22/09/2025
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या हि देशा !
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा !!
22/09/2025
18/09/2025
ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे यांचं काल पुण्यात निधन झालं. गजाननरावांनी पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल ठेवले आणि अभ्यासाला सुरुवात करताच त्यांना युद्धशास्त्रात रुची निर्माण झाली.
अठराव्या वर्षापासून त्यांनी युद्धशास्त्राचे वाचन आणि अभ्यास सुरू केला. पुढे १९७१ च्या बांगलादेश युद्धाच्या वेळेस ते एका वर्तमानपत्रासाठी युद्ध पत्रकार म्हणून गेले, तेंव्हा त्यांचं वय होतं अवघ्या २४ वर्षांचं. ग्रंथालयातील पुस्तकांमध्ये दिसणारा इतिहास आणि प्रत्यक्ष डोळ्यासमोर इतिहास घडताना पहायचं !आयुष्यात असे दोन्ही अनुभव किंवा मी तर म्हणेन भाग्यच गजाननरावांना लाभलं. युद्धाचं वार्तांकन करत असताना वास्तव जे डोळ्यांना दिसतं आणि बाहेर जे प्रसारित केलं जातं, यात किती तफावत असते आणि अनेकदा बाहेर जे पसरवलं जातं तोच पुढे इतिहास होतो हे सगळं त्यांनी अनुभवलं असणार.
इतिहास संशोधकाकडे पूर्ण तटस्थता हवी, जी गजाननरावांकडे होती. पण तटस्थततेच्या नावाखाली खूपच स्वप्नाळूपणा किंवा कोणालातरी खलनायक ठरवायचे असले प्रकार गजाननरावांनी कधी केले नाहीत. मध्यंतरी एक वाक्य वाचनात आलं, ते नक्की कुठे वाचलं ते नेमक आत्ता आठवत नाहीये पण वाक्य फार सुंदर आहे. Until the lions have their historians, tales of the hunt shall always glorify the hunter. इतिहास जेत्यांचा लिहिला जातो किंवा सांगितला जातो, पण पराजितांचं काय ? त्यात पण समजून घेण्यासारखा इतिहास लपलेला असतो, असं भान असलेले इतिहास संशोधक जवळपास नाहीसेच होत चालले आहेत.
गजाननराव इतिहास संशोधन करायचं म्हणून अनेक भाषा शिकले, मोडी , फार्सी , इंग्रजी भाषा शिकले , कारण आपला इतिहास किंवा डॅाक्युमेंटेशन हे आपल्या लोकांनी फार न लिहिता इतर लोकांनीच जस्त लिहून ठेवल्यामूळे त्यांच्या भाषा शिकून ते आपल्या पर्यंत पोहोचवण्याच काम गजाननरावांनी कमालीचे केले .
सोशल मीडियाच्या काळात इतिहास संशोधक म्हणवणाऱ्यांचं आज पेवच फुटलं आहे, अनेक भाषा सोडा ज्या भाषेत त्यांचं म्हणणं मांडतात त्या भाषेत पण धड व्यक्त होता येत नाही अशा काळात आपण जगत आहोत. व्हॅाट्सॲपर आलेलं काहीही खरं मानण्याच्या काळात पूर्ण आयुष्य एखाद्या विषयाच्या संशोधनाला द्यायचं हे संस्कार आता कसे होणार हा प्रश्नच आहे.
माझं भाग्य आहे असं मी म्हणेन की मला लहान वयातच इतिहासाची गोडी लागली आणि अनेक इतिहास संशोधकांचा सहवास लाभला. गजाननरावांनी तर त्यांना कधीही फोन करून कुठलाही संदर्भ विचारायची मुभा दिली होती. त्यांच्याशी अनेकवेळा माझी प्रत्यक्ष भेट झाली होती. माझ्या आठवणीत गजाननराव कधी स्वस्थ बसलेत असं दिसलंच नाही. त्यांच्या घरी माझं अनेकदा जाणं व्हायचं तेंव्हा त्यांच्यासमोर कायम हस्तलिखितं असायची, पुस्तकं असायची... आणि कुठलाही संदर्भ विचारला तर, थांबा दाखवतो, म्हणत विशिष्ट संदर्भ ते समोर घेऊन यायचे, अगदी पृष्ठक्रमांकासहित.
