01/03/2022
डॉ वसंतराव गोवारीकर यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनास सुरुवात करून दिली ती 1987 साली.
त्यावेळी ते भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख होते.सातत्याने 35 वर्ष विज्ञान दिन संपूर्ण देशभर साजरा करताना खूप आनंद होत आहे. साडेतीन दशकातील एकूण 33 विज्ञान दिन मला अनुभवता आले. काही वेळा तर एकाच दिवशी 2/3 कार्यक्रमांना मला मार्गदर्शक अतिथी म्हणून जाण्याची संधी विज्ञान प्रेमींनी दिली. यात शाळा, महाविद्यालय, सेवाभावी संस्था आणि प्रसार माध्यमांचा समावेश आहे. यातील काही शाळांमधून वारंवार बोलावणे तर असतेच परंतु या शाळा, संस्थांमध्ये निरनिराळे उपक्रम करून तेथे विज्ञान दिन साजरा करण्यास सुरुवात केली. आजमितीला त्या संस्था विज्ञान दिन साजरा करण्याचे सातत्य टिकवून आहेत. याचे समाधान पैशात ही विकत घेता येणार नाही हे निश्चित. विज्ञान प्रदर्शन, विज्ञान प्रश्नमंजुषा, प्रयोग सत्र, विज्ञान खेळणी कार्यशाळा, व्याख्याने, भित्तीपत्रक स्पर्धा अशा विविध उपक्रमांनी विज्ञान दिन साजरा होताना आज आपण पाहत आहोत. ही जमेची मोठी बाजू म्हणावी लागेल. जस जसा काळ जाईल तसतसे यात नावीन्यताही येईल. आता विज्ञान दिनाचा हा वृक्ष मोठा झालेला आहे. त्यावेळी संपूर्ण समाजापर्यंत विज्ञान कसे पोहचू शकेल यावर मेहनत घ्यावी लागेल. प्रदर्शन, भित्तीपत्रके हे समाजप्रबोधनाचे माध्यमे आहेत. या माध्यमांचा पारंपरिक पद्धतीने आपण वापर करतच आहोत. पण याबरोबरच कृतिशील उपक्रम अधिक प्रभावी ठरतील आणि ठरत आहेत हे निश्चित. रोजच्या वापरात येणारे विज्ञान समाजाला कसे उपयोगी आहे, त्यातून आर्थिक फायदा, वेळेची बचत, नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन आणि उद्या येणाऱ्या समस्यावर उपाय यावर भर द्यावा लागेल. विज्ञान वास्तवाला धरून असते, त्यातून फक्त आणि फक्त सत्यता ते समाजा समोर आणत असते. डॉ चंद्रशेखर व्यंकट रमण यांचे संशोधन आजही पदार्थाचा दर्जा तपासण्यासाठी उपयोगी ठरत आहे. कॅन्सर सारख्या आजारात गाठींचे स्वरूप बघण्यासाठी रमण यांचे संशोधन उपयोगी ठरत आहे.
यावर्षीचा विज्ञान दिन त्रिदल एजुकेशन सोसायटी ची पाटील बालमंदिर माध्यमिक शाळेत साजरा केला. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मुलांनी कमीत कमी वेळात प्रतिकृती तयार केल्या होत्या. विशेष म्हणजे सर्व प्रतिकृती कार्यरत होत्या आणि ते पाहताना मुलांमधील आत्मविश्वास दिसत होता. याच ध्यासाने विज्ञान रुजलं तर देशात एक उत्तम वैज्ञानिक वातावरण तयार झाल्याशिवाय राहणार नाही. यातूनच भावी पिढीला वैज्ञानिक मार्गाचा विस्तार करत आपले ध्येय गाठता येईल.
अभय यावलकर
विज्ञान अभ्यासक आणि प्रसारक.