14/05/2026
समुदाय विकासात रेडिओचे भरीव योगदान ः डॉ. सचिनकुमार पाटील
कोल्हापूर ः प्रतिनिधी
भारतीय समाजात रेडिओला विशेष महत्त्व आहे. अनेक स्थित्यंतरे आली तरी रेडिओची गरज कमी झाली नाही. उलट समुदायाच्या विकासात रेडिओ उत्तरोत्तर भरीव योगदान देत आहे, असे मत ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनात मीडिया आणि कम्युनिकेशन क्लब अंतर्गत ‘कम्युनिटी रेडिओ समजून घेताना’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मास कम्युनिकेशन विभागाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव होते.
डॉ. पाटील म्हणाले, माहितीचा प्रसार करण्यात माध्यमांची भूमिका महत्त्वाची असते. रेडिओसारख्या माध्यमाने विश्वासार्हतेच्या जोरावर समाजमनावर अधिराज्य गाजवले आहे. सर्वसामान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे माध्यम म्हणून रेडिओ नेहमीच माध्यमांच्या केंद्रस्थानी राहिला आहे. कम्युनिटी रेडिओच्या रुपात त्याने समुदायाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
यावेळी जयप्रकाश पाटील यांनी कम्युनिटी रेडिओचा इतिहास विशद केला. अभिषेक पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाच्या शिववाणी कम्युनिटी रेडिओबद्दल माहिती दिली. यावेळी ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागातील डॉ. युवराज जाधव, अनुप जत्राटकर यांच्यासह संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. अभार डॉ. सुमेधा साळुंखे यांनी मानले.
फोटो ः कम्युनिटी रेडिओ समजून घेताना या विषयावर बोलताना ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील, सोबत मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव, डॉ. युवराज जाधव, जयप्रकाश पाटील, डॉ. सुमेधा साळुंखे, अभिषेक पाटील आदी.
14/05/2026
https://unishivsandesh.blogspot.com/2026/05/blog-post_14.html
‘ए.जी.पी.एम.’च्या तीन विद्यार्थ्यांची ‘हिंदुस्थान केमिकल्स’मध्ये निवड
सौरभ म्हैसकर वृषभ मोरे आकाश पाटील कोल्हापूर, दि. १४ मे : शिवाजी विद्यापीठाचा कृषी रसायने व किड व्यवस्थापन अधिविभाग...
11/05/2026
*स्त्रीशक्तीच्या कौशल्यातून उद्योग उभारणी शक्य: कविता देसाई*
कोल्हापूर, दि. ११ मे: स्त्री शक्तीच्या कौशल्यातून उद्योग उभारणी शक्य असून त्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठाने राबविलेला कार्यशाळेचा उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन कविता देसाई यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनातर्फे शुक्रवारी (दि. ८) ताराराणी चौक येथे एकदिवसीय "महिला उद्योजिका क्षमता विकास कार्यशाळा" पार पडली. सदर कार्यशाळेचे उद्घाटन सौ. देसाई यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
कविता देसाई यांनी महिलांना उद्योग सुरु करण्याबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. महिलांच्या अंगी असलेली मेहनत, कौशल्य, आत्मविश्वास याला जर योग्य उद्योग उभारणीच्या मार्गदर्शनाची जोड लाभली तर महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनून स्वतःचा, कुटुंबाचा विकास साधू शकतील, असे त्या म्हणाल्या.
डॉ. सोनल विलास मंगल यांनी महिलांनी स्वावलंबी बनण्यासाठी तसेच समाजाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडण्यासाठी उद्योजकीय क्षमता विकसित करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी माया देसाई यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवन प्रवासाचा अल्प परिचय उपस्थितांना करून दिला. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात प्रीती बागी यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी उद्योग म्हणजे काय, तो का करावा, कसा सुरु करावा यशस्वी होण्यासाठी आवश्यक गोष्टी इत्यादीबाबत मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात प्रिया भूयेकर यांनी डिटर्जेंट बनवण्याचे प्रशिक्षण दिले. यामध्ये नीळ, फिनाईल, लिक्विड सोप, वॉशिंग पावडर, साबण, पेपर सोप इत्यादी बनवण्याबाबत प्रात्यक्षिक स्वरुपात मार्गदर्शन केले.
