04/05/2025
माजी विद्यार्थ्यांची यशोगाथा सदर क्रमांक 37
माजी मुख्याध्यापिका सौ. पूनम पांढरकामेबाई उपक्रम
स्कूल के जिंदगी के साथ भी स्कूल के जिंदगी के बाद भी...
नमस्कार🙏
अ.भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल ही शाळा उपक्रमशील शाळा आहे. विद्यार्थ्यांना नुसते पुस्तकी ज्ञान दिले जात नाही... तर, वेगवेगळ्या उपक्रमातून त्यांच्यातील कलागुणांना वाव दिला जातो. हे कला,ज्ञान हे गुण शाळेत असताना दिसतातच असे नाही. परंतु अशा कलागुणांना खतपाणी घातल्यावर पुढे मोठेपणी ती बहरल्याशिवाय राहत नाही. अशाच आमच्या विद्यार्थी/ विद्यार्थिनींच्या यशोगाथा मी सोशल मीडियाच्या फेसबुक वरून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आजची विद्यार्थीनी रूपाली खांडेकर कवीश्वरची यशोगाथा तिच्याच शब्दात.... रूपाली, तुझ्या पुढच्या सांगीतिक प्रवासासाठी व सर्व वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!
नमस्कार🙏 मी रूपाली खांडेकर कवीश्वर, फेसबुकच्या पोस्ट बघताना सहज पांढरकामे बाईंचे माजी विद्यार्थ्यांसाठीचे सदर वाचनात आले होते. बाईंनी माझ्या एका पोस्टला like केले होते ,ते पाहून मग बाईंशी संवाद झाला आणि त्यांनी मला माझ्या सांगितीक प्रवासाबद्दल लिहिण्याचे विचारले .बाई प्रथमतः मी तुमची ऋणी आहे की माझा स्वरभारित जीवनकाळ व्यक्त करण्याची संधी तुम्ही मला दिलीत... पण या संगीताच बीज रोवलं ते शाळेने...खरंतर अ. भी. गोरेगावकर शाळेत प्रवेश केला त्या दिवसापासून शाळेचा संपूर्ण परिसर आणि अभ्यास या दोन्हींची ओढ मनाला लावणारा गुरुजन वर्ग,या सर्व बाई आणि सर जे आत्मीयतेच आदराच नातं जोडलं गेलं ते आजतागायात अव्यक्त राहिलं....गुरुदक्षिणा म्हणून माझी कला सादर करणे किंवा मिळालेल्या ज्ञानाची शिदोरी घेऊन शाळेच्या उपयोगी पडणे या दोन्ही संधी आजतागायत काही मिळाल्या नाहीत,पण आज बाईंशी फोनवर बोलले आणि जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला,वाटलं माजी विद्यार्थ्यांच्या सदरामधून एकमेकांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती उपलब्ध करून देणे हे अतिशय उत्तम कार्य साधलं जात आहे..तर आपण त्यात सहभागी झालंच पाहिजे!!
