15/05/2026
निशब्द... सुन्न....
डॉ. आनंद नाडकर्णी...
For meaningful and joyful education
15/05/2026
निशब्द... सुन्न....
डॉ. आनंद नाडकर्णी...
09/05/2026
दहावीचा निकाल ही दरवर्षी उत्सुकतेची आणि समाधानाची बाब असते. विद्यार्थी आणि पालकांना एक महत्त्वाचा टप्पा पार केल्याचा आनंद असतो.
अभ्यासाव्यतिरिक्त कोणतेही उपक्रम बंद न करता , क्लासेस न लावताही दहावीच्या वर्गात उत्तम गुण मिळवता येतात हे आपण गेली अनेक वर्षे सिद्ध करत आहोत.
यावर्षीही १००% निकालाची परंपरा आनंद निकेतनने कायम राखली आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे आनंद निकेतनतर्फे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन, तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!
19/04/2026
आविष्कार शिक्षण संस्थेचे सामाजिक प्रकल्प -
गेल्या चार वर्षांपासून आविष्कार शिक्षण संस्थेमार्फत दोन सामाजिक प्रकल्प राबवले जातात.
१. महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांसाठी 'जिज्ञासा' प्रकल्प- यात मुलांना विज्ञानाच्या संकल्पनांचे आकलन व्हावे, स्वतःला प्रयोग करुन बघता यावे व विषयाची गोडी लागावी म्हणून प्रयत्न केले जातात. या प्रकल्पांतर्गत आठ मनपा शाळेतील सहावी, सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी आठ वेळा मोफत सत्रे घेतली जातात.
२. महानगरपालिकेच्या हद्दीतील अंगणवाडी शिक्षकांना प्रशिक्षण - एका वेळी २० शिक्षिकांना दर महिन्याला दोन दिवस असे १६ पूर्ण दिवसांचे प्रशिक्षण मोफत दिले जाते. यात सहज उपलब्ध गोष्टीतून शैक्षणिक साहित्यनिर्मिती, मुलांकडून भाषा व गणिताची पूर्वतयारी कशी करुन घेता येते तसेच मुलांच्या शारीरिक, भावनिक आणि सामाजिक विकासासाठी कोणते उपक्रम घेता येतात याचे सोप्या पद्धतीने प्रशिक्षण दिले जाते.
नुकतेच यावर्षीचे हे दोन्ही प्रकल्प संपन्न झाले.
12/04/2026
शालेय वर्षाचा शेवटचा दिवस, वर्ष संपण्याची हुरहूर, पुढील वर्षाची उत्सुकता, उन्हाळ्याची मोठी सुट्टी आणि मित्रमैत्रिणींचा विरह असा संमिश्र भावनांचा दिवस! आनंद निकेतनच्या मुलांचा हा दिवस संस्मरणीय करण्यासाठी शाळेत एका धमाल कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. परीक्षेच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दिनांक 10 एप्रिल 26, शुक्रवार रोजी एक कहानी एक्सप्रेस आपल्या शाळेत आली होती. पहिली ते आठवीच्या मुलांनी छोटीशी गोष्ट फुलवून तिचं छान नाट्यरूपांतर कसं करता येतं हे प्रत्यक्ष अनुभवलं
'कपिलने घेतला झोका ', 'लांडग्याला दुष्ट का म्हणतात?' आणि एक मणिपुरी लोककथा यांचं नाट्यरूपांतर घेऊन आले होते तीन हरहुन्नरी कलाकार - कृतार्थदादा, गौरीताई आणि निखिलदादा! कहानी घर ही त्यांची संस्था! छोटे छोटे प्रॉप्स, चित्रं वापरून तर कधी वेशभूषा करून या गोष्टी नाटक रूपात त्यांनी सादर केल्या.
आधी डफली मुलाचं वाजवून मुलाचं स्वागत, मग त्यांच्याशी हलक्या फुलक्या गप्पा, काही ॲक्टिव्हिटी आणि नंतर मुलांना आवडेल असं सादरीकरण!
