25/09/2017
" सोनेरी पाने "
महाराष्ट्र समाज सेवा संघाच्या सत्तावन वा वर्धापनदिन त्यानिमित्ताने. . . . .. "इवलेसे रोप लावलेल्या दारी त्याचा वेलू गेला गगनावरी" आज संस्थेचा विशाल वृक्ष आपण सर्व जन पाहातच आहोत. आज संस्था ज्ञान, विज्ञानाच्या सर्व शाखांनी विस्तारली आहे.प्राथमिक ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी सर्व साधन सुविधांसह उभी आहे. नाशिक आणि जवळील परिसरात विविध ज्ञानदानाचे कार्य करण्यासाठी शाळा व विद्यालय सुरू केलेली आहेत.काही भागात छात्रालय ही सुरू आहेत सर्व ठिकाणी शाळा विद्यालयांना उत्तम प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आज शैक्षणिक व भौतिक विस्तारासोबतच संस्थेची गुणात्मक प्रगती वाखणण्याजोगी आहे. एखादा सोनेरी इतिहास घडवायचा असल्यास चांगल्या वर्तमानाची निर्मिती आवश्यक असते.त्यासाठी ५७ वर्षांपूर्वी सोनेरी पान लिहिले गेले. सामाजिक सेवेच्या ध्येयवादाने भारलेली चार माणसे एकत्र येतात तेव्हा त्यांच्या प्रयत्नातून निर्मिती होते विधायक कार्याची नाशिकमधील महाराष्ट्र समाज सेवा संघाची उभारणी देखील अशा पद्धतीने झाली आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून उभी राहिलेली महाराष्ट्र समाज सेवा संघ ही एक रचनात्मक संस्था.कै.माधवराव लिमये, कै.रावसाहेब,कै. कुसुमताई पटवर्धन, कै.शांताबाई लिमये,कै.विठ्ठलराव पटवर्धन,कै.कुमुदताई अोक,श्रीयुत.ना.सी.ि पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नातून उभारलेली ही एक शैक्षणिक व सामाजिक संस्था.आदर्श नागरिक निर्माण करण्यासाठी संस्कारक्षम करण्यातच विद्यार्थ्यांची मने त्यादृष्टीने घडली पाहिजे त्यांच्यात सामाजिक नैतिक मूल्यांची जोपासना केली पाहिजे म्हणून या उद्देशाने शिक्षण क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
ज्ञानाची तहान असणाऱ्यांसाठी ज्ञानगंगा आणण्यापासून तिचा प्रवाह अखंडीत सुरू राहण्यासाठी त्यांनी कधी प्रयत्नात कसूर केला नाही व कष्ट करताना कुठलीही सवलत घेतली नाही.या सर्वाच्या दूरदृष्टीने अमर्याद महत्वाकांक्षेमुळे सत्तावन्न (५७) वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचा वेलू आज खरोखर गगनावरी गेला आहे.
महाराष्ट्र समाज सेवा संघामार्फत चालवल्या जाणाऱ्या शैक्षणिक संकुलात बालसंस्कार केंद्रापासून विद्यालयीन शिक्षणाची व सर्वांगीण विकासाची सोय असल्याने या ठिकाणी शिकून मोठे झालेल्यांची लांबलचक यादी लांबतच राहते.फक्त शिक्षण देऊन शिक्षित माणूस निर्माण न करता सामाजिक ,सांस्कृतिक, आर्थिक,राजकीय,प्रशासनिक, अशा विविध क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या सुजाण नागरिकांची निर्मिती करण्याची कामगिरी संस्था संचलित विविध शाळा विद्यालयामार्फत अव्याहत सुरू आहे.पारंपरिक शिक्षणाप्रमाणे आकाशाला गवसणी घालू पाहणाऱ्या माहिती तंत्रज्ञानासारखे व व्यावसायिक शिक्षणाचे देखील विविध उपक्रम राबविण्यात संस्था सदैव अग्रेसर राहत असते.सुवर्ण महोत्सवाची वाटचाल पूर्ण करत असताना संस्थेला अनेक दिव्यातून जावे लागले आहे अनेक स्थित्यंतरे घडली असूनही महाराष्ट्र समाज सेवा संघाचा महाकाय वटवृक्ष स्थितप्रज्ञसारखा राहून हजारोंच्या मायेची सावली बनला आहे.शैक्षणिक अभिसरणाच्या प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महाराष्ट्र समाज सेवा संघाच्या या सुवर्णमहोत्सवी नंतरच्या वर्धापन दिन पाहण्याचे भाग्य आजच्या पिढीला लाभले आहे.महाराष्ट्र समाज सेवा संघाची स्थापना झाल्यानंतर आज विविध स्तरांवर विस्तार झालेला आहे.कोणत्याही संस्थेच्या जीवनातील सत्तावन वर्षांच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण असते.
