16/06/2021
डॉ.वसंतराव देशपांडे यांची श्री राम माटे यांनी *स्वर साधना* साठी घेतलेली मुलाखत ..
(संगीत साधना करणाऱ्या गायकांना उपयुक्त माहीती)
======================
*रियाज म्हणजे काय ?*
गायन असो किंवा कुठलीही "फाइन आर्ट" ज्याला आपण म्हणतो ती सगळीच कष्टसाध्य असते. चित्रकला घ्या,शिल्पकला घ्या,संगीत घ्या,संगीत हा नुसता सामूहिक शब्द झाला.. संगीतातील कुठलीही ब्रँच घेतली.. त्यातील वादन,नर्तन अथवा गायन घेतले तरी ते अपार कष्टानेच साध्य होते.. *रियाज* याचाच अर्थ मेहनत घेणे. रियाज हा उर्दू शब्द आहे..स्वतःवर मेहनत घेणे यालाच रियाज म्हणतात. त्यामुळे मेहनत म्हटलं म्हणून नेमकी कशाची करायची ?गाणं करायचं म्हणजे नेमके काय करायचे ? तर गाणं करायचं म्हटल्यावर प्रथम गळा सर्वार्थाने तयार पाहीजे. सर्वार्थाने म्हणजे गळ्याला एक प्रकारचं विशिष्ट वजन प्राप्त व्हायला पाहीजे..
*गळा तयार करणे म्हणजे काय?*
सुरुवातीला राग घोटत बसण्याची काहीच गरज नसते. जसं कोमल स्वर,तीव्र स्वर यांची स्वतंत्रपणे मेहनत भरपूर करावी. म्हणजे तो सूर केव्हाही,कधीही व कोणत्याही गतीमधे टाकला तर परफेक्टच लागला पाहीजे. त्यालाच गतीमानता देऊन तानेच्या अवस्थेपर्यंत तो स्वर नेला की तुम्ही तान मारलीच समजा ! तरी तानेतले सर्व सूर आपापल्या स्थानावर असतीलच हे समजू नका. कारण एकतर ते आपल्या स्थानापासून ढळलेले असतील किंवा चक्क घसरगुंडी होते त्याची..तसं न होता करेक्ट त्या स्थानावर तो सूर आहे की नाही,कितीही गतीमान टाकला तरी तो स्थानभ्रष्ट होत नाही ही अवस्था ज्यावेळेला तुमच्या गळ्याला प्राप्त होईल,त्यावेळी त्या गायक कलाकाराची *गळ्याची मेहनत* योग्य झाली म्हणता येईल.,
सात आणि पांच अशा बारा स्वरांवर संगीताचा संसार उभा आहे.. सर्वार्थाने लयीच्या दृष्टीने ,तानांच्या दृष्टीने गळ्याला एक आस प्राप्त व्हावी,दमसास वाढावावा..
*मेहनत अथवा रियाज किती करावा ?*
जर डोळसपणे प्रत्येक स्वराकडे लक्ष ठेऊन किंवा जे करणार आहात त्याची संपूर्ण जाणीव मनात ठेऊन जर मेहनत/रियाज केला तर जास्तीतजास्त सव्वा तास पुरे होतो..
*गायकासाठी पथ्यपाणी पाळणे जरुरी आहे का ?*
खाण्यापिण्याचा गाण्याशी काही संबंध नसतो..तुमच्या प्रकृतीधर्म कसा आहे,यावर ते अवलंबून आहे. तुमची प्रकृती सहन करणारी असेल तर तुम्ही थंड-गरम काही घेऊ शकता. ते खाल्यानंतर जर तुम्हाला खोकला येत असेल तर असे खाण्याच्या भानगडीत तुम्ही न पडलेलचं बरे. पण नार्मली तुमची प्रकृती उत्तम ,ठणठणीत असेल तर थोडंथोडं सर्व जेवणामधे सेवन केले तर त्याने तुमच्या गळ्यास काहीएक बाधा पोहोचणार नाही..
*स्टॕमिना(दमसास) वाढविण्यासाठी काय करावे?*
प्राणायाम जरुर करावा. अहो,गायकाचा प्राणायाम तसा होतच असतो.त्याशिवाय दमसास कसा वाढेल? पूरक केल्यानंतर कुंभक होतच असतो.रेचक तुम्ही किती प्रमाणात करायचा म्हणजेच तुमची तान किती वेळ टिकवायची त्यात प्राणायामच अनूभवाला येतो.तुम्ही श्वास घेतला किती?असं म्हणण्यापेक्षा आत कोंडून किती ठेवता अन् तो कोणत्या रेटने सोडता ,हेच प्राणायामाचे प्रिंसीपल तुम्ही गाण्यात वापरता. आणि म्हणूनच त्या रियाजात ही तान एका दमात आली पाहीजे.एकाच श्वासात अमूक तान/आलाप आला पाहीजे.एका श्वासातच एवढे बोल निघाले पाहीजेत.. यासाठीच गायकांनी प्राणायामातील *पूरक,कुंभक,रेचक* या क्रीयेचा जरुर अभ्यास करावा..
*मंद्र साधनेचा(खर्ज) अभ्यास करावा का ?*
मंद्रसाधनेची गायकाच्या प्रथमावस्थेत काही गरज नसते.. जी नैसर्गिक आवाजाची पातळी असेल ती पुरेशी असते..तसेही मंद्र(खर्ज) काही विशेष साधत नाही.. आपल्याकडे तीन सप्तक आहेत.पहीला मंद्र,दुसरा मध्यमा तर तिसरा तार सप्तक..रियाज करताना मंद्रातल्या मध्यमापर्यंत जा व तसेच तार सप्तकात पंचमापर्यंत जा.. एवढी जरी गळ्याची रेंज वाढविली तरी गाण्यासाठी पुरेशी होते...✍️
*लेखन--श्रीकांत खडके (गायक-संगीतकार )*