05/05/2023
#अभावाचा प्रभाव मातीमोल...
मातीच्या भेंड्याच्या भिंती, घराला चार भिंती असतात पण दोनच थोड्याशा बऱ्यापैकी आणि दुसऱ्या दोन अर्ध्या तुटलेल्या. पहिल्या काळातले बिना भाजलेले मातीचे भेंडे, वरतून मातीच्या आणि राखेच्या सारवाणातून ठळक दिसत होते. घराचे वासे, पावसाच्या तडाख्यातून अर्धवट कुजलेले, त्याच्यावर शेखरलेले गवत. अर्ध्या तुटलेल्या कधीही पडेल अशा कललेल्या अवस्थेत असलेल्या भिंतीच्या जवळून धूर येऊ लागला. आमचे डोळे चमकले, या अशा घरात कोण राहत असावे.ऐंशी वयाच्या वरती असणारा एक म्हातारा. वाऱ्याने उडून जाईल इतकं बारीक शरीर , कपाळावर आणि शरीरावर इतक्या मोठ्या घड्या आणि ठळक दिसणाऱ्या शिरा. उनाने रापुन गेलेला चेहरा. फाटक्या पंजाची लुंगी, खांद्यावर मळकट असा एक फाटका टावेल. डोक्यात घातलेल्या टोपीवर पुढचा भाग काट फक्त शाबूत. हातात असलेली काठी टेकत टेकत चुली जवळ जाताना दिसला. चुलीत घातलेल्या पाल्या पाचोळ्यातून धुराचा लोट आकाशाकडे धाव घेत होता.. त्यांच्या जीवनातल्या अभावांचा डोंगर आभाळात मिसळत होता. हे विदारक सत्य बघून मन स्तब्ध होऊन नजर वरवर फिरत राहिली. काही क्षण संवादात गेले. काही फक्त बघण्यात गेले. एक मोठा दीर्घ श्वास घेऊन पाय परतीच्या वाटेला निघालो. हजारो सुविचारंच्या परिपाक सह्याद्रीच्या डोंगराएवढा या माणसाने क्षणार्धात दिला.
कित्येकांच्या जीवनात कितीतरी अभाव असतात. तरीदेखील जगण्याची जिद्द संपत नाही. जिद्द इतकी मोठी की काळ सुद्धा वेळेच्या आधी मरण देऊ शकत नाही..
जीवनाला पुरून उरलेली माणसं.... सह्याद्रीच्या डोंगरासारखी.....
पण काही माणसं आपल्या जीवनातील उनिवा शोधून काढतात. त्यांना गोंजारतात आणि कधीही न संपणार दुःख तयार करतात. स्वतः दुखी होऊन आपल्या आजूबाजूला देखील दुःखाचा डोंगर उभा करतात. गडद निराशेत जीवन जगत असतात.. त्यांनी अशा सह्याद्रीच्या कणखर डोंगरांना भेट द्यावी.
रंगराव आप्पासाहेब पाटील.
05/05/2023