24/07/2022
शिक्षा सदन – स्मृतींचे मोहोळ
गोमंतक (24 जुलै 22)
मुकेश थळी
आपला पाया शाळा व शिक्षक घडवतात. हायस्कूलचं शिक्षण मी प्रियोळच्या शिक्षा सदन हायस्कूलात घेतलं. गोवा मुक्तीनंतर गोव्यात गावोगावी अगोदर प्राथमिक शाळा नंतर हायस्कूलं सुरू झाली. सेंत्रु एदुकादोर सोसायटीने पांच हायस्कूल्स सुरू केली. प्रियोळ, केरी, गावणे, कुंडई, पंचवाडी. शिक्षा सदनात माझे मामा, मावशी शिकल्या होत्या. मी फार लहान होतो. त्यांच्यासमवेत स्नेहसंमेलनाला जात होतो. तिथं कोंकणी संशळ कल्लोळ पाहिलं. मुख्याध्यापक सुमंत केळेकर यांचा ताकदी अभिनय पाहिला. हे बहुविध कलाकार मुंबईत शास्त्रीय गाणं शिकले होते. स्कूलात खेळ, विज्ञान प्रदर्शनं असे भरगच्च कार्यक्रम असायचेच. माशेलहून सुध्दा मुलं या स्कूलात शिकायला यायची.
नंतर 1973 साली मी पाचवीत प्रवेश घेतला. मुलं खूप असायची. पाचवीचे दोन्ही विभाग वर सांतेरी मंदिराकडील अग्रशाळेंत भरत. लाकडी पट्ट्या असलेली एक बाजू. दगडी चिऱ्यांचं प्रकरण. कौले प्राचीन कयल्यांची. सोसाट्याचा वारा आला अथवा फांदी पडली तर कौलं फुटून पाणी यायचं. छोटंसं छिद्र जरी वर झालं तर पावसाची गळती डोक्यावर व्हायची. दुरून चालत मुलं यायची. भरपूर भिजली तर सरळ घरी पाठवत. सुट्टी, मज्जा! पाचवी झाल्यानंतर सहावीत बढती दिल्यासारखे मुख्य इमारतीत बसवत.
तरीही बंदिस्त जागेत सांस्कृतिक कार्यक्रम अथवा वक्तृत्व स्पर्धा असल्यास त्या अग्रशाळेतच घेत. दोन वर्गामधलं लाकडी पार्टीशन काढून, बांक काढून त्याचा हॉल करत. तिथं आम्ही एकांकीका स्पर्धाही घेतल्या.
शिक्षा सदनाला एक वैभवशाली इतिहास आहे. कला, संगीत, खेळ अशी गौरवशाली परंपरा आहे. शाळेसभोवती निसर्गरम्य माहोल आहे. पावसाळ्यात वाघ मागे लागल्यासारखा तुरूतुरू द्रूतगतीने पळणारा ओढा शाळेमागे आहे. भक्ती ही शक्ती हा मंत्र जागवणारं सांतेरी देवीचं मंदीर वरच्या बाजूला आहे. वर टेकडीवर महान साहित्यीक रवीन्द्र केळेकरांचं भव्य घर. त्याच्यामागे डोंगर व पायथ्याशी जायांचे मळे. स्कूलाच्या परीघात माड, पोफळी, केळी, अननस, हिरवेगार शेतीचे गालिचे, थंडगार कुळागर असा जीव वेडापिसा करणारा हरीत प्रांत, अगदी शांत. विसावा आणि आराम यांचे हिंदोळे घ्यावे असे हे ठिकाण.
अशा या आल्हाददायक भवतालाच्या स्कूलात माझ्या व्यक्तिमत्वाची व हाडांची घडण झाली. पोषण झालं. चांगले शिक्षक मिळाले. संस्कारक्षम वयात मुलांवर काय बिंबवलं जातं हे महत्वाचं ठरतं. प्रमोद प्रियोळकर सर हे शास्त्रीय संगीताचं ज्ञान असलेले गायक. ते सकाळी एसेम्ब्लीच्या वेळी समूहगीते संपूर्ण विद्यार्थीवर्गाला शिकवायचे. शांत दांत वज्र कांत वंद्य हिंद देवते, हे बाकीबाबांचे गीत त्यांनी आम्हांला शिकवले. एका ताला- सुरात मुलांकडून घोटवून घेणं हा खेळ नव्हे. त्यांचीच चाल, संगीत रचना होती. अजून मला पाठ आहे. ती गोड रचना मी फार खुषीत असतो व शिक्षा सदनाच्या स्मृती-मोहोळात रमतो तेव्हा गुणगुणत असतो. शाळेच्या रम्य, स्मरणरंजनात्मक यात्रेत सहभागी होणं हा माझा विरंगुळा होय. स्मृतींचे कितीतरी आल्बम दिसू लागतात. दृश्यफितीसारखे सरकत राहतात.