पाचवीमध्ये पणशीकर बाई आमच्या वर्गशिक्षिका होत्या. शांत, मृदू, सौम्य स्वभावाच्या बाई विद्यार्थ्यांना प्रिय होत्या.गणित छान शिकवलं आम्हाला त्यांनी. इंग्लिश च्या तुंगारे बाई, पातकर बाई दोघीनीही उत्तम इंग्लिश शिकवल. विज्ञान विषय छान करून घेतला तो पांढरकामे बाई, सुतार बाई यांनी. गणित विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी मार्गदर्शन केल ते देवल बाईंनी.हिंदी विषयातही चांगले गुण मिळायचे त्याचे पूर्ण श्रेय आचार्य बाई आणि कुंटे बाईंना होते कारण हिंदी माझा अगदी कमी अभ्यास किंबहुना अभ्यास न करण्याचा विषय होता
आमच्या वर्गाला दोन वर्ष, 6 आणि 7 वित क्लास टीचर म्हणून लाभलेल्या दांडेकर बाईंचा मराठीचा तास म्हणजे शब्दांची पखरण..कवी किंवा लेखकाचे मनोगत त्या आमच्यापर्यंत तसेच्या तसें स्वभावनांतून पोहोचवत... बालकवींचा निर्झर असो किंवा औदुंबर,सावरकरांची बखर आणि नासी फडक्यांचा निबंध.. वाङ्मयातील कोणताही प्रकार अतिशय समरसतेने शिकवणाऱ्या आमच्या संपूर्ण वर्गाच्या अतिशय लाडक्या अशा दांडेकर बाई!!15 ऑगस्ट च्या समूह गानाची पूर्वतयारी असो किंवा माझे गाण्याची स्पर्धा असो... मग गाणं कोणतं, ते कसं गायचं.. सर्व मार्गदर्शन बाई करायच्या.. स्पर्धा झाल्यानंतर शाळेत मी बक्षीसाचे जाऊन सांगण्याआधी बाई माझे अभिनंदन करायला आतुर असायच्या!! सहलीमधून आमच्यात अगदी मैत्रिणींप्रमाणे मिसळून आम्हाला विनोदी चुटके, बस मधील गाणी अशी खास मेजवानी बाईनी दर सहलीत दिली. माझ्या गैरवर्तनाबद्दल हक्काने कान पकडणाऱ्या ,पण त्यामागील तळमळ अजूनही आठवणीत रहावी अशी..नंतर हळुवार फुंकर घालून चूक सुधारण्याची संधी ठेवणाऱ्या दांडेकर बाई!!आमच्या विद्यार्थ्यांच्या प्रेमाने भारावून जाऊन साश्रू नयनांनी आमच्या वर्गाला सस्नेह आशीर्वाद देणाऱ्या दांडेकर बाई!!
कल्पकला मंच,कुमार कला केंद्र इत्यादी आंतर शालेय स्पर्धांना आम्ही सर्व गायक बाईसोबत गेलो आणि दरवर्षी शाळेला कोणते ना कोणते बक्षीस मिळून दिले!
शालेय गायनाला शास्त्रीय संगीताची जोड देणारे भागवत सर! ऋषितुल्य व्यक्तिमत्व! संस्कृत नाटक लिहून बसवून ते कालिदास जयंतीला उत्तमरीत्या सादर केले गेले. उत्तम लेखक, दिग्दर्शक,गायक, संगीतकार, उत्तम वक्ता, वादक, आदर्श शिक्षक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे आपले भागवत सर!! सुभाषितमाला शिकावी तर ती सरांकडून! जसे मला सरांचे हे सर्व पैलू खूप जवळून अनुभवायला मिळाले,लाभ घेता आला , तसे माझ्या एखाद्या वाईट सवयीला खोडून काढण्याचे कार्यही सरांनी फार छान केले!!
गृहपाठ कधीही करायचा चुकूनही राहणार नाही असे हे दोघे कला आणि विद्यादायी गुरुमाऊली होते माझे!!
निलगिरीच्या टोप्यांचा मंद सुवास आज कधीही अनुभवला की आठवते अभीच्या मैदानावर सकाळी सहा चाळीस ते पावणेसात वाजता धावत मारलेली प्रभातफेरी! मनाचे श्लोक,रामरक्षा,भीमरूपी हे सर्व संस्कार शाळेने दिले.
