14/02/2026
‘सजगता आणि स्वनियंत्रणासह एआयचा वापर केला तर तो मानवजातीसाठी वरदान’ — प्रसाद शिरगावकर
पुणे, दि. १४ फेब्रुवारी: मित्र मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित स्वर्गीय आशा मोहनलाल शर्मा व्यवसाय केंद्र येथे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)’ या विषयावरील मार्गदर्शक व्याख्यान उत्साहात पार पडले. शनिवारी (दि. १४) सायंकाळी ६ ते ८ या वेळेत आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक व संगणक तज्ज्ञ मा. श्री प्रसादजी शिरगावकर यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना संबोधित केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या झपाट्याने वाढणाऱ्या प्रभावाचा आढावा घेताना शिरगावकर यांनी चीन व युरोपमधील स्वयंचलित रोबोट्सच्या वापराची उदाहरणे सादर केली. उद्योग, उत्पादन आणि सेवा क्षेत्रात एआयमुळे कार्यक्षमता व अचूकता कशी वाढते, याचे विश्लेषण त्यांनी केले. तसेच भविष्यातील ऑटोनॉमस (स्वयंचलित) वाहन तंत्रज्ञानामुळे रस्ते अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटण्याची शक्यता व्यक्त करताना संबंधित तांत्रिक बाबी सोप्या भाषेत स्पष्ट केल्या.
एआयच्या विविध अॅप्लिकेशन्सचा ऊहापोह करताना लेखन, मराठी लघुकथा निर्मिती, सारांश लेखन, व्हिडिओ निर्मिती, प्रोग्रामिंग आदी क्षेत्रांतील उपयुक्तता त्यांनी अधोरेखित केली. रोजगार, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, आरोग्य, नातेसंबंध आणि आत्मविकास या क्षेत्रांमध्ये एआयचा सकारात्मक व परिणामकारक वापर कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या अतिरेकामुळे उद्भवू शकणाऱ्या नैतिक व सामाजिक आव्हानांकडेही त्यांनी लक्ष वेधले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व केंद्राची माहिती श्री अमोघ परांजपे यांनी दिली. संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्वाती भावे, श्री दिलीप बापट, डॉ अरुणा शिवराम, श्री रमेश श्रीगौड, श्री शिरीष सुमंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राच्या निर्मितीमागील प्रेरणास्थान श्री सुरेश शर्मा, श्री सुरेश बापट तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, संस्थापक तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका सौ.भाग्यश्री सुपनेकर यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.