अशी माणसं आता दुर्मिळ होत चालली आहेत आणि कदाचित काळाच्या ओघात नाहीशीच होतील. बाबासाहेब पुरंदरे नेहमी म्हणायचे की ‘ वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि वेडी माणसंच इतिहास घडवतात !
आमच्या गजाननरावांकडे पाहिल्यावर मला नेहमी त्या वरच्या ओळी थोड्या बदलाव्याशा वाटायच्या , की इतिहासाचं वेड लागल्या शिवाय इतिहासाकडे पाहता येत नाही आणि इतिहासाचं वेड लागलेलीच माणसं इतिहास लिहितात !
गजाननरावांच्या इतिहास प्रेमाची प्रेरणा बाबासाहेब पुरंदरे. ते नेहमी म्हणायचे की,' मी बाबासाहेबांच्या खांद्यावर बसून इतिहास बघितला आणि त्यानंतर इतिहासाबद्दलच प्रेम आणि कुतूहल जागृत झालं.
महाराष्ट्राला विश्वनाथ काशिनाथ राजवाडे, वा. सी. बेंद्रे, रा.चिं. ढेरे, सरदेसाई, यांच्यासारख्या इतिहास संशोधकांची परंपरा होती. महाराष्ट्राचं भाग्य असं की छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भरभरून लिहिणारे जदुनाथ सरकार यांनी लिहिलेला इतिहास पण वाचता आला. मेहंदळेंसकट ही सगळी इतिहासाने झपाटलेली माणसं परत कधी होतील ? इतिहास परत परत सांगावा लागतो. आणि महाराष्ट्रासारख्या प्रांतात जिथे आपण कोण होतो आणि आपल्या क्षमता काय आहेत याचं भानच जिथे हरवत चाललं आहे अशावेळेला मेहंदळ्यांसारखी माणसं आपल्यात नाहीत. ज्यांना पटकन एक संदर्भ विचारता येईल, ज्यांच्यामुळे एक दृष्टिकोन मिळेल अशी माणसं आसपास न दिसणं हे दुर्दैव आहे. इतिहासासाठी संपूर्ण आयुष्य ओवाळून टाकणारी माणसं भविष्यात तरी दिसू देत हीच इच्छा.
आज गजाननराव मेहंदळे आपल्यातून गेले , परंतु पुस्तकरूपी खजिना जे ते सोडून गेलेत त्यातूनच या देशातल्या , खासकरून महाराष्ट्रातल्या पुढच्या पिढ्यांना आपल्या इतिहासाची जाणीव आणि प्रेरणा मिळत राहो हीच आशा आणि अपेक्षा !
गजाननरावांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली !
राज ठाकरे ।
20/05/2025
ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं आज निधन झालं. १९६४ साली वयाच्या २६ व्या वर्षी एका तरुण मराठी शास्त्रज्ञाने आपले गुरु फ्रेड हॉयल यांच्या सोबत गुरुत्वाकर्षणाचा नवा सिद्धांत मांडला आणि यातून विश्वनिर्मितीच्या रहस्यावरील संशोधनाला चालना मिळाली. त्यावेळेस बिगबँग थिअरी ही प्रचलित आणि सर्वमान्य थिअरी होती पण त्यालाच नारळीकरांनी आव्हान दिलं आणि यातूनच विश्वनिर्मितीच्या बाबत अनेक नव्या शक्यता आज देखील तपासून बघितल्या जात आहेत.
आपण कोण, कुठून आलो ,ही सृष्टी कोणी आणि कशी निर्माण केली ? हे माणसाला पडलेले मूलभूत प्रश्न आहेत ज्यावर अनेक शतकं विचार सुरु आहे. सुरुवातीला जेंव्हा कुठलंच सज्जड उत्तर सापडलं नाही तेंव्हा ही सृष्टी कुठल्यातरी शक्तीने घडवली असं मानलं गेलं, आणि हे काही भारतातच नाही तर जगभरात मानलं गेलं. मग या सृष्टीच्या नियंताचा शोध घ्या, त्याचे पृथ्वीवरील स्वघोषित दूत आले आणि त्यातून जगभरात शोषणाची एक लाटच आली होती.