शुभदा कामत, लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या प्रकल्प अधिकारी डॉ. सोनल मंगल व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यशाळेचे नियोजन केले. विजाभज, इतर मागासवर्गीय व मागासवर्गीय समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने कार्यशाळेचा लाभ घेतला. शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे तसेच अध्यासन समन्वयक डॉ. अवनीश पाटील यांचे कार्यशाळेसाठी प्रोत्साहन लाभले.
फोटोओळ- शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनातर्फे आयोजित महिला कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कविता देसाई. सोबत माया देसाई, डॉ. सोनल मंगल, प्रिती बागी, प्रिया भुयेकर, शुभदा कामत आदी.
06/05/2026
शिवाजी विद्यापीठामध्ये डॉ.आप्पासाहेब पवार यांची जयंती उत्साहात
कोल्हापूर, दि.05 मे - शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू डॉ.आप्पासाहेब पवार यांची जयंती आज विद्यापीठात उत्साहात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ.विलास शिंंदे यांच्या हस्ते प्रथम कुलगुरू डॉ.आप्पासाहेब पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी, विद्यापीठ अतिथीगृहासमोरील आणि विद्यार्थी भवन येथील डॉ.आप्पासाहेब पवार यांच्या पुतळयास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, डॉ.सी.टी.पवार, डॉ.एस.जे.नाईक, डॉ.टी.के.सरगर, डॉ.किसन कुराडे, डॉ.अशोकराव जगताप, डॉ.बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉ.धनंजय सुतार, विद्यार्थी भवनचे रेक्टर डॉ.दिपक भादले, डॉ.माधुरी वाळवेकर, सुरेखा अडके, डॉ.प्रियांका जाधवर, उपकुलसचिव डॉ.प्रमोद पांडव, गजानन पळसे, विद्यार्थी भवनचे आजी माजी विद्यार्थी आणि प्रशासकीय सेवक, अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
------
06/05/2026
*प्रभावी पर्यावरण संवर्धन समन्वयातूनच शक्य*
*शिवाजी विद्यापीठातील गोलमेज परिषदेतील सूर*
कोल्हापूर, दि. ५ मे: पर्यावरणाशी संबंधित कार्यरत संस्था, संघटनांनी समन्वय आणि सहकार्यातून एकत्रित काम केल्यास प्रभावी पर्यावरण संवर्धन शक्य आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात झालेल्या गोलमेज परिषदेत उमटला.
शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र विभाग, विद्यापीठ विकास मंच आणि कोल्हापूर अर्थ वॉरियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यापीठात ही परिषद झाली.
या परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून ‘दै. सकाळ’चे संपादक निखिल पंडितराव उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनामध्ये जनजागृतीचे महत्त्वाचे साधन म्हणून प्रसारमाध्यमांची भूमिका अनन्यसाधारण असल्याचे सांगून ते म्हणाले, पर्यावरण संवर्धन ही आपल्या अस्तित्वाशी निगडित महत्त्वाची बाब आहे. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि नैसर्गिक संसाधनांची झपाट्याने होणारी घट ही गंभीर संकटे आपल्यासमोर उभी आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारणे आवश्यक आहे. प्रसारमाध्यमे या प्रश्नाकडे समाजाचे सातत्याने लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. वृक्षारोपण, पाणीसंवर्धन आणि प्लास्टिकविरहित उपक्रम यांसारख्या कृतींमध्ये सहभागी होणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरण टिकले, तरच भावी पिढ्यांना सुरक्षित आणि समृद्ध जीवनाची हमी आपण देऊ शकू, अन्यथा नाही.
अध्यक्षीय भाषणात शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन या बाबींना विद्यापीठाने नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. यामुळेच जलसंवर्धनाच्या माध्यमातून आज शिवाजी विद्यापीठ पूर्णपणे जलस्वयंपूर्ण झाले आहे. येथून पुढेही पर्यावरणीय संरक्षणासाठी विद्यापीठ नेहमीच सकारात्मक प्रयत्न करत राहील, असेही त्यांनी सांगितले.
