01/07/2011
अनेक पुराणांमध्ये व ग्रंथांमध्ये (पद्मपुराण, मत्स्यपुराण, ब्रम्हांडपुराण, आईन-ए-अकबरी) शारंगधराबद्दलचे व मंदिराचे उल्लेख सापडतात पण कालौघात हे मंदीर केव्हा नष्ट झाले? मुर्ति जमीनीत का लपवुन ठेवली होती? (कारण मुर्ति ज्याप्रकारे सापडली त्यावरुन असेच दिसुन येते की हि मुर्ति जाणिवपुर्वक लपविली असावी) याबद्दल मात्र काहीच अधिकृत माहिती व दस्तावेज उपलब्ध नाही. इतीहास त्याबद्दल मौन बाळगुन आहे. ज्यावेळी मुर्ति सापडली त्यावेळेस मुर्तिसोबत ताम्रपट व शिलालेखही सापडले होते, त्या दस्तावेजांवरुन काही माहिती उपलब्द्य होण्याची शक्यता होती, पण त्यावेळेस जिल्हाधिकारी असलेला सर. रिचर्ड टेंपल याने त्या अमुल्य दस्तावेजाची रवानगी लंडन येथील ब्रिटिश म्युझिअम मध्ये केली व त्यानंतर त्याचे काय झाले त्याबद्दल काहीच माहीती नाही.
पुराणांमध्ये जी माहिती उपलब्द्य आहे, ती अशी, की मेघंकर नगरीत वास्तव्य असणारया मेघंकर नामक राक्षसाचा वध करण्यासाठी, श्री शार्ङ्गधर विष्णुनि अवतार घेतला व त्याच्याच (मेघंकराच्या) विनंतीवरुन येथे श्री शारन्गपाणी प्रभु आपल्या भकतांच्या भेटिसाठी युगानुयुगे उभे आहेत.
मुर्तिप्रकटन व स्थापना
इ.स. १८८८ मध्ये मुर्ति सापडेस्तोवर त्याजागी एक छोटे,ज्यात जेमतेम एक माणुस बसु शकेल असे मंदीर होते, त्याची नित्यनियमाने पुजाही होत होती, त्याला बाळ्देव असे म्हणत, व त्याची अश्विन, श्रावण व चैत्रात नैवेद्य दाखवुन ग्रामस्थ पुजा करीत. ज्यांनी कुणी बालासाहेबांची मुर्ति जमीनीत लपवुन ठेवली त्यांनीच खुण म्हणुन हे मंदीर बांधले असावे व पुढिल पिढयांना त्याची स्मृती रहावी व मुर्तिच्या सुरक्षिततेच्या द्रुष्टीने म्हणुन पुजेचा प्रघात पाडला असावा.
मेह्कर येथील वतनदार पोलीस पाटील श्री. रामभाउ भिते-पाटील ह्यांच्या पडीत जागेत बांधकामासाठी पाया खोदण्यास सुरुवात केली असतांना या मुर्तिचा शोध लागला. या मुर्तिचा शोध लागला तो दिवस ही मार्गशीर्ष शुद्ध पंचमी, शुक्रवार, शके १८१० सर्वजीतनाम संवत्सर, श्रवण नक्षत्र, गोरज मुहूर्त नागदिपावली, ७ डिसेंबर १८८८. प्रारंभी नागदिपावली हा सांगता दिन होता पण पुढे नागदिपावली हा प्रगट दीन म्हणुन साजरा करण्यात येवु लागला .
मुर्ति सापडण्याची वार्ता जशी ग्रामस्थांना कळाली तसेच शासकीय अधिकार्यांना कळाली व त्यांनी पंचनामा करुन मुर्ति जप्त केली व मुर्ति सापडण्याची वार्ता जिल्ह्याधिकार्याला कळविण्यात आली. त्यावेळी मेहकर येथे श्री अंबादास संन्तो देशपांडे हे तहसिलदार होते व रंगनाथ जोशी नावाचे पोलीस अधिकारी होते. ही मुर्ति लंडनला म्युझियम मध्ये ठेवण्याचे इग्रजांनी निश्चित केल्याची बातमी जोशी व देशपांडे ह्यांना कळाली, त्यांनी ही बातमी ग्रामस्थांना कळविली व प्राणप्रतीष्ठा करण्याविषयी सुचवले, कारण प्राणप्रतीष्ठा झालेल्या मुर्तिला नियमाप्रमाणे हलविल्या जाऊ शकत नव्हते. पण प्राणप्रतीष्ठेचा मुहुर्त नसल्याकारणाने काही मार्ग निघला नाही.
ह्यावेळी श्री. जानकीरामआप्पा पाठक, रामभाउ भिते-पाटील, अण्णासाहेब देशमुख,गावातील काही ज्येष्ठ व प्रतीष्ठीत मंडळीनी मुर्तिची मुहुर्त वैगेरे काही न पाहता स्थापना करावी असा निर्णय घेतला व कोणालाही कळण्यापुर्वी सकाळी ४ वाजता मंत्रघोषात प्राणप्रतीष्ठा केली. ही बातमी कळताच जिल्ह्याधिकारी तेथे आले व ताम्रपट व शिलालेख घेउन गेले. ह्या घटनेमुळे श्री. जानकीरामआप्पा पाठक व आणखी दोन लोकांना ६ महिने कारावास भोगावा लागला व रामभाउ भिते-पाटीलांची पोलिस पाटीलकी रद्द झाली. ह्यामध्ये भाग घेणारया अनेक मंडळींना खोटया नाटया गुन्ह्यात अटक करुन अनन्वित छळ करण्यात आला.
आपल्या पूर्वजांनी हा एक अमूल्य ठेवा आपल्यासाठी वाचविला, त्यांच्या या धैर्याबद्दल त्याना शत शत प्रणाम (कारण त्यावेळेस इंग्रजांचे राज्य होते व अश्यावेळेस त्यांना दुखविणे सोपे नव्हते). समाजाने जरी त्यांचे नाव लक्षात नसेल ठेवले तरी शार्ङ्गधर चरणी त्त्यांची नावे निश्चितच नोंदली गेली आहेत.
कालांतराने ग्रामस्थ व आसपासच्या गावातील मंडळीच्या सहाय्याने मंदिराची उभारणी सुरु झाली, ह्यात प्रामुख्याने जास्त परीश्रम घेतले ते जानकीरामआप्पा पाठक ह्यांनी, ते भागवत कथा करित असत. त्यांनी भागवत कथा वाचावी व जे उत्पन्न येइल ते व लोकांना आवाहन करुन वर्गणी जमा करुन मेहकरला आणुन द्यावी. मंदिरात जे लाकडी खांब आहेत ते अप्पांनीच आणले आहेत. अप्पांनी बांधकाम उत्कृष्ट व्हावे म्हणून सोलापूर भागातील कुशल कारागीर मेहकरात आणले, त्त्यांना राहण्यास स्वतःच्या जागा दिल्या. या व्यतिरीक्त पंच मंडाळिंनी आपापल्या शेतीतील काही हिस्सा दिला, तसेच शेठ हजारीमल व य़मुनाबाइ जोशी ह्यांनी आपली संपूर्ण संपत्ती शार्ङ्गधर चरणी अर्पण केली. मंदीराचा सोन्याचा मुलामायुक्त कळस इ.स. १९१३ साली संत श्री बाळाभाऊ पितळे यांचे आज्ञेवरुन श्री गणपतराव कुळकर्णि यांनी बसविला.