युरोपात रेनिसन्सचा काळ आला आणि ज्यातून सगळ्याच कल्पनांना आव्हान दिलं गेलं. अर्थात त्यासाठी शास्त्रज्ञांना तत्कालीन धर्मसत्ता आणि कधी कधी राजसत्तेकडून प्रचंड अहवेलना सहन करावी लागली. पण त्यांची चिकाटी संपली नाही. आणि म्हणूनच आज जग ज्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उंबरठ्यावर आहे तिथे पोहचु शकला.
डॉ. जयंत नारळीकर आणि त्यांच्या गुरूंनी विज्ञानाच्याच अशा एका कल्पनेला आवाहन दिलं आणि एक नवा सिद्धांत मांडला. विज्ञानात एक बरं असतं की एखाद्याने एखादी थिअरी खोडून काढली म्हणून कोणी कोणाच्या अंगावर धावून जात नाही, उलट नव्या प्रेरणेने त्याचा विचार सुरु होतो. असं राजकारणात कधी होईल कोण जाणे. असो.
पण डॉ नारळीकर हे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ होतेच पण त्यांच्या बाबतीत दोन गोष्टी मला खूपच लक्षणीय वाटतात. एक म्हणजे आयुका सारखी संस्था जिथे खगोलशास्त्र आणि खगोलभौतिक शास्त्रावर मूलभूत संशोधन केलं जातं. डॉ नारळीकर जेंव्हा १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतात परतले तो काळ असा होता जेंव्हा विज्ञानातील मूलभूत संशोधनातील संस्था उभ्या राहत होत्या. स्वतः नारळीकर टाटा मूलभूत संशोधन संस्थेत कार्यरत होते, त्यामुळे कदाचित त्यांना तिथून प्रेरणा मिळाली असावी. आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं आणि त्यांनी तेंव्हा उभ्या केलेल्या संस्था यांचं अप्रुप वाटतं.
डॉ नारळीकरांची दुसरी ओळख म्हणजे ते उत्तम विज्ञान कथा लेखक होते. अमेरिकेत, युरोपात विज्ञानकथांचं आणि त्यातून निघणाऱ्या चित्रपटांचं एक खूप मोठं प्रस्थ आहे. अनेकांना त्याची फारशी गोडी नसते , पण नारळीकरांनी मात्र मराठी जनांना विज्ञानकथेची गोडी लावली. नारळीकर स्वतःच म्हणायचे की 'विज्ञानाची गोळी कडू लागत असेल तर त्याला साखरेचं कोटिंग म्हणजे कथेचं रूप देणं चांगलं. '
विज्ञानाला साखरेचं कोटिंग देणारे सिद्धहस्त लेखक, शास्त्रज्ञ आज आपल्यातून गेले. अशा माणसांची उणीव नक्की भासेल आणि महाराष्ट्राला तर नक्कीच.
डॉ. जयंत नारळीकरांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली.
राज ठाकरे।
यांच्या वॉल वरून....
31/03/2025
जिंकलंस भावा…!!!
#महाराष्ट्रकेसरीकुस्ती2025
#उस्ताद
03/12/2024
रारंग ढांग : जीवन व मृत्यूच्या सीमारेषेवर झालेल्या युद्धावर थरारक भाष्य!
यूनिव्हर्सिटीत गोल्ड मेडल, इंजिनीअरिंगमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण, अत्यंत हुशार असा तरुण, नाव -विश्वनाथ मेहंदळे. एक दिवशी अचानक,अनेकांची स्वप्ननगरी मुंबईमधील युनायटेड कन्स्ट्रक्शन या मोठ्या कंपनीतील सुखाची नोकरी सोडून सैन्यातील नोकरीत रुजू होण्याचा निर्णय घेतो. नोकरीची नवीन जागा थेट हिमालयातील नऊ हजार फूट उंच पर्वतावर असते. हिमालयातील अतिउंच, दणकट महाकाय पर्वतरांगांमध्ये आपल्या आर्मीचे तळ असतात.शत्रूंशी निकराने लढा देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात ते म्हणजे येथील रस्ते.आपले जवानच हे रस्ते बांधत असतात. तीन वर्षांचा करार करून सिव्हिल अधिकारी विश्वनाथरस्ते बांधण्यासाठी रारंग ढांगात हजर होतो. धो धो वाहणाऱ्या सतलज नदीच्या दोन्ही बाजूंना उंच आकाशाला भिडलेले नितळ पहाड! अशा कड्यांना ह्या भागात ढांग म्हणतात.विश्वनाथ ज्या ठिकाणी रस्ता बांधणार असतो, तो असतो रारंग ढांग!
