28/02/2026
*कृत्रिम बुद्धिमत्तेचा मानवी भावभावना आणि नातेसंबंधावर परिणाम होत आहे__ डॉ रजनी सटाने*
_नवगण महाविद्यालयात ‘अंतर्विद्याशाखीय बहुभाषिक दृष्टिकोन व डिजिटल अध्यापन’ विषयावर राष्ट्रीय सेमिनार उत्साहात संपन्न_
परळी वैजनाथ : येथील नवगण महाविद्यालयामध्ये ‘अंतर्विद्याशाखीय बहुभाषिक दृष्टिकोन व डिजिटल अध्यापन’ या समकालीन विषयावर राष्ट्रीय सेमिनार मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बदलत्या तंत्रज्ञानयुगात शिक्षणाची दिशा, अध्यापनातील डिजिटल साधनांचा वापर आणि बहुभाषिक दृष्टिकोनाची गरज या मुद्द्यांवर सखोल चिंतन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आबासाहेब हांगे होते. उद्घाटक म्हणून श्री बाळासाहेब देशमुख हे होते.
कार्यक्रमाच्या बीजभाषक डॉ रजनी सटाणे (बिदर, कर्नाटक) आपल्या भाषणात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही केवळ तांत्रिक क्रांती नसून ती मानवी जीवनशैली, भावभावना आणि नातेसंबंधांवर परिणाम करणारी शक्ती ठरत असल्याचे स्पष्ट केले. “कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शिक्षणात करताना मानवी संवेदना, मूल्ये आणि नैतिकता जपणे अत्यावश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. डिजिटल साधनांमुळे शिक्षण अधिक सुलभ झाले असले तरी शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील मानवी संवाद कमी होऊ नये, यासाठी सजगता आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. श्री बाळासाहेब देशमुख यांनी कला विज्ञान वाणिज्य या सोबतच कृषी क्षेत्राशी निगडित गोष्टीसाठी AI चा वापर अत्यावश्यक असल्याचे महत्त्व नोंदविले.
डॉ. सिद्धार्थ जाधव यांनी अंतर्विद्याशाखीय अभ्यासक्रमांची आवश्यकता स्पष्ट करताना विविध शाखांतील ज्ञानाचा समन्वय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कसा उपयुक्त ठरतो, याचे विवेचन केले. एडवोकेट मंजीत सुगरे यांनी बहुभाषिक शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती क्षमता व बौद्धिक लवचिकता वाढते, असे प्रतिपादन केले. माजी प्राचार्य डॉ मधुकर आघाव यांनी डिजिटल शिक्षणातील कायदेशीर व नैतिक पैलूंवर प्रकाश टाकला.
यावेळी डॉ. रजनी सटाने, डॉ. गुणलाल विटोरे, डॉ. फारुकी मेहाजबिन, डॉ. हरिभाऊ कदम, डॉ. उषा माने, डॉ. रमेश राठोड, डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. अशोक चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. याशिवाय मराठवाड्यातील बहुतांश महाविद्यालयातील भाषा विषय वाणिज्य आणि सामाजिक शास्त्रांच्या प्राध्यापकांची उपस्थिती होती सर्व मान्यवरांनी सेमिनारच्या विषयावर आपले विचार मांडून शिक्षण क्षेत्रातील नव्या संधी आणि आव्हानांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यावार्ता रिसर्च जर्नल’चे संपादक डॉ. बापू घोलप यांनी केले. डॉ सुदर्शन अवस्थी यांनी प्रास्ताविकात डिजिटल अध्यापन आणि संशोधन क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांचा आढावा घेतला. उपप्राचार्य डॉ. लालासाहेब घुमरे यांनी आभार प्रदर्शन केले.
या राष्ट्रीय सेमिनारमुळे शिक्षण क्षेत्रात बहुभाषिक व अंतर्विद्याशाखीय दृष्टिकोनासोबतच कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने वापर करण्याची जाणीव अधिक दृढ झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वाणिज्य विभाग अर्थशास्त्र तसेच सर्व भाषांचे विभाग आणि सामाजिक शास्त्रांचे विभाग प्रमुख यांनी अथक परिश्रम घेतले