19/02/2026
*थोरात म्हणजे मराठा का?*
‘तुम्ही थोरात साहेब म्हणजे मराठा का ?
साठी पार केलेला म्हतारा ऊसाच्या बांदाव पंधरा वीस मिंट बोलत थांबलेला. पत्रकार होतो, पुस्तकं लिहितो वगैरे सांगितल्यावर त्याला माझा कमालीचा आदर वाटला. मला साहेब म्हणू लागला. कोरोना, भाजीपाला, महागाई, गुऱ्हाळाच्या गप्पा झाल्यावर लांबवर पाहत त्यानं प्रश्न विचारलाच.
जातीचा प्रश्न म्हणजे आपला जिव्हाळ्याचा प्रश्न. तसा मी स्मित करत म्हणालो,
‘नाय मराठा नाय आमी' तशा त्याच्या पांढऱ्या भुवया आकड्यात फिरल्या. म्हणाला,
‘मग काय खालचेहेत का तुमी ?'
गालातल्या गालात हसत म्हणालो,
‘हा, खालचे म्हणजे वडिल मांगाचे अन् आई मराठ्याची.' तशी त्यानी टोपी नीट केली. अन् विचार करत म्हणाला, ‘म्हंजी तुमी मांगाचेच झाले की. पण, दिसायला तर भामणासारखे दिसता.'
मी मान डुलवत म्हणालो,
‘हा माझी आज्जी भामणाची होती.'
तसा तो म्हतारा दोन सेकंदासाठी फ्रीज झाला. त्यानं तोंडात बोट घालत तंबाखुची गुळी बाहेर काढून फेकली. अन् म्हणाला,
‘आज्जी भामणाची, बाप मांगाचा अन् आई मराठ्याची ? असं कसं ?' तसं मी म्हणालो,
‘आज्जीनी आजोबाबर पळून जाऊन लग्न केलंत.' तशी डोक्यावरची टोपी नीट करत तो म्हणाला, 'मग आजोबा मांग होते का मराठा ? मी म्हणालो, नाय नाय आजोबा तर रामोशी होते. दरोडे टाकायचे.'
तसा वैतागत तो म्हणाला, 'आरं बाबा, तुझे आजोबा जर रामोशी होते तर तुझे वडील मांग कशे झाले ?'
मी म्हणालो, ‘अहो आजोबा म्हणजे आईचे वडील रामोशी होते. माझ्या वडलांचे वडील तर लव्हार होते.'
तसा त्याचा पारा सटकला. वैतागत म्हणाला, ‘आरं गयबाण्या तुझा आजोबा लव्हार होता तर तुझा बाप मांगाचा कसा झाला ?' हसु लपवत म्हणालो, ‘अहो म्हणजे आजोबानी दोन लग्न केलती. त्यांची एक बायको माळयाची अन् दुसरी बायको मांगांची होती. माझे वडील मांगाच्या बाईच्या पोटी जन्माला आलते ना.'
तसा डोकं खाजवत तो म्हणाला, ‘आयघातली कसला गुतूडा करुन ठेवलाय रं ? पण मला एक सांग, तुझ्या आईची आई भामण अन् तिचा बाप रामोशी होता तर तुझी आई मराठ्याची कशी झाली ?'
मी म्हणालो, 'माझ्या आज्जीला लेकरु होत नव्हतं म्हणून आईला मराठ्याच्या घरातून दत्तक घेतलं होतं.'
म्हताऱ्यान शांतपणे ऐकलं अन् म्हणाला, ‘का ? त्या मराठ्यांनी दत्तक कसकाय दिलं पोरीला ?' तसं मी दीर्घ उसासा घेत म्हणालो, ' आवं माझ्या आईची खरी आई धनगराची होती.'
तसं ते म्हतारं रागानं पाहत खेकसलं, 'अय निघ हितून भाडकाव. डोक्याची पार आयमाय करुन टाकली यड्या भोक्याच्यानी. कशाचा कशाला मेळ लागाना ? कुणाच्या घरात कोण गेलंय अन् कायबी समजाना.
- नितीन थोरात
सध्याच्या जातीव्यवस्थेने खोलवर बरबटलेल्या,समाज मानसिकतेच वास्तव चित्रण..
*संकल्पना नाही संकल्प आहे जातीविरहीत समाज निर्मिती काळाची गरज!*
*आज देशाला कॅशलेस पेक्षा कास्टलेस इंडिया ची गरज आहे*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🟨🟩🟧🟪🟥🟦🟧