03/09/2022
गवतात उगवलेली अक्षरं - एक सुखद अनुभव देणारी आत्मकहाणी
आपल्या जीवनातील सर्वात मोठा संघर्ष असतो तो बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा. वय बदलतं तशी मानसिकता बदलत असते. त्यातूनच वैचारिक जडणघडण होत जाते. त्याच्याही अवस्था असतात. गतिशीलता असते. जे काम आपण स्वीकारलेले असते त्या कामाच्या प्रत्यक्ष गाभ्यात प्रवेश केल्यानंतर चिंतनातून, प्रत्यक्ष अभ्यासातून स्वीकारलेली कृती कार्यप्रवणतेशी घट्ट बिलगलेली असते. नीतिमूल्ये आणि प्रामाणिकतेची नाळ तुटू न देण्याचा निर्धार त्यामागे असतो. प्रत्येक घटनेचे महत्व समजून घेऊन समजावून सांगण्याच्या व्यवसायात चाळीस वर्षं कार्यरत राहिल्यानंतर जीवनशैली आणि जीवनमूल्ये यात पडत चाललेला फरक नक्कीच अस्वस्थ करणारा! याला कुणी पिढीतील अंतर म्हणून त्याकडे डोळेझाक करुन मोकळाही होईल, कदाचित होणारही नाही. परिवर्तन होत असते हे मान्य. व्हावे हेही मान्य. समाज गतिशील असतो. त्याचं एक सूत्र असतं. ते सूत्र विकास आणि मानवहिताशी जोडलेलं असतं. हा जोड तुटता कामा नये. तो तुटला तर आमूलाग्र बदलाचा दुराग्रह मातीमोल होऊ शकतो. याचीच शक्यता अधिक असते. समाजविज्ञानाचा अभ्यास तसंच काही सांगतो.
तसंच महावीर जोंधळे आपल्या गवतात उगवलेली अक्षरं या आत्मकहाणीतून सांगतात.
या पुस्तकात लेखकाला काय म्हणायचं आहे, सांगायचं आहे त्याचा गोषवारा या वाक्यांमध्ये आला आहे असं मला वाटतं. “गवतात उगवलेली अक्षरं” वाचताना अनेकदा डोळ्यातल्या पाण्यानं अक्षरं धुरकट झाली, अनेकदा लेखकाला काय म्हणायचं आहे असा विचार करत परत एकदा तोच परिच्छेद वाचला गेला. माणसं, निसर्ग, समाज, राजकारण, समाजकारण, मानसशास्त्र, नातेसंबंध अशा अनेक पैलूंचा धांडोळा घेत अत्यंत सहजसोप्या भाषेतली ही आत्मकहाणी वाचणं हा एक सुखद अनुभव आहे. मराठीतलं हे एक उत्तम आत्मचरित्र आहे हे नक्की. “गवतात उगवलेली अक्षरं” खरोखर गवतातून कशी निघाली ते चंद्रमोहन कुलकर्णी यांनी केलेल्या मुखपृष्ठावर पहाण्यासारखंच आहे.. “मनोविकास प्रकाशना”चं हे पुस्तक दिसायला आणि वाचायला देखणं झालं आहे.
#नीलांबरी_जोशी
२ सप्टेंबर २०२२