06/07/2026
तीस वर्षांनंतर... शिक्षक म्हणून आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण!
कधी कधी आयुष्यात काही क्षण असे येतात, जे शब्दांत मांडणं खरंच कठीण असतं. काल असाच एक क्षण माझ्या आयुष्यात आला.
सुमारे तीस वर्षांपूर्वी, एम.एस्सी. पूर्ण झाल्यानंतर माझ्या अध्यापनाच्या प्रवासाची सुरुवात अहमदनगर येथील काकासाहेब म्हस्के विद्यालय (एमआयडीसी) येथे झाली. अवघ्या एका वर्षासाठी मला आठवीच्या वर्गाचा वर्गशिक्षक होण्याची संधी मिळाली. तो काळ माझ्यासाठी अध्यापनाच्या प्रवासातील एक सुंदर पर्व होता. प्रत्येक विद्यार्थ्याला मनापासून शिकवताना, त्यांच्या व्यक्तिमत्त्वात चांगले संस्कार रुजवण्याचा आणि विश्वास, आपुलकी व जिव्हाळ्याचे नाते निर्माण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला.
काल त्या आठवीतल्या काही विद्यार्थ्यांनी माझा शोध घेतला, संपर्क क्रमांक मिळवला, मी सध्या कुठे कार्यरत आहे याची माहिती घेतली आणि खास बारामतीला येऊन मनापासून भेट दिली. सर्वांना येता आलं नाही, पण जे आले त्यांनी तीस वर्षांपूर्वीच्या आठवणी पुन्हा जिवंत केल्या. त्यांच्याशी गप्पा मारताना जाणवलं... शिक्षक म्हणून आपण त्या काळात जे काही दिलं, ते विद्यार्थ्यांच्या मनात आजही तितक्याच जिव्हाळ्याने जपलं गेलं आहे. शिक्षकासाठी यापेक्षा मोठा सन्मान कोणता असू शकतो.?
अनिल लिमण, अशोक रोडे, उद्धव पवार, संध्या दिवटे आणि दिलीप भांडे... प्रत्येक जण आज आपल्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून यशस्वीपणे उभा आहे. कोणीतरी उद्योगात, कोणीतरी सैन्य सेवेतून देशसेवा करून, कोणीतरी औषधनिर्मिती क्षेत्रात, कोणीतरी उद्योजक म्हणून तर कोणीतरी शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे. त्यांचं यश पाहताना मन अभिमानाने भरून आलं.
आज मी क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी जोडलेलो आहे. दरवर्षी नवनवीन विद्यार्थी येतात, त्यांच्यासोबत नवे प्रवास सुरू होतात. पण वर्षानुवर्षांनंतर एखादा विद्यार्थी केवळ प्रेमाने, कृतज्ञतेने आणि "सर, तुम्हाला भेटायचंच होतं..." या भावनेने दारात येऊन उभा राहतो, तेव्हा शिक्षक म्हणून मिळणारं समाधान शब्दांच्या पलीकडचं असतं.
शिक्षक म्हणून आपण किती शिकवलं हे काळ विसरतो; पण विद्यार्थ्यांच्या मनात आपण किती जिव्हाळा निर्माण केला, हे अशा भेटींमधून समजतं. माझ्या सर्व माजी विद्यार्थ्यांनो, तुमचं प्रेम, तुमचा विश्वास आणि आजही जपलेला हा ऋणानुबंध... हीच माझ्या शिक्षक म्हणून आयुष्यभराची खरी कमाई आहे.
मनापासून आभार... आणि प्रत्येकाच्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
– प्रा. शेषराव काळे सर