आणि मग, सुरू होते एक जबरदस्त संघर्षाची कहाणी. ऑर्डर ह्या पाळण्यासाठीच दिल्या जातात हे तत्व असणाऱ्या आर्मीच्या कडक शिस्तीचे तऱ्हेवाईक लेफ्टनंट कर्नल राइट, मेजर बंबा,कॅप्टन नायर, कॅप्टन बहल,अनेक जवान....सिव्हीलीयन अधिकारी लेफ्टनंट विश्वनाथ, गुरखे, लोकल लेबर, आणि समोर ज्याच्या उंचीसमोर माणसे ही मुंग्यासारखी भासतात,तो हिमालय, तो रारंग ढांग, माणसांना आणि यंत्रांना थकवणारी उंची, विरळ ऑक्सिजन, लहरी निसर्ग, विलक्षण थंडी, हिवाळ्यात सत्तरऐंशी फूट बर्फ, केव्हाही होणारे लॅन्डस्लाईड, आणि ह्या सर्वांचा मानवी मनावर होणारा परिणाम...
आर्मीतील अधिकाऱ्यांचा सिव्हिलीयन अधिकाऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तितकासा चांगला नसतो. आर्मीच्या या वातावरणात लेफ्टनंट विश्वनाथ रुळतो काय? हे प्रचंड जोखमीचं, अवघड काम तो पूर्ण करतो काय?नोकरीला रुजू होण्यापूर्वी केवळ एकदाच भेट झालेली उमा व विश्वनाथमध्ये केवळ पत्रातूनच प्रेमाचं नातं कसं बहरत जातं?
विश्वनाथसारख्या पोरामध्ये एव्हढे धैर्य, सहनशक्ती,निर्णय घेण्याची क्षमता कुठून आली?विश्वनाथचे वडील पत्रातून त्याच्याशी काय संवाद साधतात?आणि सरतेशेवटी या पुस्तकातच विचारलेला एक प्रश्न आहे-"जब आदमी मर जात है ,तो उसका क्या रह जात है? उभा सर्व प्रश्नांचा धांडोळा या पुस्तकात अशाप्रकारे घेतला आहे की जणू आपण एखादा चित्रपट पाहत आहोत.
एकदाच मिळालेले हे अनमोल आयुष्य नेमके जगायचे तरी कसे? यशस्वी जीवन म्हणजे काय असते?आपल्या तत्वाशी प्रामाणिक राहणे म्हणजे काय?आयुष्यात आपल्याला नेमके काय पाहिजे असते?आपल्या नोकरीवर किंवा कामावर प्रेम असणे म्हणजे काय? ह्या जीवनापासून माझी काय अपेक्षा आहे?आणि त्यापलीकडे असे काय आहे की, ज्याकरता मी नोकरी, ही प्रतिष्ठा, फार काय हे जीवनदेखील झुगारून देईन??? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न अतिशय थरारक, उत्कंठावर्धकरित्या या पुस्तकात केला आहे.
जन्म व मृत्यू यांच्या सीमारेषेवरील युध्दात सहभागी होऊन प्राणपणाने झुंज देऊन जिंकायचे कसे असते...नकळतपणे हे पुस्तक आपल्याला शिकवून जाते.
-पिनेश जाधव.
रारंग ढांग
मौज प्रकाशन
किंमत-120 रुपये.
30/08/2024
छत्रपती संभाजी महाराजांना जीवे मारण्याचा मंत्री लोकांचा कट
संभाजी महाराज रायगडी सिंहासनाधिष्ठित झाले. त्यांनी अष्टप्रधानांच्या नेमणुका केल्या. लगेच संभाजी महाराजांना निकालात काढण्यासाठी 2 कट रचले गेले.पहिला कट संभाजी महाराजांना विष देण्याचा.
