23/08/2026
*पुस्तकावरील मनस्वी अभिप्राय*
*आजच्या प्रत्येक मुलाने आणि तो काळ अनुभवलेल्या प्रत्येक पालकाने आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. मुलांचे वाचन कमी होत असताना पालकांनी आपल्या मुलांसाठी आवर्जून घ्यावे असे हे पुस्तक आहे. हे पुस्तक 'घडताना' व त्याच्या कॉपी शाळेत उपलब्ध करून देणार आहोत. किंमत अगदी नाममात्र आहे, पण जुन्या सोन्याला उजाळा दिला की जसे त्याची चमक परत येते, तशाच या पुस्तकामुळे जुन्या आठवणी जिवंत होतात. पुस्तक वाचताना आपसूक कधी हसू येते तर कधी डोळ्यात पाणी येते. तरी जास्तीत जास्त पालक आणि विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचा संग्रह करून बालपणीच्या आठवणींना उजाळा द्यावा आणि आजच्या मुलांना अशा सुंदर आठवणी बनवण्यासाठी प्रेरित करावे.*
*जुन्या आठवणी या कधीही जुन्या होत नाहीत. जुन्या सोन्याप्रमाणे काळ जसजसा पुढे जाईल तसतशी त्याची किंमत अधिकच अमूल्य होत जाते. त्याचप्रमाणे या जुन्या आठवणी हा येणाऱ्या काळासाठी एक अमूल्य ठेवा आहे.*
हे पुस्तक वाचताना माझे बालपण पुन्हा एकदा डोळ्यांसमोर जिवंत झाले. तुम्ही शब्दांतून त्या काळाला इतक्या सहजतेने उभा केला आहे की प्रत्येक पान वाचताना मन भूतकाळात हरवून जाते.
*त्यापैकी काही अनुभव -*
शाळेच्या नावामागचे 'विद्यामंदिर' हे नाव - ते खरंच विद्येचे मंदिर होते. शाळा म्हणजे फक्त इमारत नव्हती, तर संस्काराचे घर होते.
पॅरागॉनची चप्पल तुटली तरी पिन लावून दिवस काढणे, यात त्या काळची साधी परिस्थिती आणि त्यातले मोठे समाधान दोन्ही दिसते.
कुरडई, पापड, साबुदाण्याचे पापड करताना घरात जो एकत्रित आनंद असायचा, तो आजच्या पिढीला कळणारच नाही. आजची मुले त्याला 'बोरिंग' म्हणतील आणि तासनतास रील्स बघत बसतील.
त्यावेळी टेन्शन कसले असायचे? फक्त अभ्यासाचे, निबंध कसा लिहू आणि तोंडी परीक्षेला काय विचारतील याचेच. घरी वडिलांचा धाक असायचा, पण त्या धाकातही एक आदरयुक्त भीती आणि प्रेम होते.
संध्याकाळी विटी-दांडू, विष-अमृत, आम्ही तुमच्या दगडावर असे खेळ ठरलेले असायचे. दूरवरून वडिलांची हाक आली की खेळ अर्धवट सोडून घराकडे धाव घ्यायची.
लाईट गेले की सर्व शांत व्हायचे, म्हणून अभ्यास करताना लाईट जाण्याची वाट पाहण्यातच वेगळी मजा होती. कंदीलच काय, पण त्यासाठी लागणारे रॉकेलसुद्धा आता डोळ्याला दिसत नाही.
टीव्हीवर क्रिकेटचा सामना बघणे हा मोठा सोहळा असायचा. दूरदर्शन संच फार कमी लोकांकडे होता, अँटिना हलला की टीव्हीवर मुंग्या यायच्या.
गणेशोत्सवासाठी वर्गणी, मंडपासाठी काठ्या-कापड, गुलाबाईची आरती आणि खाऊ, नवरात्रीतले गोंधळ-जागरण आणि लोकांमधला आपलेपणा, होळीसाठी लाकडे आणि दिवाळीचे कपडे घेण्यासाठी ठरलेला तो दिवस - यात जी मजा होती ती अवर्णनीय आहे.
आणि रविवार! रंगोली, छायागीत, शक्तिमान, विक्रम-वेताळ आणि रात्री सुरभीची ओढ... त्या एका कार्यक्रमाची वाट पाहण्यात जे सुख होते, ते आज १०० चॅनेलवरही नाही.
एकंदरीत हे पुस्तक म्हणजे फक्त पुस्तक नाही, तर काळाच्या मागे घेऊन जाणारे एक सुंदर यंत्र आहे.
*मनापासून अभिनंदन, खूप सुंदर लिहिले आहेस!*