखणला आणि पलिकडून डी. के. राजर्षी यांनी या दु:खद घटनेची बातमी सांगितली. क्षणार्धात ही बातमी वाऱ्यासारखी ओतूर आणि संपूर्ण जुन्नर तालुक्यात समजली आणि सर्वत्र शोककळा पसरली. महाराष्ट्राचे उदयोन्मुख युवा नेतृत्व नामदार शरदचंद्र पवारसाहेब स्वतः कै. आमदार श्रीकृष्ण तथा झांबरशेठ तांबे यांचे पार्थिव घेऊन ओतूरला अंत्यसंस्कारासाठी पोहचले. जुन्नर तालुक्याचा विकासपुरुष कै. श्रीकृष्ण रामजी तांबे तथा झांबरशेठ तांबे यांना हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून गोरगरीब जनतेने पवित्र मांडवी नदीच्या तीरावर अखेरचा निरोप दिला.
यानंतर झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत श्रीमती लताबाई श्रीकृष्ण तांबे या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या. यथावकाश माळशेज घाट पूर्णत्वास जाऊन मुख्यमंत्री वसंतराव नाईकसाहेब यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले तेव्हा आमदार श्रीमती लताबाई श्रीकृष्ण तांबे यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. ज्या माळशेज घाटाचे स्वप्न कै. झांबरशेठ तांबे यांनी पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कठोर परिश्रम घेतले त्या घाटातून एकदाही प्रवास करण्याची संधी नियतीने त्यांना दिली नाही. उलट त्यांच्या धर्मपत्नीवर त्या घाटाचे उद्घाटन करण्याची वेळ यावी यासारखा दुसरा दैवदुर्विलास नाही. हजारो विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविणाऱ्या ओतूर काॅलेजच्या प्रांगणात कै. श्रीकृष्ण तथा झांबरशेठ तांबे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण दिनांक १८ ऑक्टोबर १९९१ रोजी भारताचे संरक्षणमंत्री मा. शरदराव पवारसाहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. ओतूर काॅलेजच्या ग्रंथालयाला आमदार श्रीकृष्ण तथा झांबरशेठ तांबे यांचे नाव देण्यात आले.
आमदार श्रीकृष्ण तथा झांबरशेठ तांबे यांच्या स्मृतीदिनानिमित्त सन १९९६ पासून समाजासाठी असामान्य योगदान देणाऱ्या व्यक्तीला 'श्रीकृष्ण भूषण' पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. महापुरुषांच्या बत्तीस लक्षणांपैकी एक लक्षण म्हणजे उभे राहिल्यानंतर ज्या व्यक्तीचे हात गुडघ्यापर्यंत येतात त्या व्यक्तीला 'आजानबाहु' म्हणतात. प्रभु श्रीरामचंद्र पहिले आजानबाहु होते असे म्हणतात. कै.श्रीकृष्ण रामजी तांबे तथा झांबरशेठ तांबे हेसुद्धा आजानबाहु होते, म्हणूनच मृत्यूनंतर पन्नास वर्षांनंतरही जनसामान्यांच्या ह्रदयात त्यांचे स्थान कायम आहे.
कै. श्रीकृष्ण रामजी तांबे तथा झांबरशेठ यांना ५०व्या स्मृतीदिनी विनम्र अभिवादन ..
लेखक
संजय वसंतराव नलावडे
धोलवड, मुंबई
मोबाइल - ८४५१९८०९०२
25/05/2023
2023 12 वी निकाल
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे
अण्णासाहेब वाघिरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओतूर.
महाविद्यालयाचा शेकडा निकाल:- ९५.९७
विज्ञान:- १००%
वाणिज्य:-९८.६३
कला:-८४.८८
व्यवसाय अभ्यासक्रम:-९४.११
विभागावार पहिले तीन विद्यार्थी
विज्ञान शाखा:-
1)ठिकेकर साहिल रमेश - 91. 83%
2) सोमवंशी सुदर्शन प्रशांत - 87.83%
3)कोरे हर्षल चंद्रशेखर-87. 33%
वाणिज्य शाखा:-
1) शिंदे गौरी चंद्रकांत:- 84.33 %
2) हांडे दीक्षा देविदास:- 82.00 %
3) मस्करे प्रणाली राजेंद्र:-81.83 %
कला शाखा:-
1)कापसे आदीनाथ पांडुरंग-68.83%
2)भले गणेश रुपाभाऊ -67.17%
3)भवारी पुजा आनंदा - 67%
व्यवसाय अभ्यासक्रम:-
1) मोमीन नाजनीन हमजेखा:-77.33 %
2) भास्कर ओंकार विनायक :- 67.00%
3) ढेरंगे अनिकेत पोपट:- 63.00%
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन ...
25/08/2022
श्रावणी सोमवार निमित्ताने ओतूर येथे झालेल्या यात्रेमुळे झालेला कचरा व यात्रा परिसर स्वच्छता महाविद्यालयातील एनएसएस मधील स्वयंसेवकांनी दिनांक 24 /08/2023 रोजी केली केली. त्याची काही क्षणचित्रे