लांडग्यांना दुष्ट का म्हणतात या गोष्टीतून अफवा कशा पसरतात आणि त्यामुळे एखाद्याचं घर कसं उद्धवस्त होऊ शकतं हे अतिशय संयतपणे पाचवी ते आठवीच्या मुलांपर्यंत पोचलं. तर कपिलने घेतला झोका या गोष्टीतून अशक्य वाटणारी गोष्ट प्रयत्नपूर्वक साध्य करता येते हे शिकायला मिळालं. पुस्तकांकडे बघण्याची वेगळी दृष्टी या अभिनव नाट्यप्रयोगांतून सगळ्यांनाच मिळाली.
मुलं गोष्टी बघण्यात रंगून गेली. दीड तास कसा गेला मुलांना कळलंही नाही. शाळेतल्या बऱ्याच मुलांनी स्नेहसंमेलनातील नाटकं सोडून दुसरं नाटक कधी बघितलेलं नसतं. त्यांना एक वेगळा नाट्यानुभव मिळाला. नंतर झालेल्या प्रश्नोत्तरांतून पाचवी ते आठवीच्या मुलांनी नाटक म्हणजे काय, ते कसं सादर करतात, त्यासाठी कायकाय करावं लागतं, पुस्तकाचं नाटक करताना काय वेगळं करावं लागलं, असे प्रश्न उत्सुकतेने विचारले. तर पहिली ते चौथीच्या मुलांनी नाटकात वापरलेल्या वेगवेगळ्या puppets ना हात लावून बघितला. नाटक बघताना मुलांनी दिलेली उत्स्फूर्त दाद कलाकारांनाही सुखावून गेली.
29/03/2026
दि. 28/3/26 शनिवार रोजी कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात 'आविष्कार शिक्षण संस्थेचा' सहावा 'अरुण ठाकूर पुरस्कार' समारंभ संपन्न झाला.
हा पुरस्कार जळगावच्या 'वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट' या संस्थेच्या, कचरावेचक मुलांसाठी 'आनंदघर' चालवणाऱ्या प्रणाली सिसोदिया व अद्वैत दंडवते यांना प्रदान करण्यात आला.
पुरस्कार प्रदान करण्यासाठी पुण्याच्या खेळघर प्रकल्प चालवणाऱ्या श्रीमती शुभदा जोशी व नाशिकच्या महापौर श्रीमती हिमगौरी आडके यांना निमंत्रित करण्यात आले होते.
हिमगौरीताई आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की आजच्या काळातही आनंद निकेतन शाळा आपली मूल्ये जपत प्रामाणिकपणे काम करत आहे. तसेच शिक्षण देताना 'मुलांना प्रश्न विचारायला शिकवले पाहिजे' हा मुद्दादेखील त्यांनी अधोरेखित केला.
शुभदाताईंनी वर्धिष्णू संस्थेला पुरस्कार मिळाल्याबाबत समाधान व्यक्त करताना त्या म्हणाल्या,"ही संस्था कचरावेचक मुलांना शिक्षणाबरोबरच सन्मान मिळवून देण्याचे काम निरलसपणे करत आहे."
"ह्या कामाबद्दल मिळालेला पुरस्कार हा आनंदाबरोबरच जबाबदारी वाढवणारा आहे." असे प्रणाली व अद्वैत यांनी सांगितले.
उत्तरार्धात मुक्ता नावरेकर व अतुल गायकवाड यांनी प्रणाली व अद्वैत यांची मुलाखत घेतली, ज्यात
त्यांच्या समाजात बदल घडवणाऱ्या चाकोरीबाहेरच्या कामाचा प्रवास , त्यातील आव्हाने व मिळणारे समाधान याबद्दल त्यांच्याशी संवाद साधला.
त्यांच्या कामाची तळमळ व आवाका श्रोत्यांना थक्क करणारा होता.