यशाचा कैफ काय असतो ते अनुभवावर पण गर्वाची बाधा कधी होऊ देऊ नये याची समज लहान वयातच मिळाली. अपयशाचे दुःख कधीही टिकत नाही आणि यशाची शिखरं कायम नवी आव्हान देत राहतील याची सुखद जाणीव करून दिली ती शाळेने!भावगीत, भक्तीगीत, नाट्यगीत, समूहगीत, वीरगीत आणि पोवाडाही गाण्याची संधी जिथे मिळाली ते मला घडवणारे विद्यामंदिर म्हणजे अभी गोरेगावकर इंग्लिश स्कूल!! ललित कला केंद्र (उत्तेजनार्थ ) , नंदादीप समिती (2 वेळा विजेती .. प्रथम आणि तृतीय क्रमांक ) , सावरकर प्रतिष्ठान वीरागितगायान (प्रथम क्रमांक ), स्वामी विवेकानंद समिती आंतरशालेय गीतगायन स्पर्धा ( प्रथम क्रमांक )या सर्व आंतरशालेय वैयक्तिक गीतगायन स्पर्धांमधे
पारितोषिके मिळाली
इयत्ता पाचवी मध्ये बर्वे बाईनी शिकवलेला राग भूप मधील स्वलिखित तराना आज माझ्या विद्यार्थ्यांना शिकवताना शाळेच्या सुरम्य दिवसांची आठवण अनेकदा जागी होते! वंदे मातरमच्या वेगवेगळ्या चाली शिकले,गायले,आजही गाते,पण बाईंची भैरवीतील 'वंदे मातरम' ची चाल आजही सदा स्मरणी राहिली आहे!बाईंच्या घरी जाऊन त्यांच्याकडून रशियन गाणं शिकण्याची संधी मिळाली होती. गाण्यातील कोणताही प्रकार असो उत्तम सादरीकरणासाठी कशी मेहनत घ्यावी याच बाळकडू शाळेने दिल.
मराठी वाङ्मयाशी आपलं नातं जोडून देणाऱ्या बाई म्हणजे असनिकर बाई! 'मोगरा फुलला' मधील पाठांतराचा उतारा ऐकल्यावर 'किती नाटकी बोललीस 'अशी खरडपट्टी काढणाऱ्या आणि दहावीला मराठीत scoring व्हाव म्हणून शाळेव्यतिरिक्त स्वतः च्या घरी बोलावून शिकवणाऱ्या असनिकर बाई! पी.टीच्या वेळी नियमांना कडक आणि वर्गात तितक्याच प्रेमळ असलेल्या बाईंची आज पण अनेकदा आठवण येते.
मैदानावर फुटलेल्या कोपराच्या जखमेसाठी औषध देणारे सखाराम काका, कांबळे काका. आणि अतिसर्दीने बेजार झाल्याने किंचित ताप वाटतोय म्हणून सक्तीने झोपायला लावणाऱ्या, घरी पाठवणाऱ्या कावले बाई.. या सर्वांमुळे शालेय जीवनात हास्यविनोद टिकून राहिले.
शाळेनंतर रूपरेल महाविद्यालय आणि त्यानंतर विद्यावर्धिनी मधून बी. इ. इंस्ट्रुमेंटेशन केलं
प्रयोगशाळा, अभ्यास, लांबचा प्रवास, गर्दीची धकाधक, वाढता अभ्यास या सगळ्यामुळे माझ्या गाण्यावर मी स्वतः त्यावेळापुरती स्थगिती आणली होती आणि नोकरीला लागल्यावर पुन्हा शास्त्रीय संगीत शिकणं सुरू केलं. लग्न बाळंतपणात काही वर्ष सरली आणि आम्ही पुण्यात राहू लागलो.माझे शास्त्रीय गाण्याचे शिक्षण पुन्हा एकदा जोमाने सुरू झाले पण आता पुण्यात सासरी राहून माझ्या लहानग्या मुलाला सांभाळत शास्त्रीय गायनाचे धडे गिरवणे चालू झाले होते.मुंबईत ट्रेन किंवा बस ने प्रवास करण्याची सवय होती,आता मात्र दुचाकी स्वतःच्या भरवशावर चालवणे आले..