मुंबईकर इंग्रज ह्या कटाबद्दल आपल्या पत्रात माहिती देताना लिहितात -
"संभाजीराजा प्राणावर मोठ्या संकटात सापडला होता. त्याच्या जेवनातील मस्यान्नाचे पोटी घातलेल्या विषाने तो मरायचा, परंतु त्याच्या अल्पवयीन नोकराने त्यांना जेवणापासून थांबवले. तेव्हा त्यातील काही भाग नोकरांपैकी एकाला व कुत्र्याला दिला. दोघेही काही तासातच मेले. संभाजी राजांनी या कटाचा छडा लावला.त्यांना असे समजले की अण्णाजी दत्तो, केशव पंडित, प्रल्हाद पंडित यांनी हा कट केला. लागलीच या सर्वांना शृंखला ठोकवल्या. हा कट पन्हाळगडावर झाला होता.
इंग्रजांच्या या पत्राची तारीख होती 30 ऑगस्ट 1681.
पोस्ट साभार - रवि पार्वती शिवाजी मोरे
बोल बाजीरंग बली की जय....
संताजीच्या डोळ्यासमोर अंधार दाटला. त्या अंधारातून अचानक एक सावली समोर आली. कैलासाच्या शिवाप्रमाणे प्रसन्न मुद्रा. त्याशिवाची मोजडी रक्ताळलेल्या पाण्यात अलगद तरळून गेली. निष्प्राण होत गेलेल्या संताजीच्या हातांनी त्या मोजडीला स्पर्श केला. मरणाच्या छायेत उभ्या असलेल्या सह्याद्रीच्या भैरवाच्या डोळ्यात जीवन समृद्ध झाल्याच्या छटा स्पष्ट दिसू लागल्या होत्या. मुजाऱ्यास येऊ नका म्हणून दरडावलेल्या सह्याद्रीच्या शिवाच्या मोजड्याची छाया संताजी बाबाच्या रक्ताळलेल्या हातात अलगद कैद झाली होती. अगदी कायमची.
स्वराज्याचा इमानी पाईक स्वर्गात देखील महाराजांच्या मोजडीचा पाईक झाला होता. जीवनातून आता कसलेच शल्य राहिले नव्हते. रक्त बंबाळ निरर्थक शरीर डोहाला सोपवून संताजी बाबा निघाला….. सह्याद्रीच्या सांभ शिवाची आराधना करायला. अगदी कायमचा……
लवकरच येत आहे........
लेखक_रवी शिवाजी मोरे
#जप्तनमुलुख
सेनापती संताजी घोरपडे 🚩🚩
05/08/2024
निशा दहियाने कडवी झुंज दिली. सलाम, सलाम 🇮🇳
निशा शेवटच्या सेकंदापर्यंत एका हाताने खेळली, वेदनांनी ओरडली, पण हार मानली नाही.
ही भारतीय स्त्रीची ओळख आहे.
तुझी खेळी ही पदकापेक्षाही मोठी आहे. करोडो देशवासीयांना तुमचा अभिमान आहे.
#निशादहिया #पॅरिस2024
04/08/2024
छत्रपती शिवाजी महाराज आणि किल्ले यांचे नाते किती घट्ट होते. हे जेम्स डग्लस या ब्रिटीश इतिहासतज्ज्ञाच्या नोंदीवरून समजून येते..
● जेम्स डग्लस लिहतो...,
"हा किल्ल्यांमधला माणुस होता ज्याचा जन्मही किल्ल्यामधे झाला होता. किल्ल्यांनी त्याला बनवल आणि त्यांनी किल्ल्यांना बनवल. हे किल्ले म्हणजे भारताची दहशत होती, शिवरायांच्या राज्याचे उगमस्थळ होते, त्यांच्या युध्दांचा आधार होते, त्यांच्या ध्येयांच्या पायर्या होते, त्यांचे घर आणि आनंद होते. त्यांनी अनेक किल्ले बांधले आणि सर्व किल्ले त्यांनी बळकट केले.."
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत असताना अनेक किल्ले जिंकले, जिंकलेल्या किल्ल्यांची डागडुजी केली तसेच नवीन किल्ले देखील बांधले. शत्रूला रोखायचे असेल आणि जिंकलेल्या भागाचे रक्षण करायचे असेल तर किल्ल्यांचे फार महत्व आहे. हे शिवछत्रपती जाणून होते. शिवछत्रपतींच्या निधनानंतर ह्याच किल्ले आणि दुर्गांच्या मदतीने मराठ्यांनी आपल्या शत्रूंना जेरीस आणले हा इतिहास आहे..
――――――――――――
📷🎨 👌🏼♥️🔥