22/03/2023
बहिणाबाई या खानदेशातील निरक्षर कवयित्री. अक्षरलेखन करता येत नसले तरी त्यांच्यावर माय सरस्वतीची मोठी कृपा होती. त्यांच्या काही कविता, ओव्या त्यांच्या भाच्याने टिपून ठेवल्या. कित्येक त्यांच्याबरोबरच गेल्या. ज्या शिल्लक उरल्या त्यातून त्यांच्या प्रतिभेची झेप दिसून येते. अवतीभोवतीच्या साध्या घटनांचे गूढ-गंभीर अर्थ त्यांना सहज उमगत असत आणि अतिशय गोड, रसाळ शब्दांत ते त्या सांगत असत. गुढीपाडव्यानिमित्त केलेली त्यांची ही सुंदर कविता –
*गुढी उभारनी*
*गुढीपाडव्याचा सन*
*आतां उभारा रे गुढी*
*नव्या वरसाचं देनं*
*सोडा मनांतली आढी*
गुढीपाडव्याच्या सणाला गुढी उभारा, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीची स्वत:ला दिलेली भेट म्हणून गेलेल्या वर्षातील सगळ्या अढी म्हणजे राग, गैरसमज, चिंता सोडून द्या.
*गेलसालीं गेली आढी*
*आतां पाडवा पाडवा*
*तुम्ही येरांयेरांवरी*
*लोभ वाढवा वाढवा*
वर्ष सरले, जुने राग, गैरसमज, चिंता सरल्या, आज पाडवा आहे, पाडव्याच्या दिवशी सर्वांवरचा लोभ वाढवा. येर म्हणजे परके लोक. आपल्या लोकांवर आपला लोभ असतोच, पण बहिणाबाई आपल्याला येरांवर म्हणजे परक्यांवरचाही लोभ वाढवायला सांगत आहेत, थोडक्यात सर्वांवर लोभ ठेवायला सांगत आहेत. “सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुख भागभवेत।“ – या शांतीपाठातील संदेशाचा आशय त्यांच्या ओळींमध्ये उतरला आहे.
*अरे, उठा झाडा आंग*
*गुढीपाडव्याचा सन*
*आतां आंगन झाडूनी*
*गेली राधी महारीन*
गुढीपाडव्याच्या सणाच्या दिवशी त्या आधी अंग झाडून उठायला सांगत आहेत. कामकरीण अंगण झाडून गेली, आता तुम्ही अंग तरी झाडा असे घरातील मुलामाणसांना त्या गमतीने सांगत आहेत.
*कसे पडले घोरत*
*असे निस्सयेलावानी*
*हां हां म्हनतां गेला रे*
*रामपहार निंघूनी*
घरातील मुलेमाणसे आळशाप्रमाणे घोरत पडून राहिली तर रामप्रहर म्हणजे सकाळ निघून जाईल, वेळ कुणासाठी थांबत नाही असे त्या सांगत आहेत.
*आतां पोथारा हे घर*
*सुधारा रे पडझडी*
*करीसन सारवन*
*दारीं उभारा रे गुढी*
घराची झाडझुड करा, कुठे डागडुजी गरजेची असेल तर ती करा, सारवण करुन घ्या, आणि दारात गुढी उभारा.
*चैत्राच्या या उन्हामधीं*
*जीव व्हये कासाईस*
*रामनाम घ्या रे आतां*
*रामनवमीचा दीस*
चैत्राचे कडक उन आता पडणार आहे, उन्हामुळे जीव कासाविस होणार आहे. नऊ दिवसांनी रामनवमी येणार आहे, तेव्हा हे नऊ दिवस रामनामात घालवून जीव शांत करा. जीवनातील दु:खांना त्यांनी उन्हाने होणाऱ्या कासाविशीची उपमा दिली आहे, आणि ही कासाविशी दूर करण्याचा सोपा उपायही लगेच सांगितला आहे. बहिणाबाई साध्या साध्या गोष्टीतून जगण्याचे तत्त्वज्ञान मोठ्या खुबीने सांगत असतात.
*पडी जातो तो 'पाडवा'*
*करा माझी सुधारनी*
*आतां गुढीपाडव्याले*
*म्हना 'गुढी उभारनी'*
“पाडवा” म्हणजे पाडणे असा अर्थ बहिणाबाई इथे लावतात, आणि या शब्दावर नापसंतीही व्यक्त करतात. एवढ्या सणासुदीच्या, आनंदाच्या दिवसाला “पाडवा” का बरे म्हणावे, त्याऐवजी “गुढी उभारणी” हा नवा, अर्थवाही शब्द त्या सुचवितात. “पाडवा” शब्द खरे तर “प्रतिपदा” शब्दाचे अपभ्रंशित (अपभ्रंश म्हणजे बोलीभाषेत रुळताना शब्दात झालेला बदल) रुप आहे. मात्र त्यातील नकारात्मक छटा बहिणाबाईना आवडत नाही, त्यामुळे त्या त्यांची “सुधारनी” सुचवितात, आणि ती ही किती अर्थवाही आणि गोड!
*काय लोकाचीबी तर्हा*
*कसे भांग घोटा पेल्हे*
*उभा जमीनीच्या मधीं*
*आड म्हनती उभ्याले*
शब्दांमागील अर्थांच्या गमतीजमती बहिणाबाईंना नेहमीच आकर्षित करतात. त्यांच्या कष्टमय जीवनातील तो विरंगुळा होता. घोटलेली भांग पिऊन लोक वाटेल ते शब्द तयार करतात. जमीनीच्या मध्ये उभ्या असलेल्या मोठाल्या विहीरीला ते चक्क “आड” म्हणतात. ती उभी आहे, “आड”वी थोडीच झालेली आहे?
*आस म्हनूं नही कधीं*
*जसं उभ्याले आडवा*
*गुढी उभारतो त्याले*
*कसं म्हनती पाडवा?*
उभ्या विहीरीला आड म्हणू नये, आणि गुढी उभारायच्या सणाला पाडवाही म्हणू नये असा प्रेमळ धाक दाखवून बहिणाबाईंची ही कविता संपते.
शेतकऱ्याच्या घरातील कष्टमय जीवन जगताना, कामे करता करता सुचलेल्या या ओळी आहेत. बहिणाबाईंच्या कविता महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्न आहे. ज्ञानोबा-तुकोबांनी जगण्याच्या परंपरेचा जो महाराष्ट्र-वृक्ष आपल्या शब्दप्रतिभेने फुलविला, त्याच्या आधाराने वाढलेली सुंदर फुलांनी नटलेली ही वेल म्हणजे बहिणाबाईंची कविता. ती अनुभवण्याचे सुख ज्याला मिळाले तोच खरा मराठी.
*परांजपे क्लासेसकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.*
*भाषासमृध्दी शैक्षणिक प्रगतीचा पाया आहे, भाषा समृध्द करा, जीवन समृध्द करा.*