माहेरी आई आणि आजी दोघींनी आम्हा मुलींना दुधावरच्या सायेसारख जपलेल.. कोठेही बाहेर कामासाठी किंवा शिक्षणासाठी खूप वेळ जावे लागणार असेल की आदल्या दिवशी घरी सांगितले की दिवसभराचे खाणे डब्यात भरून निघताना डबा आई हातात द्यायची आता मात्र कंडीशन opposite होत्या. आपल्याबरोबर नवऱ्याचा डबा, सासू-सासऱ्यांचे जेवण आणि माझ्या छोट्या बाळाची सोय लावून मग निघायचे.. पण त्यानंतर होणारा जो अलभ्य लाभ संगीताचा..त्याच्या विचाराने घर काम करताना नेहमी आणखी आणखी करावसं वाटायचं.. Pure क्लासिकल कोचिंग काय असतं आणि माझ्या आधीच्या गाण्यात मी काय बदल केले...ते समजू लागलं होतं.नवीन नवीन राग रचना शिकताना मिळणारा आनंद घरी आपोआप रीयाजाचे तास वाढवत होता. मध्यमा प्रथम आणि मध्यम पूर्ण दोन्ही प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.शास्त्रीय संगीत सुरू झाल होत खरं परंतु संसारात मात्र नवीन नवीन आव्हाने समोर उभी ठाकत होती. त्या आव्हानांवर मात करून चालू असलेल माझ संगीत शिक्षण, हे माझं गाणं मला एक मेडिटेशनच वाटायचं त्यावेळी.. आणि त्यामुळे जशी मी माझ्या मुलाशी एकरूप होऊन खेळायचे तसेच सुरांशी एकरूपता, तल्लीनता नकळत साकार होऊ लागली. मध्यमा पूर्ण गायन परीक्षेत प्रथम श्रेणी मिळाली आणि विशारदचा अभ्यास सुरू केला. आता रियाज किती करेन तो कमीच वाटायचचा आणि मी आणखी आणखी सराव करीत राहायचे. क्लास मधील माझ्या गुरु सौ. मोहिनी ताई या एक आदर्श आणि डेडिकेटेड गुरु मला लाभल्या. तिथे जेवढी माझी शिकवणी होईल, त्याप्रमाणे घरी येऊन त्याचा नित्य सराव करणे, तो रेकॉर्ड करणे, ऐकणे, लिहून काढणे, स्वर घोटणे, ताना पाठांतर इत्यादी इत्यादी सर्व काही वेळच्यावेळी करण्याकडे माझा कटाक्ष ठेवला विशारद प्रथम ची परीक्षा ही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर वर्षभरातच विशारद पुर्णची ही परीक्षा दिली. त्या काळात मी टीव्हीवरील गायक वर्ग आणि कार्यक्रम कधीच सोडले नाहीत.छोट्या अद्वैतलाही त्यामुळे थोडे फार गाण्यांचे संस्कार मिळाले.
मे 2017 मध्ये संगीत विशारद प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आणि तेव्हापासून मी पुण्यातील माझ्या निवासस्थानी शास्त्रीय गायनाचे वर्ग घेते आहे.अनेक कार्यक्रमात कला सादर करण्याची संधी मिळाली मिळते आहे.उत्तम श्रोते रसिकांची दाद, हेच आम्हा गायकांच खर वैभव असत... तसेच छान मित्र-मैत्रिणी लाभले .प्रोत्साहन मिळत राहिले.माझे लहानपणापासूनचे शिक्षिका होण्याचे माझे स्वप्न माझ्या कलेमुळे पूर्ण झाले. अखील भारतीय गांधर्व मंडळातर्फे गायनाच्या परीक्षांसाठी परीक्षक म्हणून नियुक्ती झाली. संगीताची अफाट व्याप्ती आणि त्यापुढील आपले क्षुल्लक ज्ञान याची सत्यता जशी अंगवळणी झाली, तशीच गुरूंचे आपल्या जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व क्षणाक्षणाला काही ना काही, या ना त्या रूपाने माझ्यातील विद्यार्थीपण जागृत ठेवत राहिले. मी शिक्षिका झाले तरी कायम मी स्वतः एक विद्यार्थी आहे..
