17/08/2026
स्वातंत्र्यदिनाचा अनोखा उपक्रम : प्रतीक्षेतल्या माणसांना मिळाला ‘आपुलकीचा आधार’
किल्ले धारूर, दि. १५ ऑगस्ट :
स्वातंत्र्यदिन म्हणजे केवळ ध्वजारोहण, राष्ट्रगीत आणि देशभक्तीच्या घोषणा नव्हे; तर समाजासाठी काहीतरी देण्याची आणि माणुसकी जपण्याची प्रेरणा देणारा दिवस. याच भावनेतून मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राजमाता जिजाऊ महाविद्यालय, किल्ले धारूर आणि माजी विद्यार्थी संघाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.
ग्रामीण रुग्णालय, धारूर; अंबा चोंडी मंदिर तसेच राजमाता जिजाऊ महाविद्यालयाच्या परिसरात प्रतीक्षेसाठी सिमेंट आसन कट्टे बसविण्यात आले. रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक, मंदिरात येणारे भाविक तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी यांना प्रतीक्षेच्या काळात बसण्यासाठी या आसनांचा मोठा आधार मिळणार आहे.
रुग्णालयाच्या आवारात एखादी व्यक्ती आपल्या आप्ताच्या उपचारासाठी चिंतेत बसलेली असते, मंदिरात आलेला भाविक काही क्षण विसाव्याच्या शोधात असतो, तर विद्यार्थी आपल्या महाविद्यालयीन कामासाठी प्रतीक्षा करत असतो. अशा प्रत्येकाच्या थकलेल्या मनाला आणि शरीराला काही क्षणांचा विसावा मिळावा, या संवेदनशील भावनेतून या उपक्रमाची संकल्पना साकारली.
हा उपक्रम प्राचार्य डॉ. गोपाळ काकडे, माजी विद्यार्थी संघाचे समन्वयक डॉ. नितीन कुंभार, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. कल्याण सावंत आणि सचिव श्री. महादेव साखरे यांच्या संकल्पनेतून आकारास आला. या सामाजिक उपक्रमाला महाविद्यालयातील कर्मचारी बांधवांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मोलाचा आर्थिक व प्रत्यक्ष सहकार्याचा वाटा उचलला. त्यामुळे हा उपक्रम केवळ काही व्यक्तींचा न राहता संपूर्ण महाविद्यालयीन परिवाराच्या सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरला आहे.
‘शिक्षणातून समाजसेवा आणि समाजसेवेतून माणुसकी’ हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविणाऱ्या या उपक्रमातून महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकीची जपणूक केली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने उभारलेले हे आसन कट्टे केवळ सिमेंटचे नाहीत, तर समाजातील गरजू व्यक्तींप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे, सहकार्याचे आणि माणुसकीचे प्रतीक ठरले आहेत.
याप्रसंगी उपप्राचार्य मेजर डॉ. मिलिंद गायकवाड, उपप्राचार्य प्रा. महादेव जोगडे, पर्यवेक्षक प्रा. धनराज सोळंके, IQAC समन्वयक डॉ. एल. बी. जाधवर, कार्यालय अधीक्षक श्री. सुभाष वायाळ यांची उपस्थिती होती.
या उपक्रमामुळे स्वातंत्र्यदिनाचा उत्सव केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता ‘स्वातंत्र्याची खरी अनुभूती म्हणजे दुसऱ्याच्या जीवनात थोडासा आधार आणि आनंद निर्माण करणे’ हा संदेश धारूरकरांना मिळाला आहे.