हल्लीच या माझ्या स्कूलच्या मुख्याध्यापिका शोभा प्रियोळकर यांनी मला शिष्यवृती प्रदान सोहळ्यात मुख्य पाहुणा म्हणून बोलावलं. माजी विद्यार्थ्यांकडून मुलांना प्रेरणा मिळावी हा त्यांचा हेतू. बाहेर पाऊस होताच. आतून भावभावनांच्या आठवणींचा पाऊस जोरकसपणे उसळी मारून बाहेर येऊ पाहत होता. मी हेलावून गेलो. अप्रतिम सोहळ्याचं आयोजन मी माझ्या शाळेत पाहत होतो. दोन वर्षांनी सांस्कृतिक कार्यक्रम होत होता. रांगोळी, सजावट, संगीत...लाजवाब. संगीत शिक्षक आता शाळेत येतात. आरंभी दोन गीतं सादर केली. त्यात माझ्या आवडत्या हंसध्वनी रागावर स्वागतम हे गीत होतं. मुलांचं कौतुक करावं तितकं कमी. खास पेहरावात मुली गात होत्या. आनंदाची तीव्रता वाढली.
शिक्षिकांनी आपापल्या सादरीकरणाची तयारी चोख केली होती. त्यांच्या निवेदनाचे उच्चार व वक्तृत्व यात उर्जा, खणखणीतपणा व स्वच्छता होती. टीव्हीवर बातम्या वाचू शकतील इतकी. नाटककार उल्हास नायक भेटले. शिक्षिका सुचिता सतरकर ही गुणी निवेदिका आहे. मला विसर पडलेल्या माझ्या कवितांच्या पंक्ती त्यांनी पेश केल्या. शालेय आठवणी जागवाव्या अशी विनंती त्यांनी मला भाषणापूर्वी केली. मला भावूक झाल्यासारखे वाटले. गहिवरून आलं. कंठ दाटला. मी सुचतील ते स्मृती कपाटातील कप्पे मुलांना उलगडून दाखवले.
शिक्षा सदनने मला घडवले. मुख्य़ाध्यापक रवीन्द्र नमशीकर यांनी मला प्रेम, उत्तेजन दिले. ते हुशार होते. त्यांच्याशी एकाडेमीक वाद घालण्यास मला आवडे. ते संतापून चिडत व लालबुंद होत. मला वक्तृत्व स्पर्धा व कथाकथन स्पर्धेत स्वत: घेऊन जात.
कला अकादमीतील एकांकीका स्पर्धेत आम्ही एकांकिका सादर करत. मुलींचा गट समई नृत्य व इतर नृत्य सादर करीत. बक्षिसे आणली. आनंद आणला.
माझी प्रगती पाहून नमशीकर सरांनी माझ्यासाठी शिक्षकांच्या खास बैठका घेतल्या. अखेरीस 1979 मध्ये एस.एस.सी परीक्षेत मी गोवा बोर्डात दुसरा आलो तेव्हा ते माझ्यापेक्षा जास्त हर्षित झाले. त्यांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू मी विसरू शकत नाही. गुणवत्तेच्या स्तरावर शिक्षा सदन पहिल्यांदाच चमकलं होतं. पुलकीत शिक्षक हर्षभरीत झाले.
तथापि शिष्यवृत्ती सोहळ्यानिमित्त माझ्या शाळेची भरभराट पाहून मला अत्यानंद झाला. शिशुवाटिका सुरू झाली आहे. सभागृह फारच सुंदर. विशेष कारण बाह्य निसर्गसौंदर्य व हिरवाई.
कार्यक्रम संपवून मी बाहेर आलो. शाळेचं आणि आपलं एक प्रेमळ, मधुर, तरल, सुंदर नातं असतं. ज्या शाळेत मी शिकलो, जिथं माझी बुन्याद घडली, त्या शाळेचे चिरे कुणी तरी आणले होते. त्या शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून मी त्या वास्तूला, संस्थेला देणं लागतो ही भावना प्रखरतेने प्रज्वलीत झाली. डोळे पाणावले. पावसाची रिमझिम चालू होती. डोळ्यातील पाणी की ‘वावझडी’चं पाणी हे निरोप देणाऱ्या शिक्षकांना नाही कळालं, ते बरं झालं...