04/10/2024
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त, तथा माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांच्या हस्ते प्रतिमापूजन तथा अभिवादन करण्यात आले होते. तत्पूर्वी महात्मा गांधी विद्यामंदिर, नाशिक या संस्थेच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन केले होते. प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांच्या हस्ते संस्थेच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले होते. यावेळी प्राचार्यांनी उपस्थितांशी संवाद देखील साधला. ते म्हणाले की, 'बहुजन हिताय बहुजन सुखाय ' हे ब्रीद घेऊन कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेची स्थापना केली. कर्मवीर भाऊसाहेब हिरे हे निष्ठावान गांधीवादी नेते असल्याने त्यांनी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून महात्मा गांधीजींच्याच नावाने शिक्षण संस्था स्थापन केली. गोरगरीब, कष्टकरी, वंचित, उपेक्षित, शेतकरी, आदिवासींच्या मुलांची शिक्षणाची सोय व्हावी, या मुलांच्या हातून समाजाचे पर्यायाने देशाचे भविष्य उज्वल व्हावे या उदात्त हेतूने त्यांनी शिक्षणाचा हा प्रवाह निर्माण केला. कर्मवीरांनी लावलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी संस्थेत शिक्षण घेत स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे नाव मोठे केले आहे. येवल्यासारख्या ग्रामीण भागात तत्कालीन काळात महाविद्यालय सुरू करून महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेने इथली ज्ञानात्मक गरज भागविली. परिणामी येवल्याच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक जडणघडणीत येवला महाविद्यालयाची, इथल्या प्राध्यापक, विद्यार्थ्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. संस्थेने आमच्यात पेरलेला गांधीजींचा विचार आम्हाला नेहमीच सत्याच्या आणि सदाचाराच्या मार्गावर चालण्याचे भान देत राहील असेही ते म्हणाले. यावेळी उपप्राचार्य प्रा. पंढरीनाथ दिसागज, शैक्षणिक पर्यवेक्षक डॉ. आर. पी. ठाकरे, जिमखाना विभागप्रमुख प्रा. प्रदीप वाघमारे, कनिष्ठ विभागप्रमुख प्रा. वैभव सोनवणे, कार्यालयीन अधीक्षक श्री. भालचंद्र पेंढारकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रामप्रसाद वाव्हळ यांनी केले तर आभार डॉ. आर. पी. ठाकरे यांनी मानले. यावेळी प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.