16/10/2025
"कठोर गुरू तुमचा मार्ग सोपा करत नाहीत, पण तुम्हाला इतके सक्षम बनवतात; की कोणताही मार्ग कठीण वाटत नाही."
२६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी सात वाजता राजदूत मोटारसायकलवर एक ८० वर्षाचा अतिशय उत्साही तरुण आमच्या शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्या दाम्पत्याने वयाची केवळ पंचाहत्तरी ओलांडली होती. ते दाम्पत्य म्हणजे माझे आयुष्यातील प्रथम क्रीडाशिक्षक आदरणीय श्री. रघुनाथ चव्हाण सर.
त्यांना पाहताच माझ्या मनात पूर्वस्मृती तरळू लागल्या.
आमची शाळा खेळास अत्यंत जास्त प्राधान्य देणारी नाशिक जिल्ह्यातील एक नामवंत व नावाजलेली शाळा होती. खेळात दरवर्षी धावणे ते धनुर्विद्यापर्यंत
अशा विविध खेळात राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक घेऊन येणारे विद्यार्थी या शाळेने घडविले आहेत. भाऊसाहेबनगर म्हणजे निफाड साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची वस्ती. हे म्हणजे न धड गाव होते ना शहर ! तिथल्या स्वर्गीय सुंदर शाळेच्या सुंदर शाळेत विद्यार्थांना घडविणारे शिक्षक व शिक्षकांना महात्वाकांक्षी बनविणारे मुख्याध्यापक म्हणजे आदरणीय श्री. करंडे सर. अतिशय मेहनती, कडक शिस्तीचे अथक कष्ट करणारे.
मी या शाळेत पाचवीत प्रवेश घेतला आणि आदरणीय श्री चव्हाण सरांचे खोखो खेळासाठी शिष्यत्व स्वीकारले. सरांनी सुरुवातीला भारतीय खेळ परंपरांची माहिती देऊन खोखो खेळाची प्रत्यक्ष मैदानावर सर्व माहिती देऊन आमच्या प्रशिक्षणाला सुरुवात केली. खो-खो हा खेळ शारीरिक तंदुरुस्ती, निर्णय क्षमता, सांघिक वृत्ती, चपळता, आणि रणनीती यांचे सुंदर मिश्रण आहे.
माझे वडील महाराष्ट्रातील नावाजलेले गायक व आमच्याच शाळेत संगीत शिक्षक असल्यामुळे आमच्या घरात संगीताचा रियाज दररोज सायंकाळी चालत असे.
मी आता दररोज खेळायला जाणार अशी घोषणा केल्यामुळे तशी त्यांच्या चेहर्यावरील रेघही हलली नाही. मला कोणी गांभीर्याने घेतले नाही. आमचे क्रीडाशिक्षक श्री चव्हाण सरांनी मात्र दुसऱ्या दिवशी निवडलेल्या सर्व नवखेळाडूंना क्रीडा साहित्य खोलीत बोलावून खेळासाठी आमच्या मापाचे दोन दोन टी शर्ट्स व शाॅर्टस निवडून घ्यायला सांगितले. नवीन कपडे मिळाल्यामुळे आमचा आनंद गगनात मावेना.
माझी आई फार सुज्ञ आहे. ती मला काही बोलली नाही. फक्त संध्याकाळी सातच्या आत घरी येत जा, नाहीतर कंबरडं मोडीन एवढंच बोलली. मी मात्र तेवढंही न ऐकल्यासारखं केलं. मी आनंदात मग्नच होते. खेळायला जाण्याच्या आनंदापुढे आईच्या धमकीला घाबरणारी मुलगी मी नव्हतेच मुळी !