शाळेत असताना दरवर्षी मराठी निबंध स्पर्धेचा प्रथम क्रमांक, वाचनाची भयानक आवड आणि गायन वृंद प्रमुख या माझ्या छान छान उद्योगामुळे मी दहावीनंतर विज्ञान विषयाला हात घालेन असे माझ्या आई-वडिलांना अजिबात वाटले नव्हते. पण त्यांनी कधीही असे अतिवक्तव्य माझ्यासमोर केले नाही.बी. ई. झाल्यानंतर माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये काही काळ नोकरी केली. त्यानंतर 11, 12 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना Maths आणि physics हें दोन्ही विषय.सीईटी क्रॅश कोर्स मध्ये मुंबईत शिकवायला मिळाले. गोखलेबाई कॉलेज मध्ये अल्पकाल lecturer म्हणून कार्य केले.पुण्यातील गेली वीस वर्षे मात्र बहुतांश कलासक्त राहिले.
अलीकडे दोन-तीन वर्षांपासून राष्ट्रसेविका समितीची सेविका म्हणून देशसेवा करताना मिळणारा निरामय आनंद, त्याचे बाळकडू लहानपणी मिळाले होते. समितीच्या निमित्ताने नवीन ओळखी झाल्या. मैत्रिणी आणि विद्यार्थिनी ह्या या दोन्हीच्या संख्येमध्ये भर पडली.
मानवी जीवन नेहमी ऊन सावली, सुखदुःख,चढ उतार यांनी भरलेले असते. थोडे दुःख, अपयशही माझ्या वाट्याला आल्याशिवाय कसे राहील! नवीन विभागात स्थायिक होताना अनेक समस्यांना तोंड देता देता आधीचा काटकपणा जाऊन थायरॉईडच्या दुखण्याने जोर धरला. ती. सौ. आई, आजी ती सासरेबुवा यांच्या पाठोपाठ गन्तव्यामुळे खचलेले मन, त्यातच माझ्या वडिलांचे अकस्मिक निधन मनाला चटका देणारे होते.
प्रापंचिक जबाबदाऱ्या आणि कर्तव्य यांच्या जाणीवामुळे या सर्वांतून सावरून 'अलंकार प्रथमच्या' परीक्षेसाठी क्लास जॉईन केला. अभ्यास आधीपासून तसा चालू झाला होता, क्लासमुळे योग्य मार्गदर्शन मिळेल अशा हेतूने स्वरोपासना अकॅडमी जॉईन केली. परीक्षेचे थिअरी पेपर वन आणि पेपर टू टोटल 200 मार्क्स.यात 72 टक्के गुण मिळाले . प्रॅक्टिकल एक्झाम दोन तासांची 300 मार्कांची होती पण त्यात 147 मार्क मिळाले म्हणजे अनुत्तीर्ण!! हा धक्का खूपच खोल आणि क्लेशदायक होता.त्यातून सावरायला खूप वेळ लागेल. परीक्षा चांगली होऊनही गुण न मिळणे असा दिलाय रिझल्ट. तो आल्यावर सर्व प्लस मायनस मनात चेक करून पाहिले. कमतरता उणीवा कुठल्या मोजल्या गेल्या आणि आता पुढे काय हे प्रश्नचिन्ह आहे पण माझा त्याग, माझी मेहनत फळाला आली नाही याची बोच कायम राहील. अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात.त्याप्रमाणे स्वतःला समजावलं.माझ्यासारखे बरेच विद्यार्थी या प्रसंगाला धीराने तोंड देतात असं पाहून स्वतःला सावरले आणि रियाज पूर्वीप्रमाणे रोज नित्यनेमाने करते आहे.
माझ्या class मधील विद्यार्थ्यांची परीक्षांची तयारी करून घेणे, त्यांचा नित्य सराव, रागाच्या विस्तृत सादरीकरणासाठी आवश्यक तयारी आणि माझा स्वतःचा रियाज. घर आणि संसार सांभाळून जमेल तशी कलेची साधना चालू राहील. कोणालाही गीतगायन विषयात काही मार्गदर्शन पाहिजे असल्यास मी त्यांची नक्की योग्य प्रकारे तयारी करून घेईन.माझ्या class चे online आणि offline अशा दोन्ही mode मधून मी विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे.
शाळेच्या सर्व गुरुजन आणि कर्मचारी वर्गाची मी सदैव ऋणी आहे. 🌺🙏
- रुपाली खांडेकर कवीश्वर
- (passed out ssc 1992 बॅच )