12/04/2026
शालेय वर्षाचा शेवटचा दिवस, वर्ष संपण्याची हुरहूर, पुढील वर्षाची उत्सुकता, उन्हाळ्याची मोठी सुट्टी आणि मित्रमैत्रिणींचा विरह असा संमिश्र भावनांचा दिवस! आनंद निकेतनच्या मुलांचा हा दिवस संस्मरणीय करण्यासाठी शाळेत एका धमाल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दिनांक 10 एप्रिल 26, शुक्रवार रोजी एक कहानी एक्सप्रेस आपल्या शाळेत आली होती. पहिली ते आठवीच्या मुलांनी छोटीशी गोष्ट फुलवून तिचं छान नाट्यरूपांतर कसं करता येतं हे प्रत्यक्ष अनुभवलं
'कपिलने घेतला झोका ', 'लांडग्याला दुष्ट का म्हणतात?' आणि एक मणिपुरी लोककथा यांचं नाट्यरूपांतर घेऊन आले होते तीन हरहुन्नरी कलाकार - कृतार्थदादा, गौरीताई आणि निखिलदादा! कहानी घर ही त्यांची संस्था! छोटे छोटे प्रॉप्स, चित्रं वापरून तर कधी वेशभूषा करून या गोष्टी नाटक रूपात त्यांनी सादर केल्या.
आधी डफली मुलाचं वाजवून मुलाचं स्वागत, मग त्यांच्याशी हलक्या फुलक्या गप्पा, काही ॲक्टिव्हिटी आणि नंतर मुलांना आवडेल असं सादरीकरण!
लांडग्यांना दुष्ट का म्हणतात या गोष्टीतून अफवा कशा पसरतात आणि त्यामुळे एखाद्याचं घर कसं उद्धवस्त होऊ शकतं हे अतिशय संयतपणे पाचवी ते आठवीच्या मुलांपर्यंत पोचलं. तर कपिलने घेतला झोका या गोष्टीतून अशक्य वाटणारी गोष्ट प्रयत्नपूर्वक साध्य करता येते हे शिकायला मिळालं. पुस्तकांकडे बघण्याची वेगळी दृष्टी या अभिनव नाट्यप्रयोगांतून सगळ्यांनाच मिळाली.
मुलं गोष्टी बघण्यात रंगून गेली. दीड तास कसा गेला मुलांना कळलंही नाही. शाळेतल्या बऱ्याच मुलांनी स्नेहसंमेलनातील नाटकं सोडून दुसरं नाटक कधी बघितलेलं नसतं. त्यांना एक वेगळा नाट्यानुभव मिळाला. नंतर झालेल्या प्रश्नोत्तरांतून पाचवी ते आठवीच्या मुलांनी नाटक म्हणजे काय, ते कसं सादर करतात, त्यासाठी कायकाय करावं लागतं, पुस्तकाचं नाटक करताना काय वेगळं करावं लागलं, असे प्रश्न उत्सुकतेने विचारले. तर पहिली ते चौथीच्या मुलांनी नाटकात वापरलेल्या वेगवेगळ्या puppets ना हात लावून बघितला. नाटक बघताना मुलांनी दिलेली उत्स्फूर्त दाद कलाकारांनाही सुखावून गेली.