23/03/2026
कार्यक्रमाला नक्की या!
17/03/2026
यावर्षीचा अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार जाहीर - यावर्षीचा अरुण ठाकूर स्मृती पुरस्कार जळगावच्या वर्धिष्णू सोशल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सोसायटी या संस्थेचे संस्थापक प्रणाली सिसोदिया व अद्वैत दंडवते यांना देण्यात येणार आहे.
ही संस्था प्रामुख्याने कचरा वेचणारी मुले आणि बालकामगार अशा वंचित घटकांतील मुलांसाठी सुरक्षित आणि आनंददायी शिक्षण पद्धती व पोषक वातावरण निर्माण करण्याचे काम करते. त्यांच्या आनंदघर या उपक्रमाद्वारे मुलांच्या शिक्षणाची सोय केली जाते. केवळ पुस्तकी ज्ञान न देता मुलांचे आरोग्य, पोषण आणि कौशल्य विकासावरही भर दिला जातो. बालमजुरी रोखून या मुलांना मुख्य प्रवाहातील शिक्षणाशी जोडण्याचे महत्त्वाचे कार्य ही संस्था करत आहे. आरोग्य, स्वच्छता, व्यसनमुक्ती यावरही काम केले जाते. तसेच वंचित व दुर्बल घटकांतील महिलांना शिवणकाम शिकवून व त्यांनी शिवलेल्या कपड्यांची विक्री करून रोजगार उपलब्ध करून दिला जातो. अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत सातत्याने तेरा वर्षे ही संस्था हे समाजोपयोगी काम करत आहे. या संस्थेचे संस्थापक आणि आधारस्तंभ प्रणाली आणि अद्वैत यांना या वर्षीचा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचे आम्ही ठरवले आहे.
हा कार्यक्रम शनिवार दिनांक 28 मार्च रोजी संध्याकाळी सहा ते आठ या वेळात कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे होणार आहे सर्वांनी दिवस व वेळ राखून ठेवावा असे आम्ही आवाहन करत आहोत.
13/03/2026
आज बालवाडीच्या मुलांशी गप्पा मारायला डी. सी. पी. गीता चव्हाण आल्या होत्या. त्यांनी ब-याच विषयांबद्दल मुलांशी गप्पा मारल्या.
त्यांनी मुलांना प्रश्न विचारला,
▪️तुम्ही पोलिसांना कुठे पाहिले आहे?
मुलं - सिग्नलवर, बँकेत, टी.व्ही., रस्त्यावर, पिक्चरमध्ये इ.
त्यानंतर त्यांनी पोलिस काय काय काम करतात ते समजावून सांगितले. एखाद्या ठिकाणी जर पोलिस नसतील तर मोठी माणसंसुध्दा मदत करतात हेही सांगितले.
मुलांना पोलिसांच्या ड्रेस बद्दल व गाड्यांबद्दल कुतूहल होते. मुलांनी त्यांनी घातलेली टोपी व काठी हातात घेऊन बघितली.
▪️मुलांनी विचारलेले प्रश्न
१) तुमच्या पोलिस स्टेशनचे नाव काय?
२) पोलिसांची गाडी आतून कशी असते?
३) तुम्ही ऑफीसमध्ये बसून काय काम करता?
४) तुम्ही चोरांना कसे पकडता?
५) कोणत्या चोरांना दंड लावता? कोणत्या चोरांना जेल मध्ये टाकता?
६) पोलिस बनण्यासाठी काय करावे लागते?
ताईंना बघितल्यावर सगळ्याच मुलांना पोलिस बनायचे होते. पण त्यासाठी मैदानी खेळ, सकस आहार आवश्यक आहे हे ही सांगितले. मुलांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मुलांना समजतील अशा भाषेत ताईंनी सांगितली. त्याचबरोबर मुलांशी एक छान खेळ घेऊन न संपणा-या गप्पा संपवल्या. या पोलिसताई आपल्या आनंद निकेतनच्या पालक आहेत.