10/08/2026
*व्यसन हे केवळ शरीराचा नाश करत नाही, तर कुटुंब व समाज उद्ध्वस्त करते.*
*मा. शितल दीदी*
पंकज कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय, चोपडा,पंकज उच्च माध्यमिक विद्यालय, चोपडा, ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालय, तसेच महाविद्यालयातील मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १० ऑगस्ट २०२६ रोजी पंकज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा येथे दहा करोड नशा मुक्ती प्रतिज्ञा महाअभियानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे तर प्रमुख मार्गदर्शक मा. शितल दीदी व मा.करिष्मा दीदी होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. किशोर पाठक यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वतीने देशव्यापी ‘१० कोटी व्यसनमुक्ती प्रतिज्ञा महाअभियान’ अत्यंत उत्साहात आणि गांभीर्याने राबवले जात आहे. समाजाला व्यसनमुक्त करून एक निरोगी, सशक्त आणि समृद्ध भारत घडवणे हा या महाअभियानाचा मुख्य उद्देश आहे असे सांगितले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या स्वागत सत्काराच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मा.शितल दीदी यांनी सांगितले की, देशातील तब्बल १० कोटी लोकांना व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा देऊन त्यांना सकारात्मक जीवनशैलीकडे वळवणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ब्रह्माकुमारी संस्थेच्या सेवाकेंद्रामार्फत केवळ आवाहनावर न थांबता, राजयोग आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून व्यसन सोडण्यासाठी लागणारे मानसिक बल प्रदान केले जात आहे. व्यसनाच्या जाळ्यात अडकत चाललेल्या युवा पिढीला वाचवण्यासाठी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विशेष चर्चासत्रे आणि मार्गदर्शनाचे आयोजन केले जात आहे.त्यांनी सांगितले की, "व्यसन हे केवळ शरीराचा नाश करत नाही, तर कुटुंब आणि समाज उद्ध्वस्त करते” . मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि आत्मिक शक्ती वाढवण्यासाठी राजयोग ध्यान हे अत्यंत प्रभावी साधन आहे. मा. करिष्मा दीदी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक यांना नशा मुक्तीची शपथ दिली. प्रत्येकाने नशेपासून लांब राहावे असे सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ महादेव वाघमोडे यांनी आपल्या मनोगतातून, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वतःची प्रगती करण्यासाठी वेगवेगळ्या नशिली पदार्थांपासून लांब राहावे. व आपले जीवन सुखकर करावे असे सांगितले. या कार्यक्रमास श्री आर.डी. पाटील, श्री नंदलाल वाघ तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. किशोर पाठक यांनी तर आभार डॉ. दिलीप गि-हे यांनी मानले.