दुसऱ्या दिवशी मी खेळाचा गणवेश घालून ग्राऊंडवर गेले आणि आमच्या खोखो च्या रीतसर प्रशिक्षणाला सुरुवात झाली. सर अत्यंत दूरदृष्टी असलेले निष्णात क्रीडाशिक्षक होते. सर कडक शिस्तीचे होते. खेळात कुशाग्र बुद्धीचा सजगतेचा वापर कसा करायचा याबद्दल ते खेळाडूंना सतत मार्गदर्शन करायचे. सरांना बेशिस्त, ग्राऊंडवर उशीरा येणं, स्पोर्ट्स युनिफॉर्म न घालता ग्राऊंडवर येणं, दांड्या मारणं, गप्पा मारणं वगैरे अजिबात चालायचे नाही. आम्ही सरांना आदरयुक्त घाबरायचो. सर विद्यार्थांवर मनापासून प्रेम करायचे. स्वतः सर्वांच्या आधी ग्राऊंडवर यायचे आणि सगळ्यात शेवटी जायचे. सरांनी शेकडो विद्यार्थी खेळाडू म्हणून घडविले. विद्यार्थांचे मनोबल वाढविण्यात सरांना नेहमीच यश यायचे. दोन वर्षाच्या प्रॅक्टीसनंतर आमचा संघ इतका उत्कृष्ट तयार झाला, की हरणे आम्हास माहितीच नव्हते. स्पर्धेवेळी सरांची दोन रुपे आम्हाला पहायला मिळायची. एक म्हणजे अतिशय स्ट्रीक्ट कोच आणि दुसरे म्हणजे अगदी आईसारखे प्रेमळ मातृहृदयी सर. आम्हास स्पर्धेच्या निमित्ताने विविध गावी सर घेऊन जायचे. आमच्यासाठी लागणारी औषधे वगेरे महत्वाच्या गोष्टी सर सोबत ठेवायचे.
खेड्यात कुठल्या तरी शाळेत झोपायला लागायचे. कधी बसचा, कधी ट्रेनचा प्रवास. हाॅटेल वगैरे अशा काही सुविधा त्यावेळी नसायच्या. आमचा गेम सांघिक असल्यामुळे आम्हा मुलींच्या टिमचे एकत्र जेवण, एकत्र प्रवास, एकत्र झोपणे , एकत्र राहणे त्यातून आमचे राग, लोभ, रुसवे, फुगवे , आजारपण, आळशीपण, घरापासून दूर आल्यानंतर हट्टीपणा, आई वडीलांच्या आठवणीने व्याकुळ मुली असं सगळं सरांनी झेललं आहे. आमचं खऱ्या अर्थाने संगोपन सरांनी केलंय. सर म्हणजे आमचे गुरु, त्राता, माऊली, सखा सगळं काही सरच. मी तर माझ्या मनातील प्रत्येक विचार सरांशी बोलायचे. मला सर अगदी माझ्या आजोबांसारखे वाटायचे. सर आमची इतकी काळजी घ्यायचे की क्वचितच कोणी शिक्षक अशी काळजी घेतील.
विशेष म्हणजे एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे; ती म्हणजे आमच्यासोबत सरांव्यतिरिक्त स्रीशिक्षिका कधीही स्पर्धेच्या वेळी सोबत आलेली मला आठवत नाही. सरांनी कमावलेला पालकांचा, शाळा व्यवस्थापनाचा, विद्यार्थीनींचा विश्वास हा शब्दातीत आहे. आज सख्ख्या नातेवाईकांसोबत सुद्धा कधी मुलींना एकटे पाठवत नाही. त्याकाळात जेव्हा फोन उपलब्ध नव्हते, संपर्काचे सहज मार्ग उपलब्ध नव्हते, अशा काळात सर वीस तीस मुलींचे खो-खोचे दोन दोन संघ घेऊन लांब लांब प्रवास करायचे. स्पर्धांमुळे आम्ही वयाच्या बारा ते पंधरा वयोगटात अवघा महाराष्ट्र पाहिला होता. तोही आईवडीलांशिवाय आणि शाळेच्या पैशातून. आमच्या शाळेस सुवर्ण दिवस दाखवणारे आमचे कडक शिस्तीचे चव्हाण सर त्यावेळीही आम्हास अतिशय प्रिय होते.