गोलमेज परिषदेत विविध पर्यावरणीय मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. विशेषतः पाण्याचे प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन, वृक्षतोड, प्लास्टिक संकलन, बांधकामातील खर मातीच्या व्यवस्थापनाबाबतचे प्रश्न यांसारख्या विषयांवर सहभागी संस्था प्रतिनिधींनी विचार मांडले. पर्यावरणाचे प्रश्न सोडवताना पर्यावरणविषयक कायदेशीर बाबींचा योग्य अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. विशेषत: तसेच घनकचरा व्यवस्थापन कायदा, २०२६ समजून घेऊन सध्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले. पर्यावरणीय प्रश्नांबाबत प्रशासनाकडून माहिती मिळविण्यासाठी माहितीचा अधिकार वापरण्यासही हरकत नसल्याचे सांगण्यात आले. पर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्र येऊन काम करण्याची आवश्यकता या निमित्ताने अधोरेखित झाली. विद्यापीठाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून प्रभावी कृती आराखडा तयार करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या परिषदेमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यावरण चळवळीला नवी दिशा मिळेल आणि विविध संस्थांमध्ये समन्वय वाढण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
परिषदेत जिल्ह्यातील वृक्षप्रेमी वेल्फेअर, निरोगी व पर्यावरणपूरक प्रतिष्ठान, निसर्ग अंकुर, गार्डन्स क्लब, वसुंधरा निसर्ग संरक्षण संस्था, सजग नागरिक मंच, कल्पवृक्ष अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, सायकल वेडे कोल्हापूर आदी १६ स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले.
पर्यावरणशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. आसावरी जाधव यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी मांडली. कार्यक्रमास पर्यावरण शास्त्र विभागातील डॉ. सोनल चोंडे, डॉ. पल्लवी भोसले यांच्यासह संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे कोल्हापूर अर्थ वॉरियर्सच्या तृप्ती देशपांडे यांनी आभार मानले.
06/05/2026
*छत्रपती शाहू महाराजांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन*
कोल्हापूर, दि. ६ मे: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना शिवाजी विद्यापीठातर्फे अभिवादन करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी आज सकाळी राजर्षी शाहू समाधी स्थळ आणि दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा या दोन्ही ठिकाणी पुष्प वाहून महाराजांच्या स्मृतींना अभिवादन केले. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन व विकास केंद्रामध्ये कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील, डॉ. देविकाराणी पाटील, डॉ. आलोक जत्राटकर, डॉ. किशोर खिलारे, अविनाश भाले, डॉ. उमाकांत हत्तीकट, सचिन घोरपडे, यश आंबोळे आदी उपस्थित होते.
02/05/2026
https://unishivsandesh.blogspot.com/2026/05/blog-post_2.html
टाइम्स एशिया रँकिंगमध्ये शिवाजी विद्यापीठाची भरारी
प्रथम सहभागातच राज्य विद्यापीठांत देशात दहावे स्थान कोल्हापूर, दि. २ मे : जागतिक स्तरावर विद्यापीठ गुणवत्तेचे मु.....
01/05/2026
शिवाजी विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती
कोल्हापूर, दि.30 एप्रिल - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आज विद्यापीठात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये आज सकाळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.ज्योती जाधव आणि कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी आजीवन अध्ययन व विस्तार कार्य अधिविभागप्रमुख डॉ.रामचंद्र पवार, हिंदी अधिविभागप्रमुख डॉ.तृप्ती करेकट्टी, डॉ.जयसिंग कांबळे, डॉ.संतोष कोळेकर, डॉ.प्रकाश मुंज, डॉ.अनिल मकर, डॉ.सुषमा मांडेकर, हेमंत जाधव, निकिता पाटील, पल्लवी वालेकर, अविनाश कांबळे, आनंदराव बेडगे, श्रीकांत देसाई, सुप्रिया पवार यांचेसह शिक्षक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
-----
01/05/2026
https://unishivsandesh.blogspot.com/2026/05/blog-post.html
शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिन उत्साहात
शिवाजी विद्यापीठात महाराष्ट्र दिनानिमित्त प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आ...