07/12/2023
आय.सी.एस.वार्ता 👇
*आय.सी.एस.महाविद्यालयात ‘अविष्कार’ संशोधन स्पर्धा संपन्न.*
खेड : येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विभागीय स्तरीय 18 व्या आंतर महाविद्यालयीन अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. युवा वर्गातून संशोधन वृत्ती जोपासण्याच्या, तसेच विद्यार्थ्यांना संशोधनाची आवड लागावी या हेतूने प्रतिवर्षी मुंबई विद्यापीठाकडून अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यावर्षी रत्नागिरी विभागीय पातळीवरील स्पर्धेचे आयोजन आय.सी.एस.महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 13 महाविद्यालयांकडून 101 प्रकल्प सादर करण्यात आले. यामध्ये 223 विद्यार्थी सहभागी झाले होते.
या स्पर्धेत दापोली अर्बन महाविद्यालय (6), गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी (5), सहयाद्री महाविद्यालय सावर्डे (2), लांजा महाविद्यालय (2) डी.बी.जे.महाविद्यालय, चिपळूण (1), आय.सी.एस.महाविद्यालय, खेड (1), एस.पी.हेगशेट्ये महाविद्यालय, रत्नागिरी (1), आणि पाटपन्हाळे महाविद्यालय (1), अशी पारितोषिके देण्यात आली. विभागीय स्तरावर पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली. याप्रसंगी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक. डॉ.सुनील पाटील, रत्नागिरी जिल्हा समन्वयक डॉ.सुरेन्द्र ठाकूर देसाई, सहसमन्वयक डॉ.साठे, सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.मंगेशभाई बुटाला, महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ॲड.आनंदराव भोसले, महाविद्यालयाच्या प्राचार्यां प्रो.डॉ.अनिता आवटी, रत्नागिरी जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे अविष्कार समन्वयक, आय.सी.एस.महाविद्यालयाचे अविष्कार समन्वयक डॉ.अमोल पाटील, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी आपल्या प्रास्ताविकातून प्राचार्या डॉ.अनिता आवटी यांनी अविष्कारच्या आयोजनाची पार्श्वभूमी व उद्देश सांगितला. ॲड.आनंदराव भोसले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्ञानाबरोबरच संस्कारांची जपणूक केली पाहिजे असा सल्ला देत, आपण सर्वांनी या प्रकारच्या स्पर्धेतून संशोधनात्मक वृत्ती जोपासावी असे आवाहन केले. संस्थेचे कार्याध्यक्ष श्री.मंगेशभाई बुटाला यांनी मुंबई विद्यापीठाने अविष्कार स्पर्धेसाठी आय.सी.एस. महाविद्यालयाची निवड केल्याबद्दल मान.कुलगुरू व डायरेक्टर या सर्वांचे आभार व्यक्त केले, तसेच महाविद्यालय पातळीवर चालणाऱ्या संशोधनाबाबत उपस्थितांना माहिती दिली. संचालक डॉ.सुनील पाटील यांनी मुंबई विद्यापीठाच्या वतीने अविष्कार स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेले बदल तसेच या क्षेत्रातील मुंबई विद्यापीठाचे सातत्यपूर्ण यश याची उपस्थितांना माहिती दिली व अविष्कार मध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रकल्प असले पाहिजेत? याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांना प्रेरणा दिली. समारोपाच्या कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील फेरीसाठीचे पत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. अंतिम स्पर्धा ही मुंबई येथे दि. 18 डिसेंबर रोजी होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ.आर.एस.भालेराव यांनी केले.