मला सरांनी एकदा अतिशय उत्तम संधी मिळवून दिली. ठाणे येथे नॅशनल ॲथलेटीक्स गेम्स चॅम्पियनशीप स्पर्धेत सर आम्हास घेऊन गेले होते. मला सरांनी विचारले, 'आठशे मीटरमध्ये धावशील का ?' मी हो म्हटले. सरांनी वैयक्तिक आठशे मीटर व रिलेमध्ये माझे नाव घातले. मला आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव मिळवून दिला. मी दादोजी कोंडदेव मैदानावर शायनी विल्सन आणि पी. टी. उषासोबत एकाच टीममध्ये, एकाच गेममध्ये धावली, राष्ट्रीय स्तरावर धावपटू म्हणून जिल्ह्यात नाव कमावले ते चव्हाण सरांमुळेच. खोखोची राष्ट्रीय खेळाडू झाले ते चव्हाण सरांमुळेच. अतिशय आनंदी बालपण मिळाले. शरीर निकोप, सुदृढ व काटक बनवून आयुष्यभराची शिदोरी दिली ती चव्हाण सरांनीच. आपण जेव्हा घडत असतो, तेव्हा आपण लहान असतो. आपल्याला विद्यार्थीदशेत भविष्याबद्दल फार काही कळत नसते. आपले शिक्षकच आपल्या भल्याबुऱ्याचा विचार करुन आपल्याबाबत निर्णय घेतात. अर्थात असे शिक्षक दुर्लभ असतात. 'दुर्लभ असतो तो असा शिक्षक, जो केवळ ज्ञान देतो असे नव्हे तर जीवन घडवतो.'
मी आठवीत असताना एकदा सोलापूर शहरात राज्यस्तरीय स्पर्धा होत्या. 'सोलापूर माझे आजोळ आहे. मी सरांकडे हट्ट केला, की मला मामाला भेटायला जायचे आहे.' मी शांत असले तरी फार हट्टी होते. सर एक दिवस माझ्याशी काहीच बोलले नाही. मी आजारी पडल्यामुळे मी टीममध्ये खेळत नव्हते. मला राखीव खेळाडू म्हणून ठेवले होते. मला फार दुःख झाले, तरी मी माझा हेका सोडायला तयार नव्हते. मग सरांनी मला समोर बसवले व मला त्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्या मी आजतागायत विसरले नाही. सर म्हणाले, ''इथं आपण नॅशनल्स खेळायला आलोय. नॅशनल्सला पोहचण्याआधी आपण कुठेकुठे खेळलो, कशी कशी मेहनत करुन किती किती स्पर्धा जिंकलो आणि या स्तरावर पोहचण्यासाठी कित्येक महिनोनमहिने मेहनत करत आहोत. तू अतिशय प्रतिष्ठित घराण्यात जन्माला आलीस, तुझे वडील नामवंत कलाकार आहेत. तू अभ्यासात हुशार आहेस. तू खेळाडू झाली नाहीस, तरी तुला उदरनिर्वाहाचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. तू अभ्यासात हुशार आहेस. तुला उत्तम नोकरी मिळू शकेल. खो-खो हा सांघिक खेळ आहे. यात सगळे खेळाडू तेवढेच तरबेज लागतात. सगळ्यांना एकजुटीने खेळावे लागते. एकानेही मनाने खचून चालत नाही. एकमेकांना जिंकवून देण्यासाठी जिगरबाज होऊन खेळावे लागते. आधी खेळ पूर्ण करायचा मग बाकीचे लाड. आज आपण हारलो तर तुला काहीच फरक पडणार नाही, पण बाकीच्या मुलींना खूप फरक पडेल. त्यांचे वडील कामगार आहेत. त्यांना खेळाच्या या राज्यस्तरीय