संस्थेच्या जीवनातील रौप्य सुवर्ण-हिरकमहोत्सवी वर्ष ही केवळ महोत्सवाचीच वर्ष नसतात.तर श्रणभर थांबवून गतकाळातील वाटचालीचा आढावा घेण्याचा श्रण असतो.प्रत्येक संस्थेचे काही अंगभूत वैशिष्ट्ये असतात तशी काही वैशिष्टे महाराष्ट्र समाज सेवा संघाची आहेत.संस्थेला कोणताही राजकीय चेहरा नाही.राजकीय निरपेक्ष तत्व जोपासून आपली वाटचाल संस्थेने केलेली आहे.कोणत्याही राजकीय विचारांच्या दलदलीत न अडकता आपली सात्विक शैक्षणिक संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.शिक्षण व राजकारण यांची गल्लत होऊ नये.शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात राजकारण असू नये असा सात्विक विचार व संस्थेचे पदाधिकारी जोपासत आहे.ही एक चांगली शैक्षणिक संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न संस्थेने केलेला आहे.त्याचबरोबर संस्थेने सातत्याने सामाजिक दृष्टिकोन जोपासलेला आहे.
समाजाभिमुखता हे संस्थेचे आणखी एक वैशिष्टय़े आहे.
प्रबोधनाच्या चळवळींच्या कार्यक्रमांना नेहमीच संस्थेने सहकार्य केले आहे.या मागे उद्देश केवळ विचारांची देवाण घेवाण व्हावी सामाजिक,शैक्षणिक व सांस्कृतिक प्रबोधन व्हावे हा होता.म्हणून संस्थेने सोबत चांगल्या कामांना मदत केली व प्रोत्साहन दिले आहे.परिसरातील विविध शैक्षणिक,क्रीडा, सांस्कृतिक मंडळांना कार्यक्रम घेण्यासाठी विद्यालयात जागा उपलब्ध करून दिली.सगळ्याच विविध विचारसरणीच्या चळवळीच्या कार्यक्रमांसाठी संस्थेने आपले व्यासपीठ खुले ठेवले आहे.
आज संस्थेचा हा महाकाय व्याप सांभाळण्यासाठी या संस्थेचे पदाधिकारी सातत्याने प्रयत्न कर असतात त्यात संस्थेचे अध्यक्ष मान्य.श्री.चंद्रकांत धामणे, उपाध्यक्ष श्री.विजय डोंगरे,सचिव.श्री.सुधाकर साळी,सह सचिव.श्री. शांताराम अहिरे,कोषाध्यक्ष श्री निरंजन,श्री.श्रीपाद कुलकर्णी,श्री. मिलिद चिंधडे,श्री.कौस्तुभ मेहता,इतर पदाधिकारी.त्याचप्रमाणे पालकांचे व संस्थेविषयी प्रेम असणारे अनेक व्यक्तींचे सहकार्य औपचारिकता अनौपचारिकरित्या लाभत असते.आजमितीला संस्था संचलित विविध शाळा विद्यालय नाशिक व परिसरात आपल्याला दिसतात.
संस्था संचलित शाळां-
१)रचना माध्यमिक विद्यालय
२)रचना प्राथमिक विद्यालय
३)रचना बालवाडी
४)अपंग एकात्म शिक्षण योजना
५)नवरचना माध्यमिक विद्यालय
६)नवरचना प्राथमिक विद्यालय
७)नवरचना बालवाडी
८)आर.एम.मेहता नर्सरी स्कूल
९)नवरचना इंग्लिश मेडियम स्कूल
१०)रावसाहेब अोक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (सरकारमान्य)
११)श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालयात
१२)कर्णबधीर शिशूंचे निदान व शिक्षण केंद्र
१३)कै.मुलीला ताई आणि दत्तात्रेय प्रधान व्होकेशनल केंद्र
१४)मा.कै.विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा ( प्राथमिक),वाघेरा
१५)मा.कै.विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा,वाघेरा.
लेखक तथा शब्दांकन- श्री .रुपेश शांताराम सोनवणे
रचना प्राथमिक विद्यालय.
21/07/2016
05/05/2016
20/10/2015
04/10/2015