सर्टिफिकेटचे फार फार महत्त्व आहे. या सर्टिफिकेटवर त्यांना नोकरी मिळेल. त्यांचे आयुष्य मार्गी लागेल. तू आता तेरा वर्षांची आहेस. तुला चूक बरोबर सगळे कळते. शहाणी हो. शहाण्यासारखं वाग. संघात एकमेकांसाठी खेळायचं असतं. जे करायचं ते एकमेकांसाठी करायचं. मैत्रीखातर, आपल्या शाळेखातर करायचं. त्यामुळे आता अंगातून हा मुडीपणा काढून टाक. परत परत अशी संधी मिळत नसते. तुझ्यात हा खेळ जिंकून देण्याची ताकद आहे. जो काही उत्तम खेळ दाखवायचाय तो तुलाच दाखवायचाय.' एवढं बोलून सर पुन्हा मौनात गेले. मी मात्र एकदम खाडकन जागी झाले, सजग झाले आणि माझ्यातले आजारपण पळून गेले. आम्ही उत्तम खेळलो आणि जिंकलोसुद्धा. त्या दिवशी मला कळले सर आमच्या भवितव्याचाही किती विचार करायचे. आज असे शिक्षक दुर्लभ आहेत.
सर फार म्हणजे फार कुटुंबवत्सल आहेत. फार मृदुभाषी आहेत. संत माऊलीप्रमाणे त्यांचे हृदय मातृत्वाने व्यापलेले आहे. सरांना मी त्यांच्या थोरल्या मुलीच्या लग्नात ढसाढसा रडताना पाहिलेले आहे. तर आमच्या शाळेच्या सहलीत आमच्या सोबत मनसोक्त गाणी गाताना ऐकले आहे.
सर हिंदी कविता, हिंदी गाणी भरपूर गायचे. सगळं त्यांचं तोंडपाठ असायचं. मला फार आश्चर्य वाटायचं की सरांचं हिंदी एवढं उत्कृष्ट कसं ? मला दहावीत गेल्यावर कळलं की सरांची आपल्या शाळेत क्रीडाशिक्षक म्हणून नियुक्ती असली तरी हिंदीचेही ते उत्कृष्ट शिक्षक आहेत. हे कळल्यावर मला फार फार भरुन आले होते, कारण तुम्हीच विचार करा, की आज शिक्षकास स्वतःचा विषय सोडून काही शिकवायला लावले तर अजिबात तयारी नसते. कारण ते कोणत्याच विषयात पारंगत नसतात. ज्या विषयाची पदवी असते, त्या विषयाचेही परिपूर्ण ज्ञान आजच्या शिक्षकांना नसते. असो. मला त्याविषयी इथे बोलायचे नाही; पण आम्हास लाभलेले उत्कृष्ट शिक्षक आठवले की आजच्या परिस्थितीबद्दल काळजी वाटते एवढंच.
श्री. रघुनाथ चव्हाण सर तथा तात्या यांना त्यांच्या नोकरीत अनेक उत्तमोत्तम पुरस्कारांनी सन्मानित केले गेले. अत्यंत महत्वाचा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, 'क्रीडामहर्षी ' पुरस्कार. सरांनी शालेय विद्यार्थ्यांच्या हृदयात जे अढळपद, आदर आणि असीम प्रेम प्राप्त केले ते आजतागायतही म्हणजे गेली चाळीस-पन्नास वर्षांत कमी झालेले नाही. आजही भाऊसाहेबनगर येथील त्या काळात शिकलेल्या विद्याभवनच्या विद्यार्थ्यांशी बोलले तर सर्वांच्या मनात सरांबद्दल भरभरून आठवणी जाग्या होतील.
लक्ष्मीमंगेश,
( विजयालक्ष्मी मणेरीकर. )
नाशिक, मो. ९८२२६८३७९९
09/08/2024
28/03/2024
27/01/2024
16/01/2024
16